आर्थिकनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

देशाचे अर्थकारण व राजकारण !

सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून सगळे राजकीय पक्ष युती- आघाडी बनवून अथवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे अर्थकारण व राजकारण समजून घेणे गरजेचे झाले आहे.

तारीख 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत जाहीर झाला असून तो सन 2024-25 असा एका वर्षाचा आहे. या वर्षी निवडणुका असल्याने हा हंगामी अर्थसंकल्प आहे. तरीही या वर्षी आपला भारत देश किती खर्च करणार आहे ? तारीख 2 फेब्रुवारी 2024 चा “बिजनेस स्टॅंडर्ड” हे अर्थविषयक दैनिक सांगते कि , चालू वर्षी आपला प्रिय भारत देश एकूण ₹45,65,768/- कोटी एवढा निधी खर्च करणार आहे !

एका वर्षाला ₹47,65,768/- कोटी , याचा अर्थ पाच वर्षाला ₹47,65,768/- गुणिले पाच म्हणजे ₹2,38,28,840/- कोटी ! देशाची राजकीय सत्ता मिळवणे याचा खरा अर्थ असा कि , या ₹2,38,28,840/- कोटी निधीचे मालक होणे ! तुमच्या आजूबाजूला जो काही युती- आघाडी बनवण्याचा किंवा पक्ष- संघटना यांच्या फोडफोडीचा खेळ चालला आहे तो याच ₹238/- लाख कोटींचे मालक होण्यासाठी ! म्हणून भारताची लोकसभेची निवडणूक याच ₹238/- लाख कोटींचे मालक होण्यासाठी लढवायची असते , हे सर्वप्रथम लक्षात घ्या !

तर भारताचे राजकारण करायचे याचा खरा अर्थ असा कि , या ₹238/- लाख कोटींचे मालक होण्यासाठी लोकसभेच्या 543 जागा लढवायच्या आणि त्यापैकी किमान 272 जागा निवडून आणायच्या ! जी राजकीय संघटना या 272 जागा निवडून आणील तीच या ₹238/- लाख कोटींची मालक होईल , अशी ही साधी सरळ घटनामान्य प्रक्रिया आहे.

आज लोकशाही आहे. लोकशाहीत जनतेला मताधिकार असतो. याचा अर्थ असा कि , लोकशाहीत मताधिकार वापरून ही जनता ₹238/- लाख कोटींचे मालक निवडू शकते ! तुमचा मताधिकार किती मौल्यवान आहे , हे यांवरुन लक्षात येते. मुळात तुमच्या मताची किंमत पैशात होऊच शकत नाही. परंतु ती करायची असेल तर भारताच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता ती कमीत कमी ₹238/- लाख कोटी एवढी आहे ! एवढे दोनशे अडतीस लाख कोटी रुपयांचे महागडे मत तुम्ही केवढ्याला विकता ? अर्धी दारूची बाटली ? एक किलो बिर्याणी ? पाचशे रुपयाच्या दोन-चार हिरव्या नोटा ? कित्ती हुश्शार आहोत आपण !!!

सिद्धार्थ नगर , गौतम कॅालनी , महात्मा फुले नगर , डॉ आंबेडकर कॅालनी अशा वस्त्यांत राहणाऱ्या भारत देशाच्या “जागृत” नागरिकांना आपल्या मताधिकाची किंमत माहित नसते. म्हणून ते अर्धी दारूची बाटली , एक किलो बिर्याणी , पाचशे रुपयाच्या दोन- चार नोटा एवढ्या मामुली किंमतीत आपले ₹238/- लाख कोटींचे मत विकतात. परंतु शिवाजी पार्क , विलेपार्ले , ठाणे- डोंबिवली , सदाशिव पेठ अशा ठिकाणी राहणाऱ्या ब्राह्मण जातीच्या जागृत नागरीकांना मात्र आपल्या मताधिकाराची किंमत माहित असते. म्हणून ते आपले मत कधीही विकत नाहीत. विशेषतः मनुवादी ब्राह्मण तर एक वेळ आपले मत आपल्याच जातीच्या हरणाऱ्या उमेदवाराला देतील, परंतु ते दुसऱ्या विचारसरणीच्या संघटनेला विकणार नाहीत. त्यांना माहित असते कि , या मतदार संघात आमचा मनुवादी ब्राह्मण अथवा मनुवादी उमेदवार पराभूत झाला तरी त्याला पडणारी मते ही पुढील निवडणुकीत जागावाटप करताना उपयोगी पडतात ! म्हणून ते आपल्या हरणाऱ्या उमेदवाराला देखील मत देतात. मागील चाळीस वर्षात असा खेळ करीत करीत त्यांनी आजचे आपले स्थान तयार केले आहे. सबब , आपल्या संघटनेचा माणूस हरणारा असला तरी तुमचे मत वाया जात नाही, हे सिद्धार्थ कॅालनी , डॉ आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या “जागृत” नागरीकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

आपला मूळ मुद्दा असा कि , आपल्या भारत देशाच्या पाच वर्षाच्या अर्थसंकल्पांतून मिळणाऱ्या या ₹238/- लाख कोटी निधीचे मालक कसे व्हावे ? त्यासाठी आपल्या फुले- आंबेडकरवादी संघटनांना लोकसभेच्या 543 मतदार संघात उमेदवार उभे करावे लागतील. दुसरे म्हणजे हे 543 मतदारसंघ जिंकून येण्यासाठी तिथे मशागत करावी लागेल !

मतदार संघात निवडून येण्यासाठी मतदार संघाची खडानखडा माहिती असावी लागते. तिथे कोणकोणत्या समाजाच्या वस्त्या आहेत , या वस्त्यांच्या काय समस्या आहेत , तिथे कोणत्या संघटना आहेत , या संघटना चालवणारी माणसे कोण आहेत , एखाद्या वस्तीत कोणाला किती मानसन्मान आहे , कोणाविषयी कोणाचे काय मत आहे , ही सगळी माहिती काँप्युटर मध्ये भरून तिचा अभ्यास करुन , त्याप्रमाणे मतदारसंघात जनसंपर्क ठेवून मग निवडणूक लढवली जाते ! असा अभ्यासू उमेदवार एखादी लोकसभेची निवडणूक हरला तरी त्याच मतदारसंघातील विधानसभेची किंवा नगरसेवकाची निवडणूक जिंकू शकतो ! समजा , विधानसभा वा नगरसेवकाची निवडणूक जिंकला नाही तरी पुढील निवडणुकीत त्याला मिळालेल्या मतांच्या आधारे जागावाटपाची बोलणी करून आपल्या पदरात जास्तीत जास्त कसे पडेल , याची आखणी करू शकतो. आणखीही खूप काही करू शकतो !

आपल्या फुले- आंबेडकरवादी संघटना एवढे मोठे ध्येय समोर ठेवून निवडणुका लढवतात काय ? “आम्हाला आपल्या महान भारत देशाच्या पाच वर्षाच्या अर्थसंकल्पातून मिळणाऱ्या ₹238/- लाख कोटींचे मालक व्हायचे आहे” हेच आमच्या गौतम नगर मधील “जागृत” कार्यकर्त्याला माहित नसते ! त्यामुळे तो बजेट वगैरे समजून घेण्याच्या भानगडीतच पडत नाही ! ‘आमच्या डॉ बाबासाहेबांनी एवढा मोठ्ठा अभ्यास करून ठेवलाय मग मला आणखी अभ्यास करायची गरज काय ?’ यांवर त्याचा ठाम विश्वास असतो. जो काही थोडाफार अभ्यास करायचा असतो तो “आमचे वर बसलेले साहेब” करतीलच ! मी कशाला अभ्यास करु ? साहेब सांगतील तिथे मत द्यायचे व मोकळे व्हायचे , हा त्याचा खाक्या ! आता कधी कधी साहेब काहीच सांगत नाहीत , किंवा सांगितले तरी जिभेला बिर्याणी खायची लई इच्छा झालेली असते. नेमकी निवडणुकीच्या वेळेस अशी “विच्छा” झाल्यावर हा कार्यकर्ता कोणाचे काय ऐकतो होय ! तो आपला बिर्याणी चारणाऱ्याला मत देतो व बाहेर येवून जोरात जयभीम बोलतो ! च्यामारी ! कसली शासनकर्ती जमात अन कसले काय ! असे “जागृत” कार्यकर्ते वेळप्रसंगी जिथे आपल्या साहेबांचे पण ऐकत नाहीत तिथे तुमची आमची काय कथा ?

सदाशिव पेठ येथे राहणारे जागृत नागरीक व गौतम नगर येथे राहणारे “जागृत” नागरीक यांच्यात असा फरक आहे ! अशा परिस्थितीत सदाशिव पेठेत श्रीमंती ओसंडून वाहू लागली व आमचे गौतम नगर दारिद्रयात खितपत पडले तर दोष कोणाचा ? अशा अवस्थेत गौतम नगरच्या सामान्य नागरीकाला अर्थसंकल्पातील त्याचा हिस्सा मिळणार कसा ?

कोणाकडे उत्तर असेल तर कृपया सांगावे !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!