देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आतंकवादाला धर्म असतो की नसतो? (लेख)- चंद्रकांत झटाले

हा प्रश्न वारंवार आपल्या देशासमोर येत असतो की ‘आतंकवादाला धर्म असतो की नसतो?’ याचे उत्तर शोधताना पुरेशा माहितीअभावी अनेकांची गफलत होते. त्यासाठी आपल्याला उदाहरणे दिली जातात की ‘देशावर आजपर्यंत जितके हल्ले झालेत ते मुस्लिमांनीच केलेत किंवा प्रत्येक मुस्लिम हा आतंकवादी नसतो पण प्रत्येक आतंकवादी हा मुस्लिमच असतो.’ आपण माहिती घेतली तर लक्षात येईल की ही दोन्हीही वाक्ये तद्दन खोटी आहेत. कशी ती बघुयात.

सर्वात आधी तर आपल्याला हे बघावं लागेल की आजपर्यंत आपल्या देशावर कोणकोणते हल्ले झाले आणि ते कुणी केले? आपल्याला माहिती असते फक्त जम्मू-काश्मीर मध्ये वारंवार होणारे हल्ले आणि मुंबई बॉम्बस्फोटासारखे हल्ले. हे आणि असे अनेक हल्ले निश्चितच कट्टर मुस्लिम दहशदवाद्यांनी केलेत. पण यासोबतच या देशातील विविध भागात अनेक हल्ले झालेत त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. सन २००० पासून आपल्या देशात ज्या खूप मोठमोठ्या दहशतवादी कारवाया झाल्यात त्यांची माहिती महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी आपल्या ‘ब्राह्मण्यवादी दोषी मुस्लिमांना फाशी’ या व इतर पुस्तकांमधून पुराव्यांसह सविस्तर दिली आहे. एस.एम. मुश्रीफ आपल्या पुस्तकातून आरएसएस, अभिनव भारत सारख्या संघटनांनी देशात अनेक ठिकाणी घडविलेल्या व पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या बॉम्बस्फोटांची माहिती दिली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट २००८ : २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील गजबजलेल्या भिकू चौकात शक्तीशाली बॉम्बचा स्फोट होऊन ६ लोक मयत व १०० पेक्षा जास्त जखमी झाले. (यात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक होते ) नेहमीप्रमाणे आयबी या गुप्तचर संस्थेने ’सीमी’, ’इंडियन मुजाहिदीन’, ’जैशे महंमद’ सारख्या मुस्लिम संघटनांवर संशय व्यक्त केला व प्रमुख वर्तमानपत्रांनी व टीव्ही चॅनेलनी त्याला भरपूर प्रसिध्दी दिली. पण स्फोटाच्या तीन महिने आधी महाराष्ट्र एटीएसचा पदभार स्वीकारलेले हेमंत करकरे यांनी पारदर्शीपणे तपास केला. हेमंत करकरे यांनी आपले लक्ष प्रथम घटनास्थळावर केंद्रीत केले. तेथे त्यांना एक मोटर सायकल मिळाली व त्यावर ठेवलेल्या आर.डी.एक्स सारख्या स्फोटकाच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणल्याचे दिसून आले. या मोटर सायकलच्या मालकाचा शोध घेतला असता ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ. भा. वि. प.), अभिनव भारत, विहिंप ची ’दुर्गा वाहिनी’ वगैरे संघटनांशी संबंधीत होत्या. त्यांना त्वरीत अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता, शामलाल साहू व शिवनारायण कलसंगरा यांची नावे निष्पन्न झाली. ते आरएसएस व भाजपाशी संबंधीत होते. त्यांनाही पोलीसांनी अटक केली. या तिघांकडे कसून तपास केला असता या कटामध्ये सामील असणार्‍या ले. कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, जम्मू येथील शारदा पीठाचे महंत दयानंद पांडे, समीर कुलकर्णी वगैरे महत्त्वाच्या व्यक्तींची नावे निष्पन्न झाली. अशा एकूण ११ लोकांना पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. तपासाचे दरम्यान हेमंत करकरे यांनी ले. कर्नल पुरोहित व दयानंद पांडे यांच्याकडून तीन लॅपटॉप जप्त केले. या गुन्ह्याचा तपास हेमंत करकरे यांनी २४/०८/२००८ पूर्वी म्हणजे ते हयात असतानाच जवळजवळ पूर्ण केला होता; पण त्याचे चार्जशीट कोर्टात त्यांच्या मृत्युनंतर जानेवारी २००९ मध्ये पाठविण्यात आले. त्यात अटक केलेल्या ११ अतिरेक्यांसह एकूण १४ अतिरेक्यांचा आरोपी म्हणून समावेश होता. त्यांची नावे अशी –
1) साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, 2) शामलाल साहू, 3) शिवनारायण कलसंगरा 4) ले. कर्नल प्रसाद पुरोहित 5) मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय 6) महंत दयानंद पांडे उर्फ सुधारक धर द्विवेदी 7) समीर कुलकर्णी 8) अजय राहीरकर 9) राकेश धावडे 10) जगदीश म्हात्रे 11) सुधाकर चतुर्वेदी 12) रामजी कलसंगरा (फरारी) 13) संदीप डांगे (फरारी) 14) प्रवीण मुतालीक (फरारी होता याला नंतर अटक करण्यात आली.)
हे सर्व अतिरेकी अभिनव भारतचे सदस्य होते व आरएसएसशी संबंधीत होते. मालेगाव २००८ च्या तपासामध्ये ले. कर्नल प्रसाद पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली होती. त्यावरून पूर्वीचे अनेक बॉम्बस्फोट उदा. समझोता एक्सप्रेस, मालेगाव २००६, अजमेर शरीफ २००७, मक्का मशीद (हैदाबाद) हे अभिनव भारताच्या अतिरेक्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.

२००७ साली झालेल्या अजमेर बॉम्बस्फोटाचा फेरतपास करण्यासाठी शासनाने २०१० साली विशेष तपास पथकाची (एस.आय.टी.ची) स्थापना केली. एसआयटीने अत्यंत प्रामाणिकपणे तपास करून सदरचा बॉम्बस्फोट आरएसएस, अभिनव भारत व जय वंदे मातरम् या संघटनांच्या अतिरेक्यांनी केल्याचे सबळ पुराव्यानिशी सिध्द केले व दि. २० आक्टोबर २०१० रोजी त्यांच्याविरूध्द कोर्टात दोषारोपपत्र पाठवून दिले.त्यांची नावे व त्यांची आरएसएस व इतर संघटनामध्ये धारण केलेली पदे खालीलप्रमाणे आहेत.
1) सुनिल जोशी : आरएसएसचे महू (मध्य प्रदेश) या जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक, 2) संदीप डांगे : शाजापूर (मध्य प्रदेश) या जिल्ह्याचे आरएसएसचे माजी (2005 ते 2008) जिल्हा प्रचारक 3) देवेंद्र गुप्ता : जामताडा (झारखंड) या जिल्ह्याचे आरएसएसचे जिल्हा प्रचारक 4) चंद्रशेखर लेवे : शाजापूर (मध्य प्रदेश) या जिल्ह्याचे आरएसएसचे जिल्हा प्रचारक 5) रामजी कालसंगरा : आरएसएस व अभिनव भारतचा कट्टर कार्यकर्ता 6) लोकेश शर्मा : जय वदे मातरम् व आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता 7) शिवम धाकड : जय वंदे मातरम व आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता 8) समंदर : जय वंदेमातरम् व आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता 9) प्रज्ञासिंग ठाकूर : ’जय वंदे मातरम’ व ’अभिनव भारत’ या मधील दुवा 10) स्वामी असीमानंद : आरएसएसचे ज्येष्ठ नेते व प्रमुख मार्गदर्शक

समझौता एक्सप्रेस बॉम्ब स्फोट २००७ : समझौता एक्सप्रेस या भारत व पाकिस्तान यांचे संबंध सौहार्दपूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या रेल्वेमध्ये १९ फेब्रुवारी २००७ रोजी, ती गाडी हरियाणा राज्यातून जात असताना, पानीपत जवळ मोठा स्फोट होऊन त्यामध्ये ६८ व्यक्ती मरण पावल्या होत्या व कित्येकजण जखमी झाले होते. हरियाणा पोलिसांनी या गुन्ह्यात पूर्वी जमा केलेले पुरावे व नंतर स्वामी असिमानंद यांनी दिलेल्या कबुलीजबाबाच्या आधारे एनआयए ने तपास पूर्ण केला व आरएसएस, अभिनव भारत व जय वंदेमातरम या संघटनांच्या अतिरेक्यांविरूध्द जून २०११ मध्ये कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींमध्ये 1) सुनिल जोशी 2) स्वामी असिमानंद 3) संदीप डांगे 4) लोकेश शर्मा 5) रामजी कलसंगरा 6) देवेंद्र गुप्ता वगैरेंचा समावेश होता.

नांदेड बॉम्बस्फोट : ५ एप्रिल २००६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड येथील पी.डब्ल्यू.डी. चे निवृत्त कार्यकारी अभियंता लक्ष्मण राजकोंडवार यांच्या घरात आरएसएस व बजरंग दलाचे काही अतिरेकी आर.डी.एक्स.चा एक शक्तीशाली बॉम्ब तयार करीत असताना प्रचंड स्फोट होऊन त्यात लक्ष्मण राजकोंडवार यांचा मुलगा नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे हे दोघेजण ठार झाले व योगेश देशपांडे, राहूल पांडे, मारूती वाघ व युवराज तुप्तेवार हे चौघेजण जखमी झाले. हे सर्व आरएसएस व बजरंग दलाचे सदस्य होते व ते अभिनव भारतच्या अतिरेक्यांच्या संपर्कात होते. जखमींपैकी राहूल पांडे, व दुसरा आरोपी संजय चौधरी यांची नार्को टेस्ट घेऊन त्यांचे जबाब नोंदविले असता त्यांनी आपण सर्व आरएसएस व बजरंग दलाचे सदस्य असल्याचे मान्य केले. तसेच परभणी (२००३), जालना (२००४), पूर्णा (२००४) येथील मशिदीवर आपणच बॉम्ब फेकले होते हेही मान्य केले व जो शक्तीशाली बॉम्ब आपण बनवीत होतो, तो ईदच्या दिवशी औरंगाबाद येथील सर्वात मोठ्या मशिदीवर फेकणार होतो अशी माहिती दिली. आपण पुणे व इतर ठिकाणी आरएसएस व अभिनव भारततर्फे घेण्यात आलेल्या अतिरेकी ट्रेनिंग कॅम्पमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याचेही त्यांनी उघड केले.
वरील जबाबांच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला व पुरेसा सबळ पुरावा गोळा करून खालील अतिरेक्यांच्या विरूध्द दोषारोपपत्र पाठविले.
1) राहूल पांडे 2) डॉ. उमेश देशपांडे 3) संजय चौधरी 4) हिमांशू पानसे (मयत) 5) लक्ष्मण राजकोंडवार 6) रामदास मुलांगे
7) नरेश राजकोंडवार (मयत) 8) योगेश विदूलकर 9) मारुती वाघ 10) युवराज तुप्तेवार 11) मिलिंद एकदाते
याशिवाय इतर अनेक व्यक्ती व संस्थांविरुध्द पुरावा असून त्यांच्याविरुध्द कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
उदा. ज्यांच्याशी प्रमुख आरोपी हिमांशू पानसे हा सतत संपर्कात होता ते मुंबईचे बालाजी पाखरे, पुणे येथील आकांक्षा रेझॉर्टमध्ये झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये अतिरेक्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देणारे पुण्याचे दोन प्रोफेसर प्रा. शरद कुंटे व प्रा. देव, नागपूर येथे घेण्यात आलेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण देणारे आयबीचे माजी वरिष्ठ अधिकारी (महाराष्ट्रातील वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी) यांच्याविरुध्द काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच ट्रेनिंग कॅम्प आयोजित करुन अतिरेक्यांना शस्त्रास्त्रांचे व स्फोटकांचे प्रशिक्षण देणार्‍या भोसला मिलिटरी स्कूल (नागपूर व नाशिक) यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट या संस्था आजही तरुणांना ’शारीरिक’, ’मानसिक’, ’सांस्कृतिक’ वगैरे विकासासाठी अनेक कॅम्प घेत असतात व त्यासंबंधी ते आपल्या वेबसाईटवर उघडपणे जाहिरात करीत असतात.
कानपूर (उ.प्र.) ऑगस्ट २००८ : २४ ऑगस्ट २००८ रोजी कानपूर (उ.प्र.) येथे बजरंग दलाचे राजीव मिश्रा आणि भूपिंदर सिंग हे दोन अतिरेकी बॉम्ब तयार करीत असताना स्फोट होऊन त्यात ते ठार झाले. फार मोठा स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असे तपासात आढळून आले. राजीव मिश्राच्या घरातून स्फोटकांचा एवढा मोठा साठा जप्त झाला की त्या स्फोटकांमुळे गुजरात किंवा बेंगलोरमध्ये झालेल्या विध्वंसासारखा विध्वंस होऊ शकला असता, असे कानपूर विभागाच्या आय.जी.नी वार्ताहरांना सांगितले.
कन्नूर (केरळ) नोव्हें. २००८ : १० नोव्हेंबर २००८ रोजी केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात बॉम्ब तयार करताना त्याचा स्फोट होऊन आरएसएसचे दोन दशहतवादी ठार झाले. दुसर्‍या दिवशी त्या परिसराची झडती घेत असताना सदर स्फोटाच्या जागेपासून 200 मीटर अंतरावर असलेल्या भाजपाचे नेते प्रकाशन यांच्या घरात पोलिसांना १८ क्रुड बॉम्ब सापडले. पोलिसांनी तपास पूर्ण करुन कोर्टात चार्जशीट पाठविले.
मडगाव (गोवा) ऑक्टोबर २००९ : १६ ऑक्टोबर २००९ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यातील मडगाव येथे सनातन संस्थेच्या अतिरेक्यांनी मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्या सायंकाळी दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने जेथे हिंदू जमा होणार होते, त्या ठिकाणी हा प्रयत्न झाला. परंतु अतिरेक्यांच्या दुर्देवाने व भारताच्या सुदैवाने बॉम्ब ठेवला जात असतानाच त्याचा स्फोट झाला व त्यामध्ये मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे सनातन संस्थेचे दोन अतिरेकी ठार झाले. नंतर पोलिसांनी दोन जिवंत बॉम्ब निकामी केले. योजना यशस्वी झाली तर मुस्लिमांवर संशय यावा अशी व्यवस्था अतिरेक्यांनी केली होती. स्फोटाच्या ठिकाणी एक शॉपिंग बॅग मिळाली. त्यावर ’खान मार्केट’ असे उर्दूत लिहिलेले होते व त्यात मुस्लिम वापरतात तशा प्रकारच्या अत्तराची बाटली होती. या मागील हेतू अगदी उघड होता. बॉम्ब ठेवताना स्फोट झाला नसता व दहशतवाद्यांच्या योजनेप्रमाणे नंतर स्फोट झाला असता तर आय.बी. व प्रसारमाध्यमातील ब्राह्मण्यवाद्यांनी मुस्लिम दहशतवादाचे भूत उभे केले असते. पण सुदैवाने तसे व्हायचे नव्हते. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून गोवा पोलिसांनी खालील ११ अतिरेक्यांविरुध्द दोषारोपपत्र पाठवून दिले.
1) मलगोंडा पाटील (बॉम्ब घेऊन जात असताना स्फोट होऊन मयत) 2) योगेश नाईक (बॉम्ब घेऊन जात असताना स्फोट होऊन मयत) 3) विनय तळेकर
4) विनायक पाटील 5) धनंजय केशव अष्टेकर 6) दिलीप माणगावकर 7) प्रशांत अष्टेकर 8) सारंग कुलकर्णी (फरारी) 9) जयप्रकाश उर्फ आण्णा (फरारी) 10) रुद्र पाटील (फरारी) 11) प्रशांत जुवेकर (फरारी). धनंजय अष्टेकरने पुण्यामध्ये एकूण 12 बॉम्ब बनविले होते. त्यापैकी 5 मडगाव (गोवा) येथे वापरण्यात आले. इतर बॉम्बचा कोठे वापर करण्यात आला, याचा तपास झालेला नाही.
तेनकाशी (तामिळनाडू) : २४ जानेवारी २००८ रोजी तमिळनाडूतील तिरुनेलवेदी जिल्ह्यातील तेनकाशी (दक्षिण काशी) येथील आरएसएसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीला मुस्लिम संघटनांवर संशय व्यक्त करण्यात आला. पण नंतर तमिळनाडू पोलिसांनी अत्यंत प्रामाणिकपणे व सखोल तपास करुन संघ परिवाराशी संबंधीत ८ व्यक्तींना अटक केली.
पनवेल : २० फेब्रुवारी २००८ रोजी मुंबईपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या पनवेल येथिल ’सिनेराज’ या चित्रपटगृहात ’जोधा अकबर’ चित्रपट दाखविला जात असताना बॉम्ब ठेवलेला आढळून आला. हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखालील एटीएसने तपास केला असता तो बॉम्ब सनातन संस्थेच्या अतिरेक्यांनी ठेवल्याचे निष्पन्न झाले. यासंबंधी आरोपींना अटक करून कोर्टात दोषारोपपत्र पाठविले आहे.
वाशी (नवी मुंबई) : ३१ मे २००८ रोजी वाशी, नवी मुंबई येथील एका प्रेक्षागृहात प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगेत ठेवलेले काही बॉम्ब, बॉम्ब डिटेक्शन व डिस्पोजल स्कॉडने निकामी केले. तपासामध्ये ते बॉम्ब सनातन संस्थेच्या अतिरेक्यांनी ठेवल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना अटक करून कोर्टात दोषारोपपत्र पाठविले. या गुन्ह्याचा निकाल लागून विक्रम भावे व रमेश गडकरी या सनातन संस्थेच्या दोन अतिरेक्यांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.
ठाणे : ४ जून २००८ रोजी ठाण्यातील ’गडकरी रंगायतन’ नाट्यगृहात एक बॉम्बस्फोट होऊन त्यात सात लोक जखमी झाले. नाट्यगृहात ’आम्ही पाचपुते’ या नाटकाचा प्रयोग व्हायचा होता. एटीएसने केलेल्या तपासात सनातन संस्था व हिंदु जनजागरण समिती या ब्राह्मण्यवादी संघटना या स्फोटामागे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पेण व सातारा येथून स्फोटकांचे मोठे साठे जप्त केले. तपास पूर्ण करुन पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र पाठविले. कोर्टाने विक्रम भावे व रमेश गडकरी याच दोन आरोपींना याही गुन्ह्यात दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली.
डीआरडीओ चा डॉ.प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिलेला आपली गुपिते पुरवतो. त्याच्या चार पिढ्यांपासून तो आरएसएसशी जुडलेला असतो. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘ब्राह्मोस’, ‘अग्नी 6’, ‘मिसाइल लाँचर’, ‘एमबीडीए’ आदी क्षेपणास्त्रांसह ‘रुस्तम’, ‘सरफेस टू एअर मिसाइल’, ‘इंडियन निकुंज पराशर’ या प्रकल्पांची आणि ‘डीआरडीओ’च्या कामांची माहिती डॉ. कुरुलकर याने पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरवल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे. हा नालायक देशद्रोही हिंदूच आहे म्हणून काय सर्व हिंदूंना देशद्रोही म्हणणार?
हे वरील सर्व आतंकवादी हिंदू आहेत. नव्हे, कट्टर हिंदू आहेत. कट्टरवादी हिंदूच असे दहशदवादी कृत्य करू शकतात. कट्टरवादी मुस्लिमच असे दहशदवादी कृत्य करू शकतात. खरा हिंदू किंवा खरा मुस्लिम असे कृत्य चुकूनही करणार नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिम आतंकवाद्यांना संपवून टाका ना, एकही आतंकवादी शिल्लक राहता कामा नये. अशी शिक्षा द्या की पुन्हा त्यांच्या घरात कुणी आतंकवादी कारवायात सामील होणार नाही. पाकिस्तान अशा अतिरेक्यांना मदत करतो तर पाकिस्तानला धडा शिकवा. संपवून टाका पाकिस्तानला जगाच्या नकाशातून, त्याला कुण्याही भारतीयाचा नकार नसेल. पण पाकिस्तानातील अतिरेक्यांनी हल्ला केला म्हणून भारतातील सरसकट मुस्लिम समाजाला दोष देत असाल तर यासारखा मूर्खपणा दुसरा नाही. भारतातील सगळे मुस्लिम हे आतंकवादी आहेत असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे की, आपल्या देशात २० लाख मुस्लिम आहेत. यापैकी फक्त १% (२० लाख) मुस्लिम जरी आतंकवादी असते तर या देशाची आज काय हालत असती? आपल्या देशाचे सक्रिय सैन्य फक्त साडे १४ लाख आहे. पण आपण हा विचार करत नाही आणि राजकारण्यांच्या अपप्रचाराला बळी पडतो. आयुष्यात एकही मुस्लिम मित्र नसणारे लोक मुस्लिम कसे वाईट आहेत याची गावभर पुंगी वाजवत राहतात तेव्हा चीड येते. देशभरातील न्यायालयांमधील प्रलंबित खटले बघाल तर ९५% खटले हिंदू विरुद्ध हिंदूंचे आहेत. अर्धे खटले तर नात्यातच असतील पण वाईट कोण तर मुस्लिम. जे मुस्लिम वाईट आहेत त्यांना शिव्या द्या ना, कोण नाही म्हणते. पण जे चांगले असतील तर ते ही मान्य करा.
जम्मू-काश्मीर पोलीसच्या तत्कालीन डीएसपी देवेंद्र सिंह याला जून २०२० मध्ये आतंकवादाच्या गुन्ह्यामध्ये जमानत देण्यात आली. वकिलांच्या म्हणण्यानुसार दिल्ली पोलीस मधील देवेंद्र सिंह यांच्या विरोधात निर्धारित वेळेत चार्जशिट म्हणजेच आरोपपत्र न दाखल केल्यामुळे दिल्ली कोर्टाने देवेंद्र सिंह याला जमानत दिली होती. देवेंद्र सिंह याला १३ जानेवारीला पुलवामा जिल्ह्यातील श्रीनगर- जम्मू नॅशनल हायवे येथे हिजबुल कमांडर सईद त्याचा साथीदार आतंकवादी रफी हैदर आणि हिजबुलचा एक भूमिगत कार्यकर्ता इरफान मिर यांच्यासोबत एका कारमध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र सिंह जम्मूला जात होता. डीएसपी देवेंद्र सिंह याचं काम चंदीगड आणि दिल्ली येथे आतंकवाद्यांची राहण्याची व्यवस्था करणे हे होते. संसद भवनवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूसोबत संबंध असल्याचा देखील ह्या देवेंद्र सिंहवर आरोप आहे. हा देवेंद्र सिंग शीख आहे.
गडकरी रंगायतन येथे जमलेले लोक, ‘आम्ही पाचपुते’ नाटक बघण्यासाठी आलेले लोक, गोव्यातील मडगाव येथे दिवाळी साजरी करण्यासाठी जमणारे लोक काय मुस्लिम असणार होते? काय ठाणे, पनवेल, मडगाव, नांदेड, अजमेर, मालेगाव ही ठिकाणे पाकिस्तानात येतात? मग हे सगळे आतंकवादी हिंदू आहेत तर काय असे म्हणणार की “प्रत्येक हिंदू हा आतंकवादी नसतो पण प्रत्येक आतंकवादी हा हिंदूच असतो?” नाही ना? प्रत्येकच धर्मात असे वाईट लोक आहेत म्हणून संपूर्ण धर्मालाच सरसकट वाईट ठरवणे चूकच आहे. भारतात काही जैन लोकांचे मोठे कत्तलखाने आहेत जिथे रोज लाखो गायी कापल्या जातात म्हणून काय संपूर्ण जैन धर्मालाच वाईट म्हणाल? चीन वारंवार आपल्याला त्रास देतोय, आपली जमीन बळकावतोय म्हणून काय जगातील संपूर्ण बुद्ध जनतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे कराल ? काही शीख खलिस्तानची मागणी करतात, देशविघातक कारवाया करतात म्हणून काय संपूर्ण शीख धर्मालाच गुन्हेगार ठरवाल?
त्यामुळे आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो. सर्वच धर्मात अशा प्रवृत्ती आहेत. प्रत्येक धर्मात ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यावर प्रहार करा, धर्मावर नव्हे. आतंकवादाला धर्म नसतो, प्रत्येकच धर्मात आतंकवादी आहेत. धर्मातील कट्टरवादामुळेच आतंकवादी जन्माला येतात. आतंकवादाचे मूळच धर्म आहे, स्वधर्माचा अभिमान आणि परधर्मीयांचा द्वेष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम या दोघांनीही हे स्वीकारलं पाहिजे की आपल्याला कायम सोबतच राहायचं आहे, दुसरे कोणतेही ऑप्शन आपल्याकडे नाही. मग आपण कायम एकमेकांची उणीदुणी काढून कण्हत कण्हत जगायचं की गाणे म्हणत? हे आपलं आपण ठरवायचं आहे.
-चंद्रकांत झटाले, अकोला
७७६९८८६६६६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!