प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

“ शिक्षण ” आयु.विलास खरात

धोंडेवाडी या दुष्काळी गांवात बौध्द समाज्याची साधारण २५ ते ३० घराची वस्ती होती. सदर समाज्यातील बहुतांश लोक हे मोल-मजुरी करून जगत होते. सदर लोकांची वसाहत गावाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या ओढ्या लगतच्या भिमनगर मध्ये राहत होते. सदर वस्तीत समाज मंदिर बांधलेले होते त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व लहान मूर्ती बसविण्यात आलेल्या होत्या. समाज मंदिराच्या मोकळ्या जागेत पिंपळाच्या झाडाभोवती मोठा कट्टा (पार ) बांधलेला होता. त्या पारावर समाज्यातील मंडळी उठत बसत असत. सदर गांवास पाऊस काळ अल्प असलेमुळे दुष्काळी भाग म्हणून गणला जात असलेमुळे समाज्यातील अनेक लोक मुंबई- पुणे अशा शहरात जावून काम धंदा करून उदरनिर्वाह करीत असत.
सदर समाज्यातील मनोहर व दयानंद हे समाज मंदिराच्या पारावर गप्पा मारत बसले होते. दोघेही दहावी बोर्डाच्या परीक्षेत सलग दोन वर्ष नापास होत होते. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना महत्वाची पुस्तके, नवनीत पुस्तके अथवा खाजगी शिकवणीसाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे दोघेही काही विषयात नापास होत असलेमुळे सम दु:खी होते. त्यामुळे दोघांनाही घरचे व समाज्यातील लोक दूषणे देत असत. त्यामुळे अनासाया दोघांची दोस्ती चांगली जमली होती. दोघाच्या ही गप्पा सदर पारावर चालल्या होत्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साठी मुंबई वरून चुलते व भाऊ येणार आहेत अशा चर्चा सुरु होत्या. त्यावेळी समाज्यातील मरीबा गवंडी हे जवळ येवून म्हणाले, गांवात मी परसू आबाचे घर बांधकामाचा “मक्ता” घेतलेला आहे. त्या बांधकामासाठी लागणारी वाळू गांवच्या ओढ्यातून गाढवावर भरून देण्याचे तुम्हाला जमेल का ? तुम्हा दोघांना पन्नास-पन्नास रुपये रोख हजेरी देतो ? आणि तुम्हाला जयंतीच्या कार्यक्रमाच्या खर्चाला सुद्धा पैसे मिळतील. त्यावर मनोहर व दयानंद खूष होऊन म्हणाले, सध्या आम्ही घरीच बसून आहोत काहीही काम – धाम नाही, त्यामुळे जमेल की, त्यात काय एवढे आहे ? गाढवावर वाळू भरून देतो आम्हाला सकाळी दोन फावडे (खोरे) व लोखंडी पाट्या द्या त्यावर मरीबा गवंडी होय म्हणून माती वडार यांची भेट घेण्यासाठी गांवाच्या माळरानावर निघून गेले.
कर्नाटकातील विजापूर येथून भिमाप्पा हा माती वडार हा आपली गाढवे घेवून फिरत-फिरत कामासाठी धोंडेवाडी गांवात आलेला होता. त्यामुळे परसू आबाने मरिबा गवंड्यास याची कल्पना दिलेली होती. गांवात घराचे बांधकाम करणेचे ठरले होते सदर बांधकामासाठी लागणारी वाळू वाहुतुकीसाठी गांवात लहान-लहान बोळे गल्ली असलेमुळे बैल गाडीतून वाळू आणता येत नव्हती.त्यामुळे गांवात आलेल्या माती वडराच्या गाढवा वरून वाळू ओढण्याचे परसू आबा व मरिबा गवंड्याने ठरविलेले होते.सकाळी गांवाच्या ओढ्यात मनोहर व दयानंद हे ओढ्याच्या पात्रातील चांगली वाळू पाहून गाढवाची वाट पाहत थांबलेली होते. त्यावेळी दोघेही एकमेकांना म्हणत होते, आपले आई-वडील आपल्याला खर्चाला पैसे देत नाहीत त्यामुळे या वर्षीच्या जयंतीच्या कार्यक्रमाला पैसे येणार म्हणून दोघेही आनंदात होते. त्या खुशीतच माती वडर व गाढवाची वाट पाहत ओढ्यात दोघे थांबलेले होते.
थोड्याच वेळानंतर मरीबा गवंडी हा भिमाप्पा व त्याच्या गाढवांना गांवाच्या ओढ्यात घेवून येवून त्याने भिमाप्पाची ओळख मनोहर व दयानंद यांच्या बरोबर करून दिली.त्या नंतर मरीबा गवंडी हा दयानंद व मनोहरला म्हणाले सायंकाळी मी आल्याशिवाय घरी कोणीही जायचे नाही. असे सांगून ते गांवाकडे निघून गेले. त्या नंतर मनोहर व दयानंद हे भिमाप्पाच्या कडील गाढवाच्या पाठीवर बांधलेल्या रिकाम्या पोत्यात वाळू भरून देत होते. भिमाप्पा हा गाढवांना घेवून गांवातील परसू अण्णाच्या घराजवळील मोकळ्या जागेत गाढवावरील भरलेली वाळू खाली करून येत होते. थोड्या अवधी नंतर गाढवांना ओढा व घराकडे जाणारे रस्ते यांचे अंतर माहीत झाल्यानंतर ते वाळू लवकर टाकून परत येत असत.मनोहर व दयानंद हे गाढवावरील ठिक्यात (पोत्यात) वाळू भरून देत असत. दोन गाढवावर वाळू भरून दिली का दुसरी दोन गाढवे वाळूसाठी येवून थांबत असत. त्यामुळे गाढवाचा चक्ररहाट सुरु झाल्यामुळे थोड्या अवधीनंतर मनोहर व दयानंद हे गाढवावर वाळू भरून अक्षरशा वैतागून गेले होते.दोघाच्याही पाठीचा कणा ढिला झाल्यासारखे वाटू लागले होते. दोघाच्याही तोंडाला कोरड पडलेली होती. वाळू भरून हात व कंबर दुखायला लागलेली होती.पायाचे गोळे वर – खाली व्हायला लागले होते. गाढवावर वाळू भरून देणे एवढे सोपे काम नाही याची जाणीव दोघांना ही पुरेपूर झाली होती. आपल्याला गाढवावर वाळू भरून देण्याचे जमणार नाही हे दोघांना उमजले होते. त्यांचे अंग घामाने चिंब झालेले होते. दोघेही दमून गेलेले होते.
बराच वेळ झाले तरी गाढवे वाळू घेवून का येत नाहीत म्हणून घराचे मालक परसू अण्णा व मरीबा गवंडी हे गांवच्या ओढ्यात येवून पाहतात तर काय ? मनोहर व दयानंद हे मान खाली घालून वाळूत बसले होते. गाढवे ओढ्यात उभी होती. भिमाप्पा हा बिडीचा धूर काढीत बसलेला होता. मनोहर व दयानंद ने मरीबा गवंड्यास पाहताच उठून त्यांचे पाय जावून धरले.व म्हणाले आमच्याच्याने गाढवावर वाळू भरून देणे जमणार नाही. आमचे हे काम नाही, आम्ही शाळेत पास झालो असतो तर आमच्यावर ही वेळ आली नसती, आई-वडील शाळेत शिका म्हणून मागे लागत होते, त्यावेळी आम्हास कळले नव्हते. आज आम्हाला शाळेचे महत्व समजले आहे. असे म्हणून आता वाळू भरण्याचे काम जमणार नाही म्हणून परसू अण्णा, मरीबा गवंडी , भिमाप्पा यांच्या पाया पडले. त्या नंतर दोघानी ही गाढवाचे सुद्धा पाय धरले होते. हे पाहून परसू अण्णा, मरीबा गवंडी, भिमाप्पा वडर हे मनोहर व दयानंद यांच्याकडे ओढ्यातून घराकडे जाताना हसायला लागले होते आणि गाढवे दोघाकडे पाहत उभी होती, त्यावेळी मनोहर व दयानंद याना समजले की शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य त्यांच्या डोक्यात फिट्ट बसले होते. त्यामुळे आता आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा विचार त्यांनी पक्का केला होता.
आयु.विलास खरात
आटपाडी
मो.नं.९२८४०७३२७७

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!