डॉ बाबासाहेब आंबेडकर एक संजीवनी


मानिक वानखेडे, वर्धा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा, तसेच स्वतःच्या परिवारातील सर्व सदस्यांच्या जीवनातील आनंद हिरावून समाजाला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस झटले आणि बुद्धाचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचा धम्म दिला. परंतु लोकांना देव पाहिजे होता मग तो दगडांचा असो किंवा मनुष्य रूपात ! हिंदू धर्मातील कोणताही देव आजपर्यंत कोणीही प्रत्यक्षात पाहिलेला नाही. म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची ! अशी मान्यता आहे देवाची ! हीच मान्यता बुद्धा बद्दल लोकांनी धारण केलेली आहे. वास्तविक बुद्ध हे आजपासून २५५२ वर्षा पुर्वी मनुष्य रूपात राजकुमार होते. त्यांनी आध्यात्मिक मार्ग शोधून काढला. त्या मार्गाने निर्दोष जीवन जीवन जगता येते, परंतु दुःख मुक्त जीवन जगता येत नाही. कारण ज्यांचा जन्म झाला त्याला वयोमानानुसार शारीरिक दुर्बलतेमुळे दुःख होणारच! त्या दुःखापासून कोणाचीही मुक्ती नाही म्हणजे नाहीच. मग ते बुद्ध असोत की डॉ बाबासाहेब आंबेडकर ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर समाजासाठी जीवनभर कष्ट उपसले. त्यांना समाजाची चिंता तर होतीच परंतु शारीरिक आजार पण होते, म्हणूनच तर त्यांना दुसरा विवाह करणे भाग पडले. तरीही ते समाजाप्रती घोर चिंतीत होते म्हणूनच तर ते म्हणाले –
आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या हातातील स्वराज्य म्हणजे भूतांचा बाजार आहे, हेही मला माहित आहे. दलित वर्गावर आमच्या देशातील लोकांनी पेशवाईच्या काळात जे अन्याय अत्याचार व जुलूमजबरदस्ती केली त्याची मला आठवण आहे आणि भावी स्वराज्यात असेच जुलूम या लोकांवर होतील की काय अशीही मला भीती वाटते. परंतु सदृहस्थांनो ! काही क्षणासाठी जर भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला आणि भावी स्वराज्यातील काही वर्गापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणाऱ्या घटनादत्त संरक्षण तरतुदींचा तुम्ही विचार केला तर भावी स्वराज्य हा भूतांचा बाजार ठरण्याऐवजी तुमच्या हातात सत्ता येण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल आणि इतरांबरोबर तुम्ही ह्या देशाचे सार्वभौम राज्यकर्ते व्हाल. भूतकाळचे भूत तुमच्यावर स्वार होऊ देऊ नये. तुमच्या निर्णयावर कोणत्याही भीतीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ देऊ नका. तुमच्या कल्याणाचा विचार करा म्हणजे माझी खात्री आहे की स्वराज्य हेच तुमचे खरे उद्दिष्ट आहे असे तुम्ही मान्य कराल. संदर्भ – खंड १८ भाग १ पृष्ठ क्र.२१८.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेले विचार किती आशादायक तर होतेच शिवाय भितीदायक पण. पेशवाईच्या काळात जे अन्याय, अत्याचार व जुलूमजबरदस्ती केली जात होती तोच प्रकार आजही होताना दिसत आहे. हे त्यांनी व्यक्त केलेल्या भावनातून दिसून येते. परंतु समाज खऱ्या हितकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नीट ओळखु शकला नाही आणि ज्यांना कधीच पाहिले नव्हते त्यालाच आपला भगवान समजून बुद्धाला देव समजून पूजा करू लागला आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ,आपली अफाट विद्वत्ता पणाला लावून, आपले चार मुले मातीत गाडून आणि त्यांच्या लाडक्या रमाईने अवघ्या ३५ वर्षात ह्या जगाचा निरोप घेतला अशा दुःखद परिस्थितीमध्ये आपण सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला त्याच उपकारकर्त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विसरून बसलो. आज समाज बुद्धाची शिकवण समजून हिंदू धर्मातील ध्यान साधना, विपस्सनाच्या नांदी लागून बुद्धाच्या मुळ शिकवणुकीला हरवून बसला आहे. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भाकीत केले होते की –
माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टींचा विचार केला की, माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातली असे वाटू लागते. संदर्भ – खंड १८ भाग ३ पृष्ठ क्र ३१५ पैरा १.
पूढे ते फारच नैराश्य आणि दुःखी अंतःकरणाने म्हणतात —
माझ्या इतके कस्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरुद्ध मी नाही माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजे. संदर्भ – उपरोक्त, पृष्ठ क्र ५१८ पैरा २
इतके हालअपेष्टा सहन करूनही डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या न्याय हक्कासाठी स्वतःचे बलिदान करण्यास तयार होते. पाहा काय म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकर –
माझ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला परवा नाही संदर्भ — खंड १८ भाग १ , पृष्ठ क्र ३५३ पैरा ३.
एवढा टोकाचा निर्णय कोणाच्याही जन्मदात्या बापाने सुद्धा घेतला नसेल. समाजाप्रती इतकी तळमळ असणारा जगामध्ये एकमेव डॉ बाबासाहेब आंबेडकर होत.
येथेच त्यांच्या दुःखाचा अंत होत नाही तर, दुःख त्यांच्या पाचवीला आहे असे ते खिन्न मनाने म्हणतात. पाहा –
‘दु:खाअंती सुख’अगर ‘कष्टाअंती विश्रांती’ हा सिद्धांत अचूक व सर्वांना सारखा लागू पडणारा असता, तर मला पाहिजे असलेला निवान्त, स्वतंत्र, अलिप्त असा जीवनक्रम यापूर्वीच लाभायला हवा होता. परंतु तो सिद्धांत मला लागू पडणार नाही, हे मी आता समजून चुकलो आहे. गोंगाटाचा आयुष्यक्रम माझ्या पाचवीला पुजलेला असून तो मला याच्यापुढे शेवटपर्यंत पुरून उरणार आहे. संदर्भ – डॉ बाबासाहेब आंबेडकर, चरित्र, धनंजय कीर, पृष्ठ क्र.२४८ पहिला पैरा, शेवटच्या पाच ओळी.
तरीही समाज मेंढरा सारखा हिंदू धर्मातील आचार्य गोयंका गुरुजींच्या मागे लागला हे चिंताजनक आणि आश्चर्याची बाब होय. आपण कोणाला स्वीकार केले पाहिजे त्या बाबत आपले विचार व्यक्त करताना राजकीय तत्वज्ञानी एडमंड बर्कलेचे विचार उद्धृत करताना म्हणतात —
सद्गृहस्थहो, हा माझा सल्ला एका फार मोठ्या राजकीय तत्त्वज्ञाने एडमंड वर्कने दिलेला सल्ला आहे. तो म्हणतो, “आपली स्वीकृती देताना इतरांनी आपला तिरस्कार करण्यास कारणीभूत होण्याइतका फाजील चौकसपणा दाखविला तरी विश्वासात जाऊन सर्वांनाश ओढवून घेण्यापेक्षा तो अधिक चांगला ठरतो.” या सल्ल्याला अनुसरून मला असे वाटते की, सामाजिक समस्या सोडविण्याच्या तरतुदीवर विशेष जोर देऊन राज्यघटनेतच सामाजिक प्रश्नाविषयी तडजोड नमूद करण्यात यावी, असा आपण आग्रह धरला पाहिजे आणि जे लोक अनिर्बंध शासनसत्ता आपल्या ताब्यात यावी म्हणून धडपडत आहेत, त्यांच्या इच्छेवर हा प्रश्न आपण कदापि सोडू नये. संदर्भ – खंड १८ भाग १ पृष्ठ क्र २०१ ,पैरा १
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समस्या सोडविण्याच्या तरतुदीवर विशेष जोर देऊन राज्यघटनेतच सामाजिक प्रश्नाविषयी तडजोड नमूद करण्यात यावी. असा मोलाचा संदेश दिला. परंतु समाजाने ह्या त्यांच्या संदेशाचे पालन न केल्यामुळे सबका मंगल होय रे ह्या मधूर आवाजाला बळी पडून सामाजिक समस्या न सोडविता वैयक्तिक आभासी सुख भोगण्यात तल्लीन झालेलो आहोत. आणि त्याचा परिणाम आपण बुद्धाच्या मुळ शिकवणुकीला आणि आपल्या न्याय हक्काला विसरून बसलो आहे. आणि जे लोक अनिर्बंध शासनसत्ता आपल्या ताब्यात यावी म्हणून धडपडत होते त्यांना ती शासनसत्ता अलगद प्राप्त झालेली आहे, असेच चित्र आज दिसून येत आहे.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत