महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
बुध्दाच्या विचारांचे खरे शत्रू कोण?


हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
बुद्धाची मूळ शिकवण आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जीव ओतून लिखित स्वरूपात टाकलेला प्रकाश ह्यावर लक्ष केंद्रित न करता बुद्धाच्या निर्वाणानंतर ज्या ब्राह्मण भिक्षुणी दंतकथा लिहून ठेवल्यात ते आपले अव्वल बहाद्दर जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरोशावर आयत्या रेघोट्या ओढून उच्च पदावर विराजमान झालेत, काही भन्ते चिवर घालून उपासकाच्या घरी मिष्टान खाऊन ताजेतवाने बनलेत तेच बुद्धाच्या नावावर घुसाडलेल्या कपोलकल्पित कथा सांगण्यात मश्गुल आहेत. पण स्वतःची विचारबुद्धी खुन्टीला ठेऊन घुसाडलेल्या विचारांची परंपरा अव्हाहतपणे पुढे पुढे उपासकांच्या मस्तकी ठासून भरीत आहेत. जरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लिखित पुस्तके पृष्ठभागावरचे टाके तुटेपर्यंत मनन, चिंतन आणि सखोल अभ्यास करून वाचायला पाहिजे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीनुसार सत्याचा शोध आणि कल असला पाहिजे.
बुद्धाच्या विचारावर, उपदेशावर कपोलकल्पित व मनगंढत विचार ब्राह्मण भिक्षुणी संघात शिरकाव करून आणि बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांची मूळ शिकवण बाजूला ठेवून विचाराची घुसखोरी त्यांनी का केली याविषयी आंबेडकरवादी विचारवंत, लेखक आद. एन. जी. कांबळे सर त्यांच्या लिखित पुस्तकात काय म्हणतात ते पहा -
मूलनिवासी बहुजन समाजातील लोक उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे घडू नयेत अन्यथा ते ब्राह्मणांना डोईजड होतील. त्यामुळे " ब्राह्मणांचे तथाकथित प्रभुत्व, भूदेवत्व आणि त्यांचा वैदिक धर्म हे सारे नष्ट होतील " आणि विशेष म्हणजे ही गोष्ट बुद्ध आणि बौद्ध काळाने सिद्ध केली आहे. या भयगंडाने पछाडलेल्या ब्राह्मणांनी इ. स. चौथ्या शतकात सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या चरित्रासंबंधात अनेक बनावट दंतकथा लिहून त्या मूळ पाली बौद्ध साहित्याचे ब्राह्मणीकरण करताना घुसडविल्या...... ब्राह्मणांनी या दंतकथेच्या आधारावर बौद्धांना कपोलकल्पित विपश्यनेच्या मार्गी लावले आणि अशा या अहिंसक प्रतिक्रांतीतून ब्राह्मण बौद्ध धम्माचे भारतातून उच्चाटन करण्यात यशस्वी झाले.
पुढे लेखक म्हणतात -
ही ऐतिहासिक वस्तूस्थिती लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आता तरी त्यात " ध्यान, समाधी, विपश्यना, अभीधम्म " अशा बाबी आणू नका अन्यथा या बाबी भारतात आपल्या बौद्ध धम्म व संस्कृती यांच्या पुनर्जीवन करण्याच्या ध्येयाला घातक ठरतील असे आवर्जून सांगितले. त्यांनी स्पष्टपणे " विपश्यनेला फॅन्सी अर्थात कल्पनाशक्ती किंवा आभास " असे संबोधून विपश्यनेचे अस्तित्वच नाकारले आहे.
संदर्भ – बुद्धांनी विपश्यना सांगितली कां ? पृष्ठ. क्रं.249 – 250. पैरा – शेवटचा – पहिला.
उपरोक्त संदर्भानुसार ह्यात भगवान बुद्धाचा उपदेश शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ब्राह्मणांना डोईजोड होतील आणि ब्राह्मणांचे तथाकथित प्रभुत्व भूदैवत्व आणि त्यांचा वैदिक धर्म हे सारे नष्ट होतील ह्याच मुख्य हेतूने त्यांनी अशा कपोलकल्पित, मनगंढत आणि दंतकथा ह्याची निर्मिती करून आपल्या मस्तकी मारल्या आहेत. हे आपल्या समाजातील बौद्ध धर्मीय लोकांनी सदविवेक बुद्धीने समजून घेणे गरजेचे आहे.
बुद्धाच्या काळापासून , बुद्धाच्या निर्वाणानंतर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली धम्मदीक्षा हा सगळा अभ्यासपूर्ण असा मागोवा आपण घेतला तर ब्राह्मण भटांची बहुजन समाजावर असलेली मुजोरी, दडपण आजही पिढीजात आणि त्यांची पिलावळ अजूनही आपल्या सिंदबाकप्रमाणे मानगुटीवर बसलेलीच आहे. ते कसे पहा -
डॉ. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर लगेच रा. स्व. संघाने त्यांच्या उच्चाटनासाठी, त्या विरोधात चौफेर प्रतिक्रांती सुरू केली. त्यानुसार गोयंकाची सर्व विपश्यना प्रशिक्षण केंद्र ही रा. स्व. संघाच्या अंतर्गत बौद्ध धम्माच्या विरोधात प्रतिक्रांतीची केंद्रे म्हणून कार्यरत आहेत.
पुढे लेखक काय म्हणतात ते पहा -
ऐतिहासिक काळात बौद्ध धम्म हा सबंध बहुजनांनी स्वीकारल्यामुळे ब्राह्मणांचे प्रभुत्व आणि त्यांच्या वैदिक धर्म नष्ट झाले होते. त्यामुळे ब्राह्मणांनी भारतातून बौद्ध धम्माचे उच्चाटन करण्यासाठी इ. स. पूर्व 185 ते इ. स.1400 पर्यंत प्रतिक्रांती केली. त्यात त्यांनी हिंसेच्या माध्यमातून सहित सर्वच माध्यमांचा वापर केला. त्यातून त्यांनी बौद्ध धम्माचे उच्चाटन घडवून आणले. अर्थात बौद्ध धम्म हा ब्राह्मणांचा परंपरागत शत्रू धर्म आहे हे निर्विवादपणे ऐतिहासिक सत्य आहे.
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.250 – 251.
उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1956 साली संघर्ष भूमी असलेल्या स्थायी नागपूर येथे आपणा सर्वाना " धम्मदिक्षा " दिल्या बरोबर ब्राह्मणांच्या डोक्यात असलेले " कुबुद्धीचे किडे " कसे वळवळ करायला लागले आणि लगेच त्यांनी गोयंकाला पोटाशी धरून, पदरात घेऊन आपल्या बौद्ध धर्मीय जे शासकीय नोकरीत असलेल्या लोकांना ( हातावर ज्याचे पोट आहे असे सोडून ) आपलंस करून " श्वास आत आणि बाहेर " घेण्यासाठी विपश्यना केंद्रे स्थापित केली.
गोयंका म्हणतात की, विपश्यना अज्ञानाला नष्ट करून तिच्यापासून ज्ञान प्राप्त होते ( Vipassana breaks ignorance..... Vipassana is personally experienced wisdom ) असे जर गृहीत धरले तर जगात आतापर्यंत झालेल्या किती विद्वानांनी, ज्ञानवंतांनी, प्रज्ञावंतांनी स्वतःला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते केवळ विपश्यना केल्यानेच झाले हे त्यांनी लेखी स्वरुपात विविध माध्यमाद्वारे मान्य केले असेल तर त्या सहित आपले विधान गोयंकांनी सिद्ध करून दाखवावे. ते आतापर्यंत अशी विधाने करण्यापेक्षा एकही पुरावा सादर करू शकले नाहीत ? विपश्यना ही वैज्ञानिक असलेल्या बौद्ध धम्मातील आहे असा जो गोयंका गाजावाजा करीत आहेत तो सुद्धा साफ खोटा आहे.कारण बुध्दाने प्रत्येकाचे शरीर व मानसिक दृष्ट्या संपूर्ण जीवन समृद्धशाली बनविण्याकरता " अष्टांगिक मार्ग, पंचशील व दहा पारमिता " सांगितल्या आहेत तेच काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
ध्यान, समाधी, प्राणायाम या श्वासोच्छवासावर आधारित साधना करताना त्यातून जो अनुभव आला तो महासच्चक सूत्तात बुद्धाने सांगितल्याप्रमाणे -
डोक्यावर विपरीत परिणाम होऊन कानातून लोहाराच्या भात्यातून निघावा तसा विलक्षण शब्द निघत असे, तसेच तलवारीच्या टोकाने माथा फोडून टाकल्याप्रमाणे वेदना देत असत आणि म्हणून त्याने या साधनांच्या मार्गाने देहदंडनात गणना केली आणि ते मार्ग सोडून दिले. हे मार्ग कुचकामी ठरविले.
संदर्भ – पुस्तकं – बुद्धांनी विपश्यना सांगितली कां ? लेखक – एन. जी. कांबळे. पृष्ठ. क्रं.249. पैरा – दुसरा.
म्हणून शेवटी म्हणता येईल , फुले - शाहू - आंबेडकर यांचा वारसा असलेल्या भारतात महाराष्ट्रात, त्यांचीच विचारधारा आणि क्रांती उध्वस्त करणारी माणसे रा. स्व. संघांनी जन्मास घातली असतील आणि आपलाच समाज मुंग गिळून निर्विकारपणे या षडयंत्राकडे डोळ्यावर कातडे ओढून स्वस्त बसला असेल तर महापुरुषांच्या क्रांतीची , विचारधारेची एक प्रकारे विटंबना होत आहे असे कां वाटू नये ? बहुजनांना " विपश्यनेचे विष " पाजून त्यांचे उज्वल भविष्य नष्ट करणाऱ्या या निर्णयाविरुद्ध प्रकार लढा उभा करणे नितांत गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत