1948 मध्ये ब्रिटिशांनी सिलोन ला स्वातंत्र्य दिले


भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्षाने 1948 मध्ये ब्रिटिशांनी सिलोन ला स्वातंत्र्य दिले. सिलोन 1972 मध्ये श्रीलंका बनला. स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली आणि श्रीलंकेमध्ये बहुसंख्य सिंहली समाजाचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. सिंहली बहुसंख्य होते, धर्म होता बौद्ध. तर तामिळ अल्पसंख्य होते धर्म होता हिंदु. ब्रिटिश काळापासून श्रीलंकेच्या अर्थकारणावर आणि राजकारणावर तामिळ लोकांचे वर्चस्व होते. पण आता उलट होऊ लागले. स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य सिंहली समुदायाने संसदेमध्ये कायदे बनवुन तामिळा ना मुख्य प्रवाहातुन दुर करणे सुरू केले. त्यामुळे तामिळ आणि सिंहली समुदायांमधील अंतर वाढू लागले.
1956 मध्ये श्रीलंकेने एक देश एक भाषा अनुसरून सिंहली ही एकमात्र राष्ट्रीय भाषा म्हणुन घोषित केली. ज्यामुळे सरकारी क्षेत्रात काम करणारे तामिळ कर्मचारी नाराज झाले कारण या निर्णयाचा परिणाम त्यांच्या नोकरीवर होणार होता. तामिळ लोकांच्या व्यवसायामध्ये सरकारी पातळीवरून जाणूनबुजून अडचणी निर्माण केल्या जाऊ लागल्या, सरकार पुरस्कृत काही संघटनांनी तामिळ लोकांवर आर्थिक बहिष्काराचा प्रसार सुरू केला. हळूहळू या सर्व कारणानी तामिळ समुदायाने वेगवेगळ्या संघटना बनवुन विरोध प्रदर्शन सुरू केले. या संघटनांपैकी एक संघटना होती LTTE…
लिट्टे चा प्रमुख प्रभाकरण एका तामिळ उद्योगपती घराण्यात जन्माला आला होता. उद्योगाची राख झाल्यावर त्याने जंगलाचा आसरा घेऊन श्रीलंकेच्या सरकार विरोधात बंड पुकारले. 1983 मध्ये एलटीटीई च्या हल्ल्यात 23 सैनिक मारले गेले. ज्यामुळे संपुर्ण श्रीलंकेत तामिळांच्या विरोधात दंगली भडकल्या. या दंगली मध्ये श्रीलंकेचे सरकार उघडपणे सिंहली दंगलखोरांच्या मागे उभे राहीले. या दंगली मध्ये जवळजवळ 3000 निर्दोष, सामान्य तामिळ नागरीक मारले गेले. यानंतर तर लिट्टे आणि श्रीलंकन सेना यांच्या मध्ये सरळ सरळ यादवी युद्धास सुरवात झाली.
श्रीलंकेतील तामिळ हिंदु होते, तामिळभाषिक होते आणि तमिळनाडू शी अतिशय जवळचे संबधित होते. श्रीलंकेतील तामिळ आणि भारतीय तामिळ यांच्या मध्ये नातेसंबंध, आर्थिक संबंध आणि सांस्कृतिक संबंध होते. त्यामुळे श्रीलंकेत तामिळावर होत असणाऱ्या अत्याचारामुळे भारतीय तामिळ अस्वस्थ आणि नाराज होणे स्वाभाविक होते. लिट्टे ने स्वतंत्र तामिळ इलम ची मागणी केल्यावर तमिळनाडू मधुन त्याला भरपुर समर्थन मिळाले. फक्त समर्थनच नाही तर तमिळनाडू च्या नेत्यांच्या आग्रहामुळे भारत सरकार ने लिट्टे ला गुरील्ला युद्धाच्या ट्रेनिंग बरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सुद्धा उपलब्ध करुन दिली.
भारत सरकारच्या लिट्टे च्या उघड समर्थना च्या भुमीकेने श्रीलंका सरकार भारतावर अतिशय नाराज झाली. परंतु भारताच्या तुलनेत कमकुवत असल्यामुळे श्रीलंका काही करू शकत नव्हता.
इकडे भारताचा सुद्धा चीन आणि पाकिस्तान शी पंगा होता. “शत्रु चा शत्रु तो आपला मित्र” या न्यायाने श्रीलंकेने चीन आणि पाकिस्तान शी जवळीक वाढवणे सुरू केले. जवळीक वाढल्यावर श्रीलंकेने चीनला श्रीलंकेत लष्करी तळ उभारण्याची परवानगी देणारा करार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
आता जी स्थिती बनणार होती ती भारत सरकार कोणत्याही किंमतींवर सहन करणे शक्य नव्हते. श्रीलंका वेगाने चीनच्या पदरात जाऊ लागला होता.
शेवटी भारतीय रणनीतीकारांनी श्रीलंका प्रश्नांवर यू टर्न घेतला आणि 1987 मध्ये श्रीलंकेशी शांती करार केला. या समझोत्या मध्ये असे ठरले की भारत सरकार श्रीलंकन सैन्याच्या मदतीसाठी भारतीय शांती सेना पाठवेल आणि लिट्टे च्या सैनिकांना आत्मसमर्पण करायला लाऊन त्यांची शस्त्रास्त्रे काढुन घेईल.
करारावर सह्या झाल्यानंतर काही दिवसांनी प्रभाकरण ला दिल्ली त निमंत्रित करुन त्याची राजीव गांधी बरोबर मुलाखत घडवून आणली गेली. प्रभाकरण ने कराराचा जोरदार विरोध केला. चर्चेमध्ये तमिळनाडू चे मुख्यमंत्री MG रामचन्द्रन यांना सामील करण्याचा आग्रह धरला. राजीव गांधींच्या बोलावण्यावरून MG रामचन्द्रन ताबडतोब दिल्ली आले. राजीव गांधी आणि रामचन्द्रन यांनी प्रभाकरण वर करार मान्य करण्यासाठी दबाव टाकला. बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती चा हवाला दिला.
प्रभाकरण ने ओळखले की त्याने करार मान्य नाही केला तर त्याला इथेच अटक होऊ शकते. इथे अटक होण्यापेक्षा श्रीलंकेत परत जाणे त्याच्यासाठी महत्वाचे होते. त्याने मनात वेगळेच ठेऊन उघडपणे करार मान्य असल्याचे कबूल करुन शस्त्रे खाली ठेवण्याचे मान्य केले व श्रीलंकेला परत गेला. या भेटीच्या वेळी प्रभाकरणने अधिकृतपणे पाहुणा म्हणुन राजीव गांधींच्या पंतप्रधान निवासस्थानी भोजन सुद्धा घेतले. जाताना त्याला राजीव गांधीनी आपले बुलेटप्रूफ जेकेट सुद्धा भेट दिले.
ही भेट 22 जुलै 1987 रोजी संपली. 30 जुलै 1987 रोजी भारतीय शांती सेना श्रीलंकेत पोहोचली. जेव्हा शांतिसेना तेथे पोहोचली तेव्हा श्रीलंकन तामिळाना वाटले की शांतिसेना त्यांच्या रक्षणासाठी आली आहे त्यामुळे त्यांच्याकडून शांतिसेनेचे जोरदार स्वागत झाले. श्रीलंकेत पोहोचल्या नंतर शांतिसेनेने उत्तरी भागात श्रीलंकेच्या सैन्याची जागा घेतली. सुरवातीला शांतिसेना आणि लिट्टे यांच्यातील संबध चांगले होते. कारण भारतीय एजन्सीजनीच लिट्टे च्या सैनिकांना ट्रेनिंग दिलेले होते. परंतु लिट्टे ने शस्त्रे खाली ठेवण्यास नकार दिला आणि दोघांमधील संबध बिघडू लागले. लवकरच लिट्टे आणि शांतिसेना यांच्या मध्ये युद्ध सुरू झाले. लिट्टेचा बालेकिल्ला असणाऱ्या जाफना वर शांतिसेनेने ऑक्टोबर 1987 मध्ये जोरदार हल्ला चढवला.
भारताकडून लिट्टे चे समर्थन इंदिरा सरकार च्या काळी सुरू झाले होते तेच धोरण राजीव गांधी सरकार ने सुरवातीस पुढे चालवले. मात्र नंतर राजीव गांधीनी श्रीलंकेशी शांती करार केला. हे युद्ध दोन वर्षे चालले ज्यामध्ये भारताचे 1200 जवान मारले गेले. लिट्टे चे सैनिक आणि तामिळाच्या मृत्यूंची संख्या 70 हजार पर्यंत सांगितली जाते. या संपुर्ण ऑपरेशन च्या काळात लिट्टे च्या सैनिकांशिवाय बरेचसे निर्दोष तामिळ नागरीक सुद्धा मारले गेले. भारतीय शांतिसेने वर तामिळ महिलांवर बलात्काराचे आरोप सुद्धा झाले, जे खरे की खोटे ते माहीत नाही. परंतु आता श्रीलंकन तामिळ जनता श्रीलंकन सरकार पेक्षा मोठा शत्रु भारत सरकार ला समजु लागली होती.
1989 मध्ये भारतात सत्तांतर झाले. व्हीपी सिंह पंतप्रधान बनले. पंतप्रधान बनल्यावर 1989 मध्येच व्हीपी सिंह यांनी शांतिसेना परत बोलावली. व्हीपी सरकार पडल्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. 1991 मध्ये चंद्रशेखर सरकार पडल्यावर भारतात मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. लिट्टे ला वाटले की या निवडणुकीत कॉंग्रेस जिंकली तर पुन्हा श्रीलंकेत शांतिसेना पाठवली जाईल. म्हणुन प्रभाकरण ने राजीव गांधींच्या हत्येचा कट रचला व तो पूर्णत्वाला नेला.
राजीव गांधींच्या हत्याकांडाने संपुर्ण देश हादरला. परंतु त्यानंतर लिट्टे ची सुद्धा उलट गिनती सुरू झाली. आणि शेवटी प्रभाकरण समवेत संपुर्ण लिट्टेचा सफाया झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत