
नैसर्गिक माळरानांवर शेती किंवा वृक्षारोपण केल्यास त्याचा स्थानिक जैवविविधतेला मोठा फटका बसतो व बिघडलेली जैवविविधता पूर्ववत होण्यास फार मोठा काळ जावा लागतो, असे अमेरिकेतील पर्यावरण अभ्यासक डॉ. आशिष नेर्लेकर यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
राज्यातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या सात जिल्ह्यांमध्ये डॉ. नेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ इकॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. डॉ. नेर्लेकर यांच्यासह आविष्कार मुंजे, प्रणव म्हैसाळकर, डॉ. अंकिला हिरेमठ व डॉ. जोसेफ वेल्डमन यांच्या चमूने २०२१मध्ये नैसर्गिक माळराने, शेतजमिनी, पडीक शेतजमिनी आणि वृक्षारोपण केलेल्या जमिनी अशा साठ ठिकाणांचा अभ्यास केला होता. त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करून हे संशोधन करण्यात आले आहे. याबाबत डॉ. नेर्लेकर म्हणाले, की सध्या निसर्ग संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची पद्धत रूढ होत आहे. मात्र, शेती आणि वृक्षारोपण हेच घटक नैसर्गिक माळरानांसाठी हानीकारक ठरत आहेत. वृक्षारोपणामुळे नको असलेल्या वनस्पती उगवत असल्याने ही हानी होते. या बाबींचा विचार करता, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी माळराने टिकवणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत