महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

विज्ञान विरोधी धर्म !

लेखन संकल्पना – अंधश्रध्दा निर्मूलन समिती.

गॅलिलिओ आणि संत तुकाराम यांचा काळ जवळजवळ एकच. तिकडे गॅलिलिओ बायबलला आव्हान देत होता, आणि इकडे तुकाराम ” वेदांचा तो अर्थ अम्हासीस ठावा। येरांनी वाहावा भार माथा।।” म्हणत बंडाच्या पवित्र्यात होते. भारतामध्ये रूढार्थाने त्या काळी विज्ञानाची परंपरा सुरू झाली नसली तरी शब्दप्रमाण्याला आव्हान देणे आणि धर्माची चिकित्सा करणे याची खूप मोठी परंपरा चार्वाकापासून महावीर, बुद्धापर्यंत तर महात्मा बसवेश्वरापासून तुकारामांपर्यंत आलेली दिसते. अर्थात शब्दप्रामाण्य नाकारण्याची किंमत सर्वांना मोजावी लागली आहे. चार्वाकांना भस्मसात करण्यात आले, त्यांचे साहित्य जाळून टाकण्यात आले, राजाच्या दरबारात बसवेश्वरांवर हल्ला झाला, सर्व संतांना अचानक समाध्या दिल्या गेल्या. तुकारामांसाठी तर डायरेक्ट विमान बोलवण्यात आले!

खरेतर धर्म आणि विज्ञान ह्या दोन्ही बाबी मानवाचे जीवन अधिक चांगले व्हावे म्हणून जन्माला आल्या.
मात्र नंतर हितसंबंधीयांच्या स्वार्थापोटी धर्म माणसावर बंधने आणत गेला आणि विज्ञान माणसाचे क्षितिज वाढवत गेले.
धर्म मुठभर पुरोहितवर्गाचे रक्षण करण्यासाठी धडपडत असतो तर विज्ञान संपूर्ण मानवजातीचे कल्याण कसे होईल याचा विचार करत असते.
धर्म डोळे झाकून विश्वास ठेवायची आज्ञा देतो तर विज्ञान चिकित्सा करायला शिकवते.
त्यामुळे धर्म आणि विज्ञानाचा संघर्ष अटळ होता. धर्माने अनेक वर्ष विज्ञानाची गळचेपी केली. ज्या कुणी छोटामोठा विद्रोह केलेला दिसला की धर्माने त्याला तातडीने त्याला गाडून टाकलेच. कारण धर्ममार्तंड जरी म्हणत असले की, धर्माकडे सगळ्यात प्रश्नांची उत्तरे आहेत तरी त्यांना त्यातील फोलपणा माहीत असतो. अशा वेळेस विरोध करणाऱ्यांना गप्प करण्यासाठी त्यांचा छळ करणे किंवा त्यांना जाळून मारणे किंवा गोळ्या घालणे एवढेच त्यांच्या हातात असते.

दुर्बिणीच्या साहाय्याने सौर वादळे गॅलिलिओने सर्वात प्रथम टिपली. गुरुचे चार उपग्रह शोधून काढले. कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला यामुळे पुष्टी मिळत होती, आणि ॲरिस्टॉटल, टॉलेमी भंगारच्या भावात निघत होते. सहाजिकच चर्चचा त्यांच्यावर खूप रोष झाला आणि त्यांना माफी मागण्यासाठी फर्मावले गेले. गॅलेलियो गौतम बुद्धासारखे म्हणायचा, “मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः तपासून बघा.”
मात्र आम्ही स्वतः चिकित्सा करणार नाही आणि तुम्हाला देखील करू देणार नाही अशी धर्माची पूर्वापार परंपरा. गॅलेलिओचा अतोनात छळ करण्यात आला त्याला कारागृहात टाकण्यात आले त्यातच त्याची दृष्टी देखील गेली. त्या अवस्थेत त्याने विज्ञानविषयक ग्रंथ पूर्ण करून हॉलंडमधून छापून घेतला. अखेर कारागृहातच १६४२ साली त्याचा अंत झाला.

ब्रुनो म्हणायचा धर्म कोणत्या ग्रंथात बंदिस्त नसतो, धर्मावर चर्चा झाली पाहिजे. पण चर्चेसाठी तर्क हवा ना? धर्माकडे तर्काचा अभाव असतो. ब्रुनोवर खटला चालवला गेला, त्याला आठ वर्ष कारागृहात सडवत ठेवले. त्याला माफी मागायला सांगितली. मात्र त्याला स्वत:च्या जीवापुढे तत्व महत्त्वाचे वाटले. शेवटी १७ फेब्रुवारी १६०० मध्ये त्याला भर चौकात जाळण्यात आले. मृत्यूपूर्वी तो एक वाक्य बोलून गेला, “कदाचित मला मृत्यू समोर आल्यावर जेवढी भीती वाटत आहे, त्यापेक्षा जास्त माझी भीती तुम्हाला वाटते आहे म्हणून तुम्ही मला शिक्षा फर्मावत आहात.” असे बोलणे तर चर्चला चांगले झोंबले. पण आजच्या चर्चचा मोठेपणा हा की काही वर्षांपूर्वी चर्चकडून अन्याय झालेल्या या सर्व वैज्ञानिकांची त्याने माफी मागितली. पण संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांनी मात्र कधीही आपल्या पूर्वजांच्या दुष्कृत्यांची माफी मागण्याचे धाडस दाखवले नाही.

विज्ञान जन्म घेते वैज्ञानिक दृष्टिकोनातून, त्यासाठी व्यक्तीला का? कसे? हे प्रश्न पडले पाहिजेत. पण धर्माला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणारे नकोच असतात. त्यामुळे धर्म मार्तंड नेहमी विचारांपेक्षा श्रद्धेवर भर देतात. विचार करू नका म्हणून सांगतात. फक्त मनोभावे देवाला पूजा म्हणजे तुमचे कल्याण होईल, असे पोकळ आश्वासन देतात. विज्ञान मात्र मानवाचे कल्याण करण्यासाठी अहोरात्र झटत आहे त्यामुळेच माणसाच्या आयुष्य, आरोग्य वाढीस लागलेले आहे.

थोडक्यात काय तर धर्म आणि विज्ञान यांच्यात संघर्ष अजून सुरूच आहे… संपला नाही… पण एक दिवस नक्की संपेल… आणि धर्म डब्यात बंदिस्त होऊन विज्ञानाचा विजय झाला असेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!