महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे : ग्राऊंड रिपोर्ट- डॉ. अशोक नामदेव पळवेकर

२०२४ च्या लोकसभेची निवडणूक अत्यंत लक्ष्यवेधी व महत्त्वाची आहे. देशात एकूण ७ टप्प्यात व महाराष्ट्रात पाच टप्प्यात या निवडणुकीची आखणी केली गेली आहे. यातील पहिल्या टप्प्याची निवडणूक दि. १९ एप्रिल, २०२४ रोजी देशभरात १०२ ठिकाणी वेगवेगळ्या मतदार संघात पार पडली. यांपैकी विदर्भातील पाच जागांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि जनतेचा भाजपविरोधी / महायुतीविरोधी असणारा कल लक्षात घेता पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल भाजपविरोधात जाणार याची खात्री खुद्द मोदींनाही पटलेली आहे. त्यामुळेच मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात मोदी कधीही नागपुरात मुक्कामी थांबले नव्हते- ते यावेळी १९ एप्रिलला नागपुरात मुक्कामी होते. नागपुरात त्यांनी पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची कारणे समजून घेतली. यातून या निवडणुकीचा एकूणच मूड त्यांच्या लक्षात आला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
नागपुरात भाजप × कॉंग्रेस या पक्षांच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत उभी ठाकली असून प्रत्यक्ष फडणवीस यांच्या मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेता त्याचा फटका गडकरी यांना बसणार आहे. नागपुराततील संघ परिवार मोदींच्या धोरणांवर प्रचंड नाराज आहे. यातील संघ परिवाराची एक छावणी मोदींची समर्थक आहे, तर दुसरी गडकरींची छावणी मोदींच्या विरोधात आहे. संघटना म्हणून संघ आणि पक्ष म्हणून भाजप या दोन्ही घटकांच्या तुलनेत मोदींनी स्व-केंद्रीत ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या संघपरिवारातील मुख्य नेत्यांना मान्य नाहीत. या दोनही छावण्यांचा मोदींच्या बाबतीत असलेला होरा वेगवेगळा आहे. नागपूर मुक्कामात ही बाब मोदींच्या लक्षात आलेली आहे. या वातावरणाचा आणि भाजपविरोधी इतर सर्व राजकीय पक्षांच्या भूमिकेचा विचार करता तसेच नागपुरातील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता नागपूर मतदार संघात गडकरी यांना पराभूततेचा सामना करावा लागतो आणि त्या ठिकाणी विकास ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो, असा तेथील जाणकारांचा अंदाज आहे.
चंद्रपूर मतदार संघातील सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीला तगडे आव्हान कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी दिले आहे. याठिकाणी प्रतिभा धानोरकरांचा विजय आणि सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात पारवे की बर्वे याबाबत मात्र निश्चितपणे काही सांगणे कठीण आहे. भंडारा-गोदिया आणि गडचिरोली-चिमूर याही मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत होण्याची दाट शक्यता आहे!
पहिल्या टप्प्यातील मतदानाचे हे चित्र भाजपला किंवा महायुतीला अस्वस्थ करणारे असेच आहे. त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळेस मोदींच्या प्रचाराची भाषा एकदम बदललेली आहे. तसेच केवळ वेगवेगळ्या मतदारसंघातील जनतेच्या कलाचे सर्व्हेच नव्हे, तर AI च्या माध्यमातून पुढे आलेले निष्कर्षही हे स्पष्ट करत आहेत की, यावेळेस देशातील जनमत हे पूर्णपणे भाजपच्या विरोधात आहे. मोदींनी मागील दहा वर्षांच्या काळात जनतेला सांगावे असे काहीही केलेले नाही. लोकांनी त्यांच्या आश्वासनांवर एकदा विश्वास ठेवला; दुसऱ्यांदा विश्वास ठेवला, परंतु आता मात्र मोदींच्या आश्वासनांवर समाजातील कोणत्याही घटकांचा कोणत्याच बाबतीत विश्वास उरलेला नाही. हे मोदींनाही कळून चुकले आहे. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी ‘हिंदू-मुस्लिम’ अशा धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा वापरायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची घटका जवळ आलेली आहे. लोक जाहीरपणे काहीही बोलत नाहीत. पण, खासगीत मात्र मोदींच्या विरोधात अगदी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे ते मोदींच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या भाषेला यावेळी अजिबात बळी पडणार नाहीत, हे सत्य आहे!
दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि. २६ एप्रिल, २०२४ रोजी आहे. या टप्प्यात अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी ह्या आठ मतदारसंघात मतदान होणार आहे. यांतील अमरावतीची जागा भाजपने आजच गमावलेली आहे. कारण ज्या नवनीत राणाला भाजपने उमेदवारी दिली, ती उमेदवारी खुद्द भाजपच्या स्थानिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. तसेच नवनीत राणा यांच्या विरोधात सर्व विरोधीपक्ष आहेत. नवनीत राणा यांनी राजकारणात वेळोवेळी ज्या भूमिका बदललेल्या आहेत, त्याविरोधात येथील जनतेचा त्यांच्यावर प्रचंड रोष आहे. केवळ भाजपच्या लोकांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जोरजबरदस्तीने ‘हनुमान चालीसा’ पठणाच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका ही लोकांना रुचलेली नाही. तसेच भाजपने त्यांच्या कपटनीतीने उद्धव ठाकरे यांची फोडलेली शिवसेना आणि शरद पवार यांचा फोडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नंतर स्वायत्त यंत्रणाचा गैरवापर करून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासोबत खेळलेली खेळी जनतेला अजिबात पटलेली नाही. ह्या दोनही नेत्यांना मानणारा महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आहे. त्यातील बरेच लोक भाजपच्या विरोधात गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा फटका नवनीत राणा यांना बसल्याशिवाय राहणार नाही! सोबतच अमरावतीत सर्वच लोकांना आपला वाटेल असा एक उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. ज्यांना जातीच्या आधारावर बळवंत वानखेडे चालू शकत नाही, ते लोक पर्याय म्हणून दिनेश बूब यांचा विचार निश्चितपणे करणार आहेत. त्यामुळे अर्थातच ती मते नवनीत राणा यांच्या बाजूने जाणार नाहीत. मतदारांच्या समूह आधारावर संख्याशास्त्रीय अंगाने विचार करता अमरावती मतदार संघाची ढोबळमानाने १८ लाख मतदारांची संख्या आहे. यांतील २ लाख मुस्लिम आणि ३ लाख दलित+बौद्ध मतदार हे भाजप उमेदवार नवनीत राणा यांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाहीत, हे जाहीर आहे. या मतदारसंघात एकूण १८ लाख मतदारांपैकी प्रत्यक्षात ५५-६० टक्के मतदान झाल्यास आणि त्यातून दलित+बौद्ध+मुस्लिम मतदारांची संख्या बळवंत वानखेडे यांच्या बाजूने गेल्यास उर्वरित ७-८ लाख मतदारांचे विभाजन पुन्हा वानखेडे, बूब आणि राणा यांच्यात होणार आहे. दलित – बौद्ध – मुस्लिम, कुणबी आणि मराठा (DMKM) हा फॅक्टर मोठ्या प्रमाणात बळवंत वानखेडे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे स्वाभाविकच- १. बळवंत वानखेडे, २. दिनेश बूब आणि ३. नवनीत राणा अशा लढतीत बळवंत वानखेडे यांचा विजय अमरावतीत निश्चित मानला जातो. दलित-बौद्धांची फारतर १-२ टक्के मते ही आनंदराज आंबेडकर यांना जाऊ शकतील. कारण या समूहातील विचार करणारा एक वर्ग भावनिक पातळीवर यावेळी मतदान करणार नाही, तर देशात भाजपच्या विरोधात असलेली एक-एक जागा महत्त्वाची आहे असे मानून हा समूह निवडून येऊ शकेल अशाच उमेदवाराला आपले मतदान करणार आहे. निवडून येऊ शकत नाही अशा उमेदवाराला आपण भावनिक पातळीवर आपले मत देणे म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष मदत करणेच आहे, हे वास्तव त्यांच्या लक्षात आले आहे. तसेच, राणासोबत सख्य असणाऱ्या येथील काही कार्यकर्त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना उभे केले आहे, हे या समूहातील लोक जाणून आहेत. त्यामुळे अमरावती शहरात देखील एक नगर सोडले तर इतर वस्त्यांमध्ये किंवा नगरांमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीचा फारसा प्रभाव नाही. दलित+बौद्धांची मते आपल्याला हमखास मिळणार नाहीत, यासाठी ही मते खेचणारा उमेदवार या निवडणुकीत उभा करणे हे राणा यांना यादृष्टीने गरजेचे होते. त्यासाठीच आनंदराज आंबेडकरांना उभे केले गेले! परंतु जनतेला हे आतील राजकारण कळून चुकले आहे. म्हणूनच ते आपले मत वाया जाणार नाही यासाठी दक्ष आहेत. स्वाभाविकच त्यांची मते बळवंताला ‘बळ’ देतील. त्यामुळे बळवंत वानखेडे यांचा विजय सुकर होईल.
वर्धा मतदारसंघात रामदास तडस आणि अमर काळे यांच्यात जबर संघर्ष असला तरी जनमताचा कौल अमर काळे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकतो आहे. पक्ष म्हणून भाजप व उमेदवार म्हणून तडस यांच्यावर जनता नाराज आहे, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचे पक्षीय बळ व काळे यांच्याविषयी जनलोकांत असलेली सौहार्दाची भावना ह्या गोष्टी अमर काळे यांच्या विजयाची खात्री देणाऱ्या आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात संजय देशमुख हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, याबद्दल कुणालाही शंका नाही. अकोला मतदारसंघात काँग्रेस आणि वंचित या पक्षांच्या उमेदवारांमध्ये सामना आहे. कॉंग्रेसने येथे संघ पठडीतील उमेदवार उभा करून भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी फलदायी ठरू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रात वंचितची आली तर ही एकमेव जागा असू शकते! परंतु तूर्तास येथे कॉंग्रेस, वंचित आणि भाजप अशी तिहेरी लढत आहे. विजय नक्की कुणाचा होईल, हे आज निश्चितपणे सांगणे कठीण आहे. बुलडाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी यांपैकी बुलडाणा शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि नांदेड व परभणी या जागांचे निकाल भाजपच्या विरोधात जाऊ शकतात, असा अंदाज आहे.
एकूण काय? तर- पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानात भाजपच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. महाविकास आघाडीला मोठे यश या दोन्ही टप्प्यात मिळताना दिसत आहे.
••
डॉ. अशोक नामदेव पळवेकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत