आपले संविधान हे दुसऱ्या देशातील संविधानामधील संकल्पना किंवा तरतुदींचे कॉपी-पेस्ट आहे का ? – आयु. राजीव अंबादास शिंदे (L.L.B & Cyber Law)

आपल्याला नेहमीच “आपले संविधान हे दुसऱ्या देशातील संविधानामधील काही संकल्पना घेऊन कॉपी पेस्ट केले आहे का? किंवा परदेशी इतर संविधानातील तरतुदींचे कॉपी-पेस्ट आहे का?” अशा पद्धतीची शिकवण किंवा अपप्रचार समाजामध्ये घडवून आणलेला दिसतो. या अपप्रचारामध्ये तथ्यता किती आहे हे आपण पुढे पाहणार आहोत.
युनायटेड नेशन(UN) युनिव्हर्सल डिक्लरेशन अबाउट ह्यूमन राइट्स(UDHR,1948) यांच्या वेबसाईट नुसार खालील प्रकारे लिहिलेले आढळते.
सम्राट अशोकाने आपल्या आज्ञापत्रात म्हटले आहे की, “कायद्यात समानता आणि दंड देण्यात एकसमानता असावी ही माझी इच्छा आहे.” त्याचे आदेश “सेवक आणि कर्मचार्यांशी योग्य वागणूक” यासह सर्व मानवजातीशी न्याय्य वागणुकीला प्रोत्साहन देतात.
हे UDHR च्या कलम 5 शी मिळते जुळते आहे. असे अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे आणि हे पुरावे शिलालेख स्वरूपात असल्यामुळे संदिग्धपणे हा ग्राह्य धरला गेला आहे. हे पुरावे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहेत. यावरून असे सिद्ध होते की मानवी अधिकार व मूल्य या संदर्भातील स्पष्ट स्वरूपातील ध्येय व धोरणे ही सम्राट अशोक काळातीलच आहेत हे सिद्ध होते.
पण भारतातील काही संशोधक हे जे वर्चस्ववादी विचाराचे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या संशोधन पत्रके मध्ये आधुनिक मानवी अधिकार व मूल्य याची सुरुवात ही स्मृती, श्रुती व कौटिल्य आणि धर्मशास्त्र याद्वारे झाली आहे अशा प्रकारची मांडणी ते करत असतात आणि अशाच पद्धतीची कॉलेजमध्ये देखील ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण हे सांगत असताना याचा पुरावा म्हणून त्यांना इसवी सनापूर्वीचे पुरावे किंवा दाखले देता येत नाहीत. इसवी सन आठव्या व नवव्या शतकानंतर चे पुरावे लिखित स्वरूपात त्यांना थोड्याफार प्रमाणात मिळतात. असे असून देखील ते आपली मांडणी बदलण्यास तयार नसतात. आणि त्याची मांडणी ही अतिप्राचीन या शब्दाखाली करताना दिसतात.
बुद्धाच्या शिकवणीने मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावीपणे कार्य केले. महान राजा अशोक आपल्या प्रजेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाला होता आणि त्याने मूलभूत स्वातंत्र्य आणि अधिकार प्रदान केले होते.
भारतीय मूलभूत अधिकार याची संकल्पना ही बौद्ध धर्मातील असून चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखाद्वारे या संकल्पना उदाहरणासहित स्पष्ट केले आहेत. या संकल्पना परदेशी राज्यघटना द्वारे कॉपी-पेस्ट केलेल्या नाहीत.(असे सांगितले जाते की मूलभूत अधिकाराची संकल्पना ही अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे)
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खालील घटना सभेच्या समोर केलेल्या भाषणाद्वारे स्पष्ट होते की….
25 नोव्हेंबर 1949 च्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा 26 जानेवारी 1950 रोजी संविधान निर्मिती सभेत सादर केला होता, जो संसदीय मतदारसंघ बनून “पुन्हा” भारत परत आला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
“भारताला संसद किंवा संसदीय कार्यपद्धती माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्षू संघांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की केवळ संसदेच माहित होती असे नाही तर संघांना आधुनिक काळातील संसदीय कार्यपद्धतीचे सर्व नियम माहित होते आणि त्यांचे पालन होत होते. त्यांच्याकडे आसनव्यवस्था, प्रस्ताव, ठराव, कोरम, व्हिप, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान, निंदा प्रस्ताव, नियमन, रेस ज्युडिकटा इत्यादींसंबंधीचे नियम होते. हे संसदीय कार्यपद्धतीचे नियम बुद्धांनी सभांना लागू केले होते. संघांनी, त्यांच्या काळात देशात कार्यरत असलेल्या राजकीय संमेलनांच्या नियमांतून ते घेतले होते”
याच्याद्वारे असे स्पष्ट होते की भारतीय बौद्ध संघ व्यवस्थेचा परिणाम व प्रसार युरोपियन व अमेरिकन देशांमध्ये प्राचीन काळात झाला होता. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या वाक्यातच भारतीय बौद्ध संघ व्यवस्थेतील संकल्पना आपण भारतामध्ये पुनरस्थापित करीत आहोत असे स्पष्ट केले आहे.
त्यांनी परदेशात जाऊन जरी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला असला तरी त्यांचे वरील वाक्य महत्त्वपूर्ण ठरते.
*युनो ने केलेला सम्राट अशोक यांचा गौरव व आत्मसात केलेल्या संकल्पना हे या निर्देशित करतात की भारताने संपूर्ण जगाला या संकल्पना देऊन आपण *विश्वगुरू* कसे आहोत हे दाखवून दिले आहे.
त्याचबरोबर Law भाषा व शब्द संरचना ही बौद्ध परंपरेतूनच युरोप मध्ये पोहोचली हे प्रकाशाने जाणवते. या पाठीमागचे धर्मकीर्तीचे लॉजिक व त्यांची भाषा याचा पुरावा म्हणून देता येतो.
- राजीव अंबादास शिंदे(L.L.B and Cyber Law)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत