जोतिबांचा प्रस्थापित समाजव्यवस्थे विरुध्दचा विद्रोह

दि.२३ मार्च २०२४. जागर -४——राजाराम सूर्यवंशी .
जोतिबांचा चौथा उन्मेष म्हणजे निसर्गाची देणं असलेलं पाणी सर्वासाठी व विशेषतः अस्पृश्यांसाठी खुलं करण्याचा प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुध्दचा विद्रोह करणं !
जातिभेदरुपी विषमतेने पेशवाईच्या काळात उच्छाद मांडला होता .कोकणस्थ ब्राह्मणांच्या स्त्रीया देशस्थ ब्राह्मणांच्या स्त्रियांचे अन्न घेत नसत . तर काही देशस्थ ब्राह्मण कोकणस्थांच्या पंक्तीत बसत नसत . या प्रकारामुळेच जातिजातीत उच्चनीचतेचे प्रस्थ माजले होते . हे लोण खाली खाली पाझरुन ब्राह्माण जातीने इतर सर्व जातींच्या हातचे पाणी पिण्याचे प्रथम बंद केले .त्याला धर्माचा आधार दिला .ब्राह्मणांचे स्वतंत्र हौद व पाणवठे निर्माण केले . इतर जातींनी ब्राह्मणांना स्पर्श केल्यास स्वतःस पाप लागेल अशी त्यांच्यात खोटी भावना निर्माण केली.
यात सर्वाधिक मारा अस्पृश्य समाजावर पडला . त्यांना सर्व प्रकारचे हौद व पाणवठ्यांना स्पर्श करण्यास मनाई केली . जातिभेदाच्या कठोर माऱ्याने अस्पृश्य समाजाचे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत भयंकर हाल होत होते .
एखादा महार इसम मुसलमान झाला तर तो राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु शकत असे. त्यात हिंदू धर्माचा श्रेष्ठ -कनिष्ठ भाव आणि धर्माचा प्रश्न आडवा येत नसे . त्यामुळे हिंदु धर्मातून मुसलमान धर्मात धर्मांतर सर्रास होऊ लागले होते. ही गोष्ट सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या लक्षात आली . तेव्हा त्यांनी स्पृश्य समाजास ही बाब समजविण्याचा प्रयत्न केला . परंतु उच्चवर्णियांनी जोतिबांचे ऐकले नाही .तेव्हा मानवी हक्काच्या उच्च तत्वास जागून जोतिबांनी स्वतःचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करण्याचा विद्रोह केला . व अस्पृश्यांना राजरोसपणे आपल्या हौदावरुन पाणी भरुन दिले .व अस्पृश्य समाजाच्या मनातील पाप-पुण्य व प्रारब्ध या कल्पना कशा फोल आहेत हे सिध्द केले . त्यांच्या सामाजिक गुलामगिरीच्या बेड्यांचा खळखळात उच्चवर्णियांच्या कानांपर्यंत पोहोचवला . तमाम सत्यशोधकांनी नंतर आपापले हौद अस्पृश्यांसाठी खुले केले . ज्योतिबांनी आपली घरची विहीर अस्पृश्यांना खुली करुन अस्पृश्यांना प्रथमतः स्वाभिमानाचे जलांमृत पाजले . व माणुसकीच्या लढ्याची, समतावादी लढ्याची चळवळ बांधली . जोतिबांच्या या महान क्रांतिकारी कृतीनंतर बरोबर पन्नास वर्षांनी डाॕ.भिमराव आंबेडकरांनी आपल्या शेकडो अनुयायांना महारच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशून स्पृश्यास्पृश्य समजूतीला त्या तळ्यात बुडवले . व आपल्या हजारो अस्पृश्यांची कुळे उध्दरली . व एका स्वाभिमानी ,बुध्दीवादी समाजाची पायाभरणी केली .
महात्मा जोतिबा फुलेंचे हे कार्य डाॕ. आंबेडकरांना दिशा दिग्दर्शक ठरले . व चवदार तळ्याचा महान सत्त्याग्रह त्यांनी घडवून आणला . म.जोतिबा फुलेंच्या त्या उन्मेषी कार्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी व डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महार ऐतिहासिक चवदार तळेच्या सत्त्याग्रहानंतर बरोबर पन्नास वर्षांनी डाॕ.बाबा आढावांनी महाराष्ट्रभर” एक गाव एक पानवटा ” चळवळ राबवून गावोगावचे सर्व सार्वजनिक पानवठे अस्पृश्यांना खुले करवून समतावादी व मानवतावादी समाज निर्मितीकडे महाराष्ट्राला नेले . डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व डाॕ.बाबा आढाव या दोन बाबांच्या ” पाणीमुक्ती ” चळवळीची प्रेरक शक्ती जोतिबा होते .म्हणून मला कायमच महात्मा जोतिबा फुले हेच खरे राष्ट्रपिता वाटत आले आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत