महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

हळदीच्या कार्यक्रमाऐवजी धम्मदीक्षा विधी – एक क्रांतिकारी पर्याय

आपल्या मंगल परिणय कार्यक्रमात हळद, बांगड्या, मेहंदी, अहेर इत्यादी रिती रिवाज होत असतात. स्वताला बौद्ध म्हणवून घेणारे समाजबांधव सुद्धा हिंदू धर्मातील हा हळदीचा कार्यक्रम पुर्ण धार्मिकतेने आयोजित करतात. परिणय कार्यक्रम विशेषतः सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रविवारला असला की, एक दिवस पहिले शनिवारला हळदीचा कार्यक्रम ठेवलेला असतो. परंतु शनिवार हा हिंदू धर्मातील पंचांगानुसार अशुभ दिवस आहे. हिंदू धर्मातील लोकं या दिवशी शुभ कार्य करीत नाहीत. देवाचा आणि ग्रहाचा कोप होतो अशी श्रद्धेच्या नावाखाली प्रत्येकांच्या डोक्यात बिंबवलेला मनोविकार आहे. ही मानसिकता इतकी खोलवर रूजली आहे की वर किंवा वधूच्या भावी जीवनात काही वाईट, अशुभ घडू नये म्हणून हळदीचा कार्यक्रम हा शनिवारला न घेता रात्रो बारा वाजल्यानंतर नंतर म्हणजे रविवारी हळदीचा कार्यक्रम घेतला जातो. रात्रौचे बारा वाजेपर्यंत समाजबांधव व पाहुणे मंडळी राहणार नाही म्हणून तो पर्यंत हळदीच्या जेवणाचा आणि डीजेवर नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू असतो. तसेच काही अनुयायी तर छातीठोकपणे आज शनिवार असल्याने हळदीचा कार्यक्रम जमत नसल्याचे रात्रीचे बारा वाजल्यानंतर घ्यावा लागतो, असे आवर्जून सांगून विनंती करून हळदीच्या कार्यक्रमाला थांबविल्या जाते. आणि हिंदू धर्मातील रूढी, परंपरा, रिती रिवाजाचे तंतोतंत पालन करण्यात येत असते. बरे हा कार्यक्रम एखादा खेड्यापाड्यातील अशिक्षित बांधव करीत असेल तर त्याला उपदेशाचे डोस तरी पाजता येईल.मात्र हिंदू रूढीचे पालन करण्यात मोठ्या गर्वाने बौद्ध म्हणून सांगणाऱ्या सुशिक्षित कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्म आणि त्यातील जातीचा त्याग करण्यास व जाती विरहित ‌बौद्ध धम्म दिला असल्याने बौद्ध धर्माच्या संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे. हिंदू धर्मातील रूढी, परंपरा, रिती, रिवाज, संस्कार, संस्कृती इत्यादींचा पुर्णपणे त्याग करण्यासाठीच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. अशावेळी जाणते उपासक, बौद्धाचार्य यांनी बौद्ध धम्माबाबत ताठरतेची भूमिका घेऊन समयोचित मार्गदर्शन करायला पाहिजे. मात्र समाजातील काही गटाची जातीला चिकटून राहण्याची लेचीपेची भूमिका घेत असल्याने जुन्या रूढी परंपरेसाठी आपल्याच संघटना जाती विरहित ‌बौद्ध धम्म निर्माण करण्यासाठी अडचणी ठरू पाहात आहे. वास्तविकता आपला हिंदू धर्मातील रूढी परंपरेचा बौद्धाशी तिळमात्र संबंध नाही. मात्र असे आपण वारंवार बजावून सांगितले पाहिजे. तसेच बाबासाहेबांच्या अनुयायी, कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांशी तडजोडीचे वर्तन न करता नित्यनेमाने बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे पालन करावयाचे आहे.

बाबासाहेबांच्या वैचारिक अनुयायी, कार्यकर्त्यांना बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करावे असे मनोमन वाटत असते. परंतु असे म्हणणाऱ्यांची संख्या शुल्लक असल्याने व हिंदू धर्मातील रूढी परंपरेचे पालन करणाऱ्या खुशाल चेंडूची संख्या अधिक असल्याने वैचारिक अनुयायी कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला, शब्दाला कोणीच किंमत देत नाही. तसेच आम्ही तर हिंदू धर्मातील या रूढी परंपरेला मानत नाहीत परंतु आमचे आईवडील, आजा- आजी यांचा आग्रह असल्याने त्यांच्या इच्छेखातर हा कार्यक्रम करावा लागतो असे तकलादू व लंगडे कारण सांगून हात झटकून मोकळे होतात. वास्तविकता काही अती हौशी आपल्या मुलाबाळांच्या लग्नवेवात आमची इच्छा पुर्ण करुन घ्यायची नाही, अशा वेळी मिरवायचे नाही तर काय गडदेत गेल्यानंतर मिरवायचे काय असे ठसक्यात बोलून आपल्या कृतींचे समर्थन करीत असतात आणि उपकारकर्त्या बाबासाहेबांच्या विचारांला पार धुडकावून लावत विरोध करीत असतात.

बाबासाहेबांनी जगातील एकमेव आदर्श बौद्ध धम्माची रितसर दीक्षा काय घेतली. आपल्या समवेत आपल्या समाज बांधवांनी सुद्धा हिंदू धर्मातील जातीभेदाचा, अस्पृश्यतेचा नरकवास सोडून माझ्या सोबत न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता यावर आधारित बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी सांगितले. जास्तीत जास्त अनुयायी, कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या सोबत बौद्ध धम्माची दीक्षा तर घेतली. बाबासाहेबांनी हा धम्मदीक्षेचा अतिभव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम बाबासाहेबांच्या दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या संस्थेमार्फत घडवून आणला होता. त्यामुळे आपल्या धार्मिक प्रचार आणि प्रसाराचे लक्ष्य दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया व यांचे ध्येय आणि उद्दिष्टे जनमानसात रूजविणे हेच असले पाहिजे.

बाबासाहेबांचे धम्म दीक्षे नंतर लवकरच महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे जुन्या हिंदू धर्मातील रूढी, परंपरा, रिती, रिवाज सोडण्यासाठी फार मोठ्या व्यापक आणि अविरत प्रमाणात जनजागृती करयला पाहिजे होती. ती झाली नसल्यामुळे बौद्ध धम्मात सुद्धा हिंदू धर्मातील रूढी, परंपरेची भेसळ आलेली आहे.

बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या संघटना संघटनेच्या संविधानानुसार एकमत, बहुमताचा आदर न करता स्वार्थी आणि अहंकाराच्या चक्रव्यूहात सापडल्यामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रासोबतच धार्मिक क्षेत्रात गटबाजीने पोखरून धम्म दीक्षेची प्रक्रिया, धम्म जनजागृती याची गती मंदावली आहे. स्वाभिमानापेक्षा भाकरी अधिक महत्त्व दिले असल्याने बहुतांश अनुयायी, कार्यकर्त्यांनी हे नावापुरते नामधारी बौद्ध झाले आहेत. तत्कालीन हिंदू धर्मातील महार समाज बौद्ध धम्माची दीक्षा न घेता स्वताला जन्मसिद्ध बौद्धच समजू लागला आहे. अर्थात असे लोकं बाबासाहेबांच्या संघटनात्मक विचारांच्या विपरीत, विसंगत वागणारे ना हिंदू धर्मातील राहिले ना बौद्ध धर्माचे झाले. हे मध्यंतरी असून नपुंसक धर्मिय झाल्यासारखे वाटते.

हिंदू धर्मातील रूढी परंपरा सोडण्यासाठी तत्कालीन अनुयायी, कार्यकर्त्यांनी सुद्धा भरपूर प्रमाणात प्रयत्न करून पाहिले. जुन्या हिंदू धर्मातील हळदीकुंकू, बांगड्या, अक्षता या कार्यक्रमासोबतच हळदीचा कार्यक्रमाला एक मनोरंजनात्मक स्वरूप मिळाल्याने हा कार्यक्रम प्रत्येक समाज बांधवांच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे हळदी कार्यक्रम सोडून लग्न सोहळा साजरा करण्यास कोणी पुढाकार घेत नाहीत. तसेच असे कार्यक्रम मोडवयास तेवढ्याच ताकदीचा योग्य पर्याय दिला पाहिजे. आणि अशा पर्यायी कार्यक्रमाचा फार मोठ्या प्रमाणात वाजागाजा आणि प्रसार आणि प्रचार करून भरपूर प्रसिद्धी व व्यापक प्रतिसाद मिळाला पाहिजे. हिंदू धर्मातील या रूढी परंपरा त्यागल्या पाहिजे. असे धम्म चळवळीतील कार्यकर्ते पोटतिडकीने बोलून दाखवितात. मला वाटते या रूढी परंपरेवर पर्यायी व प्रभावी उपाययोजना केल्यास हिंदूंच्या धार्मिक रूढी परंपरा पासून आपल्या समाजाला सुटकारा मिळण्यासोबतच धम्म कार्याला रचनात्मक हातभार लावता येतो.

बंधूंनो! मुस्लिम धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येकांना आणि मुस्लिम बाह्य धर्मातील लोकांना सुद्धा हजरत मोहम्मद पैगंबर यांचें अनुयायी बनून मुस्लिम म्हणून जगण्यासाठी मुस्लिम धर्मातील प्रत्येकाला दीक्षा घेणे अत्यंत आवश्यक अट आहे. त्यासाठी सुंता ही धार्मिक विधी आहे. मुस्लिम धर्मगुरू, मौलानांकडून सुंता ही धार्मिक विधी करून दीक्षा समारंभ घडवून आणतात आणि रितसर दीक्षा देऊन मुसलमान बनविण्यात येते. ख्रिश्चन धर्मात ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू, पाद्री यांच्या कडून प्रत्येकांच्या घरी बाप्तिस्मा हा धार्मिक विधी करून ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाते. तसेच ब्राह्मण धर्मात प्रमुख ब्राह्मण पंडित, धर्मगुरूंच्या कडून ( जाणवे घालण्याचा विधी ) मुंज, उपनयन हा धार्मिक विधी करून ब्राह्मण धर्माची दीक्षा दिली जाते. जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत त्या समाजातील व्यक्तींना शास्त्रशुद्ध ब्राह्मण घोषित करण्यात येत नाही आणि त्यांचे लग्न होत नाही. तशी ब्राह्मण समाजात मुंज, उपनयन हा विधी संस्कार खर्चिक असला तरी कमीतकमी लग्नाच्या पहिले तरी ब्राह्मण धर्मगुरू कडून जाणवे घालण्याचा विधी, हा संस्कार विधी करवून घ्यावा लागतो. आणि धर्मावर निष्ठा, श्रद्धा असणारे अनुयायी असा विधी पुर्ण धार्मिकतेने आयोजित करतात.

आपल्या समाजात छोटा मोठा का असेना नामकरण, बारसे, वाढदिवस कार्यक्रम,विद्यारंभ विधी समारंभ, साक्षगंध, शालमुंदी, सगाई, मंगल परिणय विधी, अंतिम संस्कार, पुण्यानुमोदन, गृहप्रवेश, उद्घाटन, मुर्ती प्रतिष्ठापना इत्यादी कार्यक्रम आयोजित करीत असतोच. तसेच धम्माच्या वाढीच्या दृष्टीने घरोघरी जाऊन धम्म प्रसार आणि प्रचारासाठी धम्मदीक्षा विधींचे असे क्रांतिकारी पाऊल उचलले पाहिजे.

हिंदू धर्मातील रूढी परंपरा रिती रिवाज संस्कार आणि संस्कृती पुर्णपणे त्यागावयाची असेल तर बौद्ध संस्कार विधीला प्राथमिकता देत बौद्ध धम्मातही धम्मदीक्षा विधी धम्म संस्कारांचा एक भाग म्हणून घरोघरी करणे आवश्यक आहे. बौद्ध धम्मातील निष्ठावान भंते, अनुयायी, प्रचारक, बौद्धाचार्य, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे मंगल परिणय कार्यक्रम आहे, अशा घरी जाऊन धम्मदीक्षेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

मंगल परिणय कार्यक्रमाच्या लग्न पत्रिका, निमंत्रण पत्रिकेवर वेळ, स्थळ व भोजन यांचे विशेष रकाने असतात. आपल्यात नाही पण अन्य धर्मातील निमंत्रण पत्रिकेवर देवकार्य आणि हळदीचा (कॉलम) रकाना असतो. आपल्यातील काही सुज्ञ, बुद्धीजिवी हळदीच्या कार्यक्रमाची वेगळी निमंत्रण पत्रिका काढून जवळच्या आप्तेष्टांना विशेष निमंत्रित करतात आणि मोठ्या धुमधडाक्यात दारूपाण्याच्या पुरवणीसह साजरा करतात.

ह्याच पद्धतीने बौद्धांनी हळदीच्या कार्यक्रमाऐवजी धम्मदीक्षेबाबत मार्गदर्शन करून मंगल परिणय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत धम्मदीक्षेचा वेळेचा रकाना ठेवून हळदीच्या कार्यक्रमाऐवजी दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या माध्यमातून धम्मदीक्षा घेण्याचे अभियान सुरू करण्यात यावा आणि गोडधोड खाऊ घालून समारोप करण्यात यावे. अन्य धर्मीयांसारखा धम्मदीक्षेचा प्रघात पडून धम्म जागृतीस व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी योग्य पर्यायाची या माध्यमातून मदतच होईल, यांत शंका नाहीं.

-अशोककुमार उमरे,
8698842402
बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक,
दर रविवारी धम्म आपल्या दारी
धम्म जागृती अभियान
निळाई, सिद्धार्थ विहार, गडचांदूर
त. कोरपना जि. चंद्रपूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!