ढोल,गँवार,पशू,शूद्र,नारी।

जयवंत हिरे
यह सब ताडन के अधिकारी।।” ही धर्माज्ञा ज्या धर्मशास्त्राने दिली आहे.त्या धर्म आणि धर्मशास्राच्या धर्माज्ञा “कसायाला गाय धार्जिण होऊन” त्या धर्माज्ञांच्या गुलामांनीच स्वीकारल्या तर…
त्यांच्या गुलामीचे साखळदंड कोणता महामानव तोडू शकतो काय?
शूद्रांचंही तसंच झाले.
क्रांतिबांना त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या भर वरातीतून शूद्र म्हणून हकलून दिले आणि या अधर्म व्यवस्थेविरुद्ध त्यांनी क्रांतिचे रणशिंग फूंकले.ब्राह्मणी कसब पार उघडे नागडे करुन जगासमोर आणले.ब्राह्मणेतर स्री,स्पृश्य,शूद्र,अस्पृश्यांना त्यांच्यातल्या जातींच्या भिंती उध्वस्त करुन मानवी मूल्याधिष्ठीत-स्वयंनिर्मित “सार्वजनिक सत्यधर्मा”ची पर्यायी व्यवस्था द्यायचा अटापीटा केला.
पण,”ये रे माझ्या मागल्या.गुलामीच्या बेड्याच चांगल्या” म्हणत ब्राह्मणेतर सवर्णांनीच नव्हे;तर ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य या त्रैवर्णिकांच्या गुलामीचे ओझे हजारो वर्षे पीढ्या न पीढ्या वाहणार्या शूद्रांनी क्रांतिबांच्या सत्यशोधकी मार्गाने जाण्याऐवजी गूलामीचे साखळदंड स्वत:भोवती अधिकच करकचुन घट्ट बांधून घेतले.
छत्रपती शाहू महाराजांनाही वेदोक्त प्रकरणात ब्राह्मणी धर्मव्यवस्थेतले आपले स्थान कळल्यावर त्यांनीही त्यांच्या परीने या व्यवस्थेवर घाव घालता घालता ब्राह्मणेतर स्पृश्य-अस्पृश्य समुहांमधील दरी मिटवण्यासाठी अनेक प्रयास केले.आपल्या बहिणीचाही आंतरजातीय विवाह लावून दिला.अस्पृश्य समुहांना शिक्षण-व्यवसाय-आरक्षणाचे पाठबळ देवून त्यांनाही स्पृश्यांच्या बरोबरीने ब्राह्मणी गुलामीविरोधातील युद्धाचे लढवय्ये बनवायचा अटोकाट प्रयास केला.
शाहू महाराजांच्या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्धच्या लढाईचा महानायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने त्यांना भेटलाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेल्या चवदार तळे सत्याग्रह,मनुस्मृती दहन आदि अस्पृश्यांच्या मुक्तीलढ्यांत ब्राह्मणांपासुन विविध जातीय मानवतावादीही सहभागी झाले होते.पण,ब्राह्मणेतरांनी मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना “त्यांच्या या परिवर्तनाच्या लढाईत” सहभागी होण्यासाठी ब्राह्मणांना अस्पृश्य करायच्या घातलेल्या पुर्वअटीस डाॅ.बाबासाहेबांनी;”ब्राह्मण्यग्रस्त अस्पृश्यांपेक्षा ब्राह्मण्यरहित ब्राह्मण जास्त जवळचे असल्याचे” स्पष्ट करीत धूडकावून लावल्यानंतर ब्राह्मणेतर सवर्ण-शूद्रांनी खरोखरच ब्राह्मणी व्यवस्था नाकारली असती आणि फुले-शाहूंनंतर मानवीमूल्ये-समतेच्या लढ्याचे आंबेडकरी नेतृत्व स्वीकारले;तर महाराष्र्टातच नव्हे;देशभरात समता आणि ज्ञानाच्या दिशेने फार मोठ्ठे परिवर्तन झालेले दिसले असते.
पण,हा ब्राह्मणेतर वर्ग ब्राह्मणांना विरोध करता करता ब्राह्मणी धर्म,वर्ण,जाती,रुढी,परंपरांच्या गुलामीचे ओझे स्वातंत्र्यानंतरही वहातच राहिला.बाबासाहेबांनी शूद्र वर्गासाठी संविधानात आरक्षणाची तरतुद करुनही या वर्गाने आपण अस्पृश्य ठरु की काय;या भीतीतून ओबीसी आरक्षणाला विरोध केला.पर्यायाने आरक्षण मिळाल्याने पुर्वस्पृश्य समुह शिक्षण आणि नोकर्यांमध्ये ब्राह्मणी धर्माधिष्ठीत आरक्षित व्यवस्थेला आव्हाने देत असतांना शूद्र जाती समुह मात्र त्यांना गुलाम-शूद्र ठेवणार्या देव-धर्माच्या रक्षणाच्या लढाया लढता लढता मागासच रहात होता.उत्तरेत शूद्र समुहांमधील बी.पी.मौर्य,राम नरेश यादव,ललनसिंह यादव आदी ओबीसी नेते आंबेडकरी मानवी हक्कांच्या लढाईचे सेनापती झाले होते.दक्षिणेकडे पेरियार ई.व्ही.रामस्वामींनी “शेडी कापा-जाणवे तोडा” शूद्रांच्या स्वाभिमानी आंदोलनातुन ब्राह्मणांना पळता भूई थोडी केली असतांना फुले,शाहू,आंबेडकरांच्या महाराष्र्टातील ओबीसींसह सार्या ब्राह्मणेतर चळवळीला त्यांच्या नेत्यांनी कधीच मुठमाती दिली होती.
याच काळात पँथरच्या लढ्यासोबतच एक ओबीसी निखारा चेतू लागला होता.त्याचे नाव होते ॲड.जनार्दन पाटील.
याच काळात तसे शेकापमधून ॲड.दत्ता पाटील,दि.बा.पाटील आदी नेते तथागत बुद्धाशी शाक्य-कोलीय नाते शोधत असतांना जनार्दन पाटलांनी आंबेडकरी छावणीतुन ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते.
या काळात आरक्षण विरोधी आंदोलनाने गुजरातमध्ये पेट घेतला असतांना जनार्दन पाटील आंबेडकरी छावणीतुन “ओबीसी आरक्षण हक्क संरक्षण समिती”तुन ओबीसींच्या हक्कांचे आंदोलन लढत होते.त्यावेळी ओबीसी समाज आरक्षण विरोधी बाळ ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून प्रतिगामीत्वाची लढाई लढत होता.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या “रिडल्स इन हिंदु इझम” या ग्रंथाविरोधात बाळ ठाकरे,आरएसएस,वारकरी संप्रदायासोबत ओबीसी समाजही प्रतिगाम्यांच्या खांद्याला खांदा लावून एकवटला असतांना जनार्दन पाटील मात्र “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती”तुन आंबेडकरी विचार स्वातंत्र्याचा लढा लढत होते.या लढाईत काही शिवसैनिकांनीच हूतात्मा चौकाची विटंबना केल्यानंतर बाळ ठाकरेंनी दलितांनीच हूतात्मा चौकाची विटंबना केली;असा प्रचार केल्यावर ठाकरेंचे एक ओबीसी सेनापती छगन भूजबळांनी हूतात्मा चौकाचे गोमुत्राने शुद्धिकरण केले.त्याही वेळी समाजाच्या या प्रतिगामी भूमिकेविरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवणारे ॲड.जनार्दन पाटीलच होते.
“रिडल्स”च्या लढ्यात आंबेडकरी जनतेसोबतच मृणाल गोरे,अहिल्या रांगणेकर,पुष्पा भावे,मधू दंडवते,निळकंठ खाडीलकर,कम्युनिस्ट,मार्क्सवादी कम्युनिस्ट,जनता दल,शेकाप यांच्या बरोबरीने जनार्दन पाटीलही उभे होते.अखेर या लढ्यात “रिडल्स इन हिंदु इझम”मधील राम,कृष्ण,सीतेसह विविध हिंदू देवदेवतांच्या कथांचा समाचार घेणारे परिशिष्ठ कायम राहिले.
या प्रतिगामी शक्तींचा रिडल्स प्रकरणात पराभव केल्यानंतर संघाने क्रांतिबा फुलेंकडे आपली वाकडी नजर वळवली.एक संघ स्वयंसेवक बाळ गांगल याने पु.ग.बेहरेंच्या “सोबत” साप्ताहिकातुन “ही कसली फुले!ही तर फुले नावाची दूर्गंधी!!” हा लेख लिहून जोतीबा फुलेंबाबत अतिशय विकृत लेख लिहून ब्राह्मणी कसब पुन्हा एकदा दाखवले.त्याही वेळी ओबीसी समुह ब्राह्मणी गुलामी निभावत बाळ गांगल,बाळ ठाकरे,संघाच्या छावणीतुन क्रांतिबा फुलेंविरोधात लढत होता.छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याने “फुले आमच्या जातीचे होते;याची आम्हाला लाज वाटते.”असे धक्कादायक विधान केले होते.या लढाईतही ॲड.जनार्दन पाटील फुलेंचा शेतकर्यांचा आसूड प्रतिगाम्याविरुद्ध फटकारत होते.
शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्र्टात संपूर्ण ब्राह्मणेतर समाजात फुले-आंबेडकरी विचार रुजले तर समतेच्या-जातीविध्वंसनाच्या लढ्याला देशभरात गती लाभेल.देशातील धर्मांधळे-विद्वेषी राजकारण संपेल.पर्यायाने जाती संस्थाच नष्ट होऊन धर्माधिष्ठीत हजारो वर्षांचे उच्चत्वाचे आरक्षण संपुष्टात आले;तर ओबीसी आणि दलित समुहही स्वत:च आरक्षण धूडकावून उच्चत्वाच्या लायकीला धूळ चारत शिक्षण-नोकर्या-सत्तेच्या राजकारणातही स्वत:चा ठसा उमटवू शकेल.
जनार्दन पाटलांसारख्या नेत्यांच्या अथक लढाईमुळेच ओबीसींना व्ही.पी.सिंहांनी मंडल आयोगाच्या सिफारशींनुसार आरक्षण लागू केले आणि व्ही.पी.सिंहांनी मंडल आयोग लागू केल्यामुळेच भाजपाने व्ही.पी.सिंहांचे सरकार पाडले;हे कटू सत्य विसरुन त्यांच्या प्रत्येक धर्मयुद्धातील सैनिक होणार्या ओबीसींनी क्रांतिबा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांकडे पाठ फिरवल्यामुळेच देशात आज धर्मयुद्धाच्या लाटेवर स्वार होऊन ओबीसी समुह शूद्रतेच्या धर्माधिष्ठीत साखळदंडांमध्ये अधिकाधिक जखडबंद होत असतांना जनार्दन पाटलाची उणीव अस्वस्थ करीत आहे.पण,जनार्दन पाटील जाऊन चौदा वर्षे उलटलीत.
जनार्दन पाटील यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ त्यांच्या फुले -आंबेडकरी विचारांच्या लढाईला मानाचा जयभीम!
-जयवंत हिरे
“क्रांतिकारी जनता”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत