मागासवर्गीय वस्तीगृहांचा सरकारी निधी गेली अनेक वर्ष बंद..


विजय अशोक बनसोडे
महाराष्ट्रात एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी ची लेकरं शिकणाऱ्या वस्तीगृहांचा सरकारने मागच्या दहा वर्षापासून बंद केला आर्थिक निधी !
सर्वसामान्य मतदारांची उदासीनता आणि जात व धर्माभिमान भ्रष्टाचारी मनुवादी/गांधीवादी सरकारच्या पथ्यावर पडतो.महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी गाव,जिल्हा,तालुका पातळीवर जी वस्तीगृह चालवली जातात,ती सरकारी अनुदान तत्वावर शैक्षणिक संस्थांची वस्तीगृह व शाळा असतात.परंतु मागच्या पूर्ण दहा वर्षांमध्ये राज्यातील एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी चे विद्यार्थी शिकणाऱ्या एका ही वस्तीगृहाला एक छदामही आर्थिक निधी या महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही.खरंतर राज्यातील आमदार आणि खासदार मंत्री मंत्र्यांची लेकर ही विदेशामध्ये शिक्षण घेतात.मोठ-मोठ्या महागड्या सीबीएससी पॅटर्न इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतात.तर मग यांना आपल्यासारख्या एस.सी/एस.टी/ओबीसी बहुजन समाजातील गोर-गरीब लेकरांच्या शिक्षणाची काळजी असेल का ? याचा विचार आता खुद्द एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी तील मतदारांनीच करायला पाहिजे.
मागच्या दहा वर्षापासून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाही !
पुरोगामी महाराष्ट्रातील वस्तीगृहांना मागच्या दहा वर्षात सरकारने कृपया चा निधी दिला नाही न कोणत्या शालेय साहित्याच्या सुविधा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले नाहीत.राज्यातल्या वस्तीगृहांची जर अशी अवस्था असेल तर ही बाब म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीब बहुजन समाजातील लेकरांना शिक्षणाची दारे एक प्रकारे बंद केल्यासारखंच आहे. वस्तीगृहांना देण्यात येणारे अनुदान,विविध योजना,शालोपयोगी साहित्य, वस्तीगृहातील मुलांना अत्यावश्यक असलेल्या सर्व बाबी याचा पुरवठा जर मागच्या दहा वर्षांमध्ये झाला नसेल तर याचे परिणाम बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यावर किती मोठ्या प्रमाणात झाले असतील.याकडे मात्र आज ही कोणी लक्ष द्यायला तयार नाही.
भारतीय जनता पार्टी,शिवसेना एकनाथ,उद्धव,अजित पवार एस.सी/एस.टी/ओ.बी.सी च्या विद्यार्थ्यांचे विरोधकच !
पुरोगामी छत्रपती शिवराय,महात्मा ज्योतिबा फुले यांना मानणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी मिळून संपूर्ण पाच वर्षे सरकार चालवलं.दुसऱ्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊन जवळपास अडीच वर्ष सरकार चालवलं.त्या कोरोना काळामध्ये महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचे जीवन मात्र उध्वस्त झालं.ते सावरण्यास आज ही कोणी तयार नाही. अर्थात कोरोनाच्या नावाखाली या राज्यातील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना देशो-धडीला लावण्याचेचं काम करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीकडे आमदार विकत घेण्यास पैसा आहे.परंतु वस्तीगृहांना आर्थिक निधी द्यायला पैसा नाही !
महाराष्ट्रात करोडो रुपयांचे घोटाळे करण्यात आले.करोड रुपये देऊन सरकार पाडण्यात आले.आमदार खरेदी करण्यात आले.मात्र वस्तीग्रह असतील विद्यार्थ्यांना थोडा ही आर्थिक निधी देण्यात आला नाही.मागच्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये करोडो रुपयाची खोकी एकमेकांना देवून-घेऊन सरकारं तोडण्यात आली आणि पाडण्यात आली. सर्वसामान्य जनतेप्रती इमानदार,निष्ठावंत असलेल्या आमदारांना जनावराच्या बाजारासारखा विकत घेण्यात आलं.करोडच्या खोक्यावर मीडियाने रात्रं-दिवस न्यूज चालवल्या तर गल्लीबोळातल्या कट्ट्या कट्ट्यावर आनं पारा पारावर मोठ्या चवीने याच्या चर्चा,खालच्या स्तरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केल्या.परंतु सत्ता स्थापनेच्या भ्रष्टाचाराच्या राजनीतीमध्ये महाराष्ट्रातील बहुजन समाजाची शिक्षण वाहिनी असलेल्या वस्तीगृहांना मात्र जीवनदान देण्यासाठी ना भारतीय जनता पार्टीचे पुन्हा येईन….पुन्हा येईन मुख्यमंत्री आणि माझा बाप चोरला म्हणणारे मुख्यमंत्री कधी ही पुढे आले नाहीत. खरंतर या वास्तविकतेकडे महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सर्व पालकांनी,विद्यार्थ्यांनी गंभीरपणे पाहिले पाहिजे.आणि अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या बहुजनसर्वसामान्य मतदारांची उदासीनता आणि जात व धर्माभिमान भ्रष्टाचारी सरकारच्या पथ्यावर पडतो विरोधी बहुजन विद्यार्थ्यांच्या विरोधी नेत्यांना जाब विचारला पाहिजे.
आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी समाज जागा होणार आहे का !
सध्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना राज्यातील बहुजन समाजातील विशेषता एस.सी/एस.टी/ओ.बी.सी च्या सर्वसामान्य मजूर,कामगार,शेतमजूर या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आपल्या पोटच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मागच्या दहा वर्षांमध्ये या लोकांनी/नेत्यांनी काय केले.याची जरा उजळणी करणं अत्यंत गरजेचं आहे,असं वाटतं.
वस्तीगृहामध्ये एस.सी/एस.टी/ओ.बी.सी ची मुलं शिकतात म्हणून त्यांना सरकारचा आर्थिक निधीच नाही !
राज्यातील वस्तीगृहांना अनुदान मिळत नाही.वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सोयी-सवलती दिल्या जात नाहीत.मुळात ही वस्तीगृहेच महाराष्ट्रातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी च्या लेकरांसाठी चालवली जातात.त्यामुळं या एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी च्या लेकरांचं शैक्षणिक भविष्य वाटोळं झालं तरी चालतं. परंतु यांना कोणत्याही सुख सुविधा आणि सवलती द्यायच्याच नाहीत.ही बाब मात्र या दहा वर्षांमध्ये प्रामुख्याने सर्वांच्या समोर आली आणि दिसून ही आली.पण सुजाण नागरिकांनी आणि कार्यकर्ते,पदाधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या या बहुजन समाज विरोधी धोरणाचा खुलून विरोध केला पाहिजे.
एस.सी /एस.टी/ओ.बी.सी समाजातील मतदारांना आपल्या पुढच्या लेकराच्या शिक्षणाची चिंता आहे की नाही !
बहुजन समाजातील एस.सी/एस.टी/ ओ.बी.सी समाजाच्या शिक्षणावर कधीच गंभीर नसणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी एस.सी/एस.टी/ओ.बी.सी समाजातील सर्वसामान्य मतदारांनी आपापल्या जाती व धर्माचे बुरखे फाडून या पुन्हा येईन… आणि “बापचोरीला” गेल्याचे गऱ्हाने घालणाऱ्या या राजकीय पक्षांना आपल्या नैसर्गिक न्यायाची मागणी करत यांना जाब विचारण्यासाठी समोर आले पाहिजे.
भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने एससी एसटी बहुजन एससी एसटी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचे केले वाटोळे !
मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये शिवसेना बीजेपी आणि एकनाथ शिंदे,अजित पवार गटांनी मोठ्या दिमाकामध्ये दरवर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला.तर इथल्या मीडियाने त्याच्या मोठ-मोठ्या बातम्याही केल्या.परंतु त्याची खातरजमा कधी केलीच नाही की,काय तो निधी राज्यातल्या एस.सी/एस.टी/ओ.बी.सी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या वस्तीगृहांना दिला काय ? सरकार तोडायला आणि फोडायला मात्र 50-50 करोड रुपये यांनी खर्च केले.तर कोणाला रातोरात उपमुख्यमंत्री होण्याचं ढवाळं लागतं.तर कोणाला डोंगर-दरी चांगली वाटते.तर कोणाला स्वतःचा बाप चोरी गेल्याचे दुःख वाटतं.परंतु छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील एस.सी/ एस.टी/ओ.बी.सी समाजाच्या लेकराचं शैक्षणिक वाटोळं होताना मात्र यांना याचं काहीच वाटत नाही. ही बाब अतिशय निंदनीय आहे.
विविध आंदोलने करणाऱ्या लढवय्या पक्ष संघटनांना,दरवर्षी अर्थसंकल्पात जाहीर केलेला वस्तीगृहांचा निधी जातो कुठं ? हे माहीतच नाही वाटतं !
दरवर्षी अर्थसंकल्पात जाहीर केलेला वस्तीगृहांचा निधी जातो कुठं ? महाराष्ट्रातील स्वतःला विद्वान आणि लढवय्या जमात समजणाऱ्या विशेषतः बौद्धांचे आणि मांगाचे तथाकथित नेते,कार्यकर्ते पदाधिकारी,पक्ष,संघटना आणि संस्थांच्या लोकांना आंबेडकरी विचाराचं राजकारण महाराष्ट्रातून हद्दपार केले जात आहे.हे मात्र कळलच नाही.महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पाच वर्षांमध्ये विविध विषयावर आंदोलने करणे,धरणे,मोर्चे,निदर्शने,उपोषण करणे राज्यातील बहुजन समाजाच्या प्रश्नावर आम्ही खूप ज्वलंत प्रतिक्रिया देतो.महाराष्ट्रातील मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये भरभरून मुलाखती देतो.परंतु ही सगळी मंडळी मात्र प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून आंबेडकरी विचाराचं राजकारण संपविणाऱ्या मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षासोबत सुखाचा संसार करतात.त्यांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्यातील एस.सी/एस.टी/ ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी काय तरतुदी केल्या जातात ? त्याचा पाठपुरावा पुढे होतो का ? तो आर्थिक निधी वस्तीगृहाना दिला जातो का ? का इतरत्र वळवून खर्च करण्यात येतो ? याविषयी मात्र यांना काहीच माहित नसतं.खरं तर नुसतं अन्याय अत्याचारावर प्रतिक्रिया देऊन सवंग लोकप्रियता मिळवण्याचा धंदा जो चालविण्यात आलेला आहे.हा धंदाचं राज्यातील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना घेऊन एक दिवशी बुडणारच आहे.
सर्वसामान्य मतदारांची उदासीनता आणि जात व धर्माभिमान भ्रष्टाचारी सरकारच्या पथ्यावर पडतो !
खरं तर सर्वसामान्य मतदारांची उदासिनता भ्रष्टाचारी आनं बहुजन विरोधी सरकारच्या पथ्यावर पडत असते. हे बाब एससी एसटी ओबीसी च्या मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे. स्वतःच्या धर्माने जातीच्या रूढी परंपरा आणि रितीरिवाजापेक्षा आपल्या लेकरांचे शिक्षण महत्वाचे आहे.हे गोर-गरीब मतदारांनी लक्ष्यात घेतले पाहिजे.दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे राज्यातील शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना,राज्यातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलला कोणत्याही सुख-सुविधा नसताना,दरवर्षी अर्थ संकल्पात जाहीर केलेला वस्तीगृहांचा निधी इतरत्र वळविला जातो.तो निधी वेगळ्याच ठिकाणी खर्च केला जातो.याचा थोडा सुद्धा राग न येणारी महाराष्ट्रातील जी एस.सी/एस.टी/ओ.बी.सी समाजाची मतदार मंडळी आहे.जी खरंच इतकी लाचार आहे का ? आपल्या लेकराचे भविष्य शिक्षणात आहे ही गोष्ट त्यांना समजते की नाही समजते ? अशा या निरढावलेल्या मतदारांना जाग येणार आहे का नाही ? असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांकडे पाहिल्यास मनामध्ये येतात.
विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत