महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

आर्यअष्टांगिक मार्ग भाग २७

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे. धम्मपदाच्या एकशेसाठाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की, अत्ताहि अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया। अत्तनाव सुद्न्तेन नाथं लभति दुल्लभं ॥ याचा अर्थ आपणच आपला मालक आहे. कोणी आपला मालक असू शकत नाही. स्वत:चा निग्रह करणारा दुर्लभ स्वामीत्व प्राप्त करीत असतो. ‘अत्त दिप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशीत व्हा, असे भगवान बुध्दाने सांगितले आहे. आपणास स्वत:चा उध्दार करायचा आहे. दुसरा कोणी आपला उध्दार करु शकत नाही. स्वत:चे जीवन पायरी पायरीने घडवायचे आहे. अष्टांगिक मार्गाचे पालन करुन आपण आपले जीवन उत्तमरितीने घडवू शकतो.

यो च बुध्दञ्च धम्मञ्च संङ्घ सरणं गतो । चत्तारि अरियसच्चानि समपञ्ञाय पस्सति ॥ दुक्खं दुक्ख्समुप्पादं दुक्खस्स च अतिक्कमं । अरियञ्चट्ठङ्‍कि मग्ग दुक्‍खुपसगामिनं ॥ एतं खो सरणंम खेमं एतं सरणमुत्तमं । एतं सरणमागम्म सठबङक्‍खा पमुच्चति ।। याचा अर्थ म्हणजे बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे, चार आर्यसत्यांना म्हणजे दु:ख, दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:खाचा निरोध करण्याचा मार्ग, यासाठी आर्यअष्टांगिक मार्ग प्रज्ञेद्वारे योग्य प्रकारे जाणून घेणे हेच कल्याणकारी उत्तम शरण होय. हेच शरण ग्रहण केल्याने मनुष्य सर्व दु:खापासून मुक्त होतो. बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे म्हणजे बुध्दाचे जे गुण आहेत त्याचे अनुसरण करणे, धम्माला आपल्या जीवनात उतरविणे आणि संघामध्ये असलेले गुणाचे अनुसरण आपल्या जीवनात करणे होय. आर्यअष्टांगिक मार्ग जो दु:खमुक्तीचा मार्ग आहे त्याला आपल्या जीवनात उतरविणे, त्या मार्गावर आरुढ होणे, हेच आर्यअष्टांगिक मार्गाचे अनुसरण होय.

आर्यअष्टांगिक मार्ग हा पाली ‘अरियअठठाङिगक-मग्ग’ याचा पाकृत अनुवाद आहे. चार आर्यसत्यामधील चवथे आर्यसत्य म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्ग होय. आर्यअष्टांगिक मार्ग हा मनुष्याला प्रकाश देणारा आहे. आपले संपूर्ण श्रेष्ठतम जीवन आणि व्यक्तिमत्व घडविणारा मार्ग होय. या मार्गानुसार जीवन जगले तर आनंद प्राप्त होतो. जीवन सुखी आणि समाधानी बनते.

भगवान बुध्दांनी सर्वप्रथम सारनाथ येथे पाच परिव्राजकांना मध्यम मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. त्यांनी आर्यअष्टांगिक मार्गाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच त्यांचे अंतिम शिष्य सुभद्र यांना सुध्दा आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुध्द सुभद्राला म्हणतात, “सुभद्र, ज्या धर्म विनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध नाही तेथे प्रथम श्रमण- श्रोतापन्न, द्वितीय श्रमण- सकृदागामी तृतीय श्रमण- अनागामी व चतुर्थ श्रमण- अहर्त उपलब्ध होत नाही. ज्या धर्मविनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध होतो तेथे प्रथम श्रमण- श्रोतापन्न, द्वितीय श्रमण- सकृदागामी तृतीय श्रमण- अनागामी व चतुर्थ श्रमण- अहर्त उपलब्ध होतो. याप्रमाणे भगवान बुध्दांनी सांगितलेला आर्यअष्टांगिक मार्ग हा सत्याचा मार्ग असून तो अत्यंत श्रेष्ठतम आणि महत्त्वपूर्ण आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.९.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!