तरुणांनो जागे व्हा !


मनिष सुरवसे
काही दिवसांपूर्वी पोलीस शिपाई भरतीसाठी पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांबरोबरच इंजिनियर आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांनींही भरतीसाठी अर्ज केल्याची बातमी होती. आता काराग्रह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणे चार लाख अर्ज आल्याची बातमी आहे. (दै.लोकसत्ता- 15/5/24)
म्हणजे यावरून बेरोजगारी किती भीषण स्वरूपाची झाली आहे हे लक्षात येते. मागील दहा पंधरा वर्षापासून नोकर भरती बंद असल्यामुळे हजारो, लाखो तरुणांचे आयुष्य बरबाद झालेले आहे, परंतु याची काळजी ना लोकप्रतिनिधींना आहे ना शासनाला आहे ना खुद्द तरुणांना आहे. कारण तरुणांना धार्मिकतेमध्ये गुंतवूण ठेवले आहे. म्हणूनच नोकरीसाठी आंदोलने केली जात नाहीत, असो.
नोकरी नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी तुटपुंज्या पगारावर कोणतेही, कसलेही काम करण्याची पाळी आजच्या तरुणांवर आलेली आहे. अशा कामामुळे त्यांचा उदरनिर्वाह तर होतो परंतु त्यांचा जीवनस्तर सुधारत नाही आणि ते गरीबच राहतात. त्यामुळेच अलीकडच्या काळात गरीबी अधिकच वाढल्याचे दिसून येते. देशाचे प्रधानमंत्रीच 80 करोड गरीब लोकांना मोफत राशन दिले जात असल्याची जाहिरात करतात. म्हणजे यावरून आपण प्रगती करत आहोत की अधोगती करत आहोत हे अगदी सामान्यालाही कळून येईल.
आता भरती होत आहे याचे समाधान तरुणांमध्ये आहे, परंतु मागील तलाठी, शिक्षकांच्या भरतीच्या अनुभवावरून भरतीमध्ये प्रचंड मोठा घोटाळा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भरतीसाठी परीक्षा तर होतेच परंतु तरुणांना रोजगार मिळत नाही. कारण घोटाळ्याची चौकशी सुरू करायची आणि कुणीतरी कोर्टामध्ये केस घालायची आणि प्रकरण भिजत ठेवायचे, असे यामध्येच अनेक वर्ष निघून जातात आणि तरुणांचे नोकरीचे वय संपून जाते. आणि मग आपला तरुण बेरोजगारच राहतो.
तेव्हा तरुणांनो, आपले राजकारणी आपल्या देशाचे राजकारण कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत आणि संविधानातील लोककल्याणकारी तत्वांची अंमलबजावणी त्यांच्याकडून का केली जात नाही याचा विचार करावा, चिंतन आणि चर्चा करावी. कारण असे केल्याशिवाय वास्तव कळणार नाही आणि वास्तव कळल्याशिवाय संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचे भान येणार नाही.
????
मनिष सुरवसे 9657725946
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत