स्मशानभूमी साठी रस्ता नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; 600 मतदार असलेल्या वाघवाडी गावचा निर्णय

अहमदनगर : पाच वर्ष दुर्लक्ष करून निवडणुका आल्या की मत मागायला येणाऱ्या नेत्यांना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकवायच ठरवलंय. जोपर्यंत गावातील श्मशानभूमीला जायला चांगला रस्ता मिळत नाही; तोपर्यंत मतदार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
अहमदनगरपासून जिल्ह्यातील वाघवाडी या गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे. गावची लोकसंख्या साधारण ११५० इतकी आहे. गावामध्ये ६०० मतदार आहेत. छोटं गाव असल्यामुळे जेऊर बायजाबाई ही ग्रामपंचायत वाघवाडी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी वन विभागाची दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांना मिळाली आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने स्मशानभूमी मिळवूनही ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जेऊर गावातील स्मशानभूमीकडे तीन किलोमीटर लांब जावं लागत आहे.
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रोड नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी नागरिक समोर येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यातूनच अहमदनगर शहरा शेजारी असलेल्या वाघवाडी येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीचा रस्ता मिळावा; यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक वेळेस प्रशासनाकडे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही. निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी आलेले नेते स्मशानभूमीच्या रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे आता जोपर्यंत रस्ता मिळत नाही; तोपर्यंत मतदार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. निवडणूक आता चांगले रंगात आली असून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना आता अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत