जनतेच्या मनातील तीच खरे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले जागर-१

दि. १९ मार्च २०२४. ते १४ एप्रिल २०२४.
जागरमास.. राजाराम सूर्यवंशी .
एप्रिल महिना हा माझ्यासाठी खुप महत्वाचा महिना .कारण या महिन्यात जगातील सर्वश्रेष्ठ वैचारिक व सामाजिक गुरु-शिष्यांची जयंती असते व ती ही लागोपाठ ,जेष्ठानुक्रमाणे !
ते आपले मुक्तीदाते आहेत .म्हणून मला हा महिना खुप महत्वाचा वाटतो ..!
उद्यापासून ते 14 एप्रिलपर्यंत रोज आपण यांच्या विचार -कार्याचे जागर करु या ..! त्या अनुषंगाने काही तरी लिहून प्रबोधनची ज्योत तेवत ठेवू या ….! सत्यशोधक जागर करु या ….!! जागरमास साजरा करु
वारकरी चळवळीच्या विठ्ठल भक्तीत धार्मिक व सामाजिक समतेचा अंडर करंट प्रवाहित होत होता . मात्र आधुनिक काळातील फारच थोड्या समाज क्रांतिकारकांना तो उमगला होता .इंग्रजीरुपी वाघीणीचे दुध प्यालेल्या सर्वांमधील काहींना ती जाणीव होऊनही त्यांनी ही चळवळ बदनाम करुन त्यातला सामाजिक आशय धुसर करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता . मात्र महात्मा फुले व लोकहितवादी सारखे नीरक्षिरविवेकी बूध्दिवादी तेव्हा उपस्थित असल्याने त्यांनी वारकरी चळवळीची टॕग लाईन अंगीकारुन ( जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधु ओळखावा देव तेथेच जाणावा !)आपल्या जीवनकार्याचा शुभारंभ केला होता .त्या सर्वांमध्ये महात्मा जोतिबा फुले हे अग्रगण्य ठरले होते .कारण त्यांनी सामाजिक समतेची प्रत्यक्ष कृती करुन जी पहिली शाळा काढली होती , तिला "महारांची शाळा "अशी दुषणे लावण्यात सनातनी धन्यता माणून जोतिबांच्या कामाला "हलके " लेखून वारकरी चळवळीसारखं जोतिबांच्या चळवळीलाही वाळीत टाकण्याचा चंग बांधून ठेवला होता .मात्र सुधारणेच्या वादळाला रोखण्या इतकी ताकद त्यांच्यात कुठे होती .
आजपासून सुमारे पावणे दोनशे वर्षांपुर्वीचा कर्मठ काळ बघता जोतिबांची ही कृती अदृभूत वाटण्यासारखी होती. जातपात न मानणाऱ्या इंग्रजांनी अशी प्रत्यक्ष कृती तर केली नाहीच ,पण शाळातून स्पृश्य मुलांबरोबर अस्पृश्य मुलांना बसू देणे सुध्दा धोक्याचे आहे असे त्यांना वाटत असल्याचे पुरावे शाळाखात्याच्या दप्तरात दडले आहे .
हे नवीन राज्यकर्ते पेशवाईला हद्दपार करुन आले असले तरी ते या देशाच्या प्रगती व समतेच्या शृंखला बनलेल्या जातीव्यवस्था मोडण्याच्या बाबतीत उदासीनच होते .तेथे इतरांची काय कथा !
‘महारांची शाळा ‘ अशी दुषणे देऊन हेटाळणी करणाऱ्यांना माहीत नव्हते की ,जगातील सर्वात श्रेष्ठ महात्मा हे जोतिबा ठरणार आहेत .व त्यांची ही कृती क्रांतीदर्शी ठरुन भारताच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरविणार आहे ! सनातन्यांनी जी जी दुषणे जोतिबांना दिली ती ती सर्व दुषणे नियतीने जोतिबांच्या बाबतीत भुषणे ठरविली आहेत .
हा काळाचा महिमा आहे .काळ हा सर्वशक्तीमान असतो . कारण तो निसर्गाची समता , समतल आणि समतोल या नियमांनी बध्य असतो !
अशी शाळा काढण्यातून आपली सामाजिक चळवळ सुरु करणाऱ्या जोतिबांना भारतातील सामाजिक विषमता त्यांच्या ह्रदयाला किती झोंबली असावी ,याची ही प्रस्तुत शाळा ही एक बिनतोड साक्ष होती .
दि.२१ मार्च २०२४. जागर – २…राजाराम सूर्यवंशी.
जोतिबांचा दुसरा उन्मेष " मुलींची शाळा " हा होता. तो पुणे शहर व जोतिबांपुरता आश्चर्यकारक होता .
पुण्याबाहेर महाराष्ट्रात अन्यत्र मुलींच्या शाळा जरुर निघाल्या होत्या . मुंबई व कोकणपट्टीत मुलींच्या शाळा पुण्याआधी निघाल्या होत्या हे सत्य आहे .कारण पुणेच्या तुलनेत मुंबई ही सर्वसमावेशक व जातीभेदाचा अंमल पुण्याएवढा कर्मठ नसलेली शहरे होती .व पुण्याची पेशवाई सिंधूबंदीमुळे कल्याण -डोंबिवलीच्या पुढे गेलीच नव्हती.
पाठारे प्रभू व कोकणातील कऱ्हाडे ब्राह्मण तसेच कायस्थ या ब्राह्मण्यविरोधी जातींचे प्राबल्य मुंबई व कोकण किनारपट्टीवर होते .त्यात भर अमेरिकन व स्काॕटिश मिशनऱ्यांची होती .त्यांचाही प्रभावाखाली मुंबई व कोकणपट्टीत सारख्या जातीविहीन प्रदेशावर होता . जोतिबांच्या आगोदर ,अर्थात पुण्याचा आगोदर मुलींच्यायेथे उभे राहणे , शाळा सुरु होणे यात म्हणून आश्चर्य नव्हते .ते आश्चर्य जोतिबांनी पुण्यात उघडलेल्या मुलींच्या शाळेचे होते .मुंबईत मुलींची शाळा १८३७ साली निघाली होती .त्यामुळे केवळ मुलींची शाळा यात अपूर्वाई नव्हती .
पुण्यात एखाद्या ब्राह्मणाने मुलींची शाळा काढली असती तर तिचेही कौतुक नव्हते .परंतु एकाद्या ब्राह्मणेतराने वा अब्राह्मणाने पुण्यासारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात मुलींची शाळा काढावी हि त्या शाळेची व जोतिबांच्या कार्याची अपुर्वता होती .म्हणून जोतिबांचे कार्य प्रत्येक बाबतीत दिशा दिग्दर्शक ठरले होते . मागील अनेक पिढ्यांचा अंधःकार त्यानी लावलेल्या ज्ञानज्योतीने उजळून निघत होता. म्हणून महात्मा जोतिराव फुले हेच आमचे प्रथम राष्ट्रपिता वाटत होते . नव्हे जनतेच्या मनातील तीच खरे राष्ट्रपिता होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत