महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

जात चोर व त्याचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, नौकरी वरील दुष्परिणाम – एक राष्ट्रीय समस्या की षडयंत्र ?


ॲड. अविनाश टी काले , अकलूज
मो न 9960178213


महाराष्ट्रातील बहुतेक चळवळीचे नेते हे मला व्यक्तिगत रित्या व्हॉट्सॲप चे माध्यमातून जोडले गेलेले आहेत , विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून माझी त्यांचे शी चालत असते .
काल दलीत चळवळीतील नामांकित लढवय्ये आदरणीय मंच्छिंद्र जी सकटे सर यांनी कांहीं लेख वाचले व त्यावर त्यांनी त्यांचे अभिप्राय ही नोंदवले ,
त्यांनीच एक सूचना मला केली की तुम्ही जात चोरी वर एक लेख लिहा .
हा लेख एक व्यक्ती डोळ्या समोर ठेऊन केलेला नाही तर एक सामाजिक उत्तर दाईत्व म्हणून लिहिलेला आहे , हे प्रथम स्पष्ट करतो
“जेंव्हा मी जात चोरली होती ” हे बाबुराव बागुल यांचे पुस्तक दलीत चळवळी मधील साहित्याचे एक सोनेरी पान आहे ,
इतिहासात डोकावले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ही बडोदा संस्थानात नौकरी करताना पारशी धर्मशाळेत स्वतः ची जात न सांगता रहावे लागले होते ,
सर्व साधारण रित्या जेंव्हा अस्पृश्य समाजाची व्यक्ती जात चोरते, ती कागदोपत्री नसते तर अस्पृश्यतेचे व्यावहारिक चटके न बसण्यासाठी केलेली ती एक कृती असते आणि वर्ण जाती व्यवस्थेतील स्व जाती पेक्षा उच्च श्रेणी मधील जात कवच पांघरून व्यक्ती समाज जीवनात वावरत असते. पण हीच जात शैक्षणिक , नौकरी आणि राजकीय संधी चे लाभासाठी चोरली जाते तिचे स्वरूप हे वरून खालच्या श्रेणी कडे सरकत असते.

उच्च वर्णीय मराठा राजकीय व्यक्ती राजकीय आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी “कुणबी” बनतो आणि असे कुणबी बनून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद कांहीं दशका पूर्वी नारायण पाटील यांनी मिळवले होते .
हे जाती बदल कसे होतात , तर त्याची मोडस ऑप्रेडिटी पाहिली तर सरळ दृष्टी क्षेपात हीच बाब लक्षात येते ती ही की जात बदलवून घेणाऱ्या व्यक्ती त्याच जाती सदृश्य नाव धारण केलेल्या जाती चां आधार घेतात. जसे की पश्चिम महाराष्ट्रातील कोळी हा समाज आणि आदिवासी संस्कृतीतील महादेव कोळी या दोन समाजात व त्यांच्या संस्कृतीत प्रचंड भिन्नता आहे. परंतु आपल्या कोळी जाती पुढे फक्त “म” लाऊन तो महादेव कोळी बनून थेट ओबीसी म्हणून न राहता ती व्यक्ती आदिवासी बनते, ओबीसी कोट्यात असलेली तीव्र स्पर्धा ती व्यक्ती टाळते आणि तुलनेने कमी स्पर्धा असलेल्या वर्गातून ती आरक्षित कोट्यातील शैक्षणिक, नौकरी आणि राजकीय लाभ उठवण्यासाठी सक्षम बनते .

नाम सदृश्य अश्या जाती पुढे मागे फक्त कांहीं अक्षरे जोडून कागदोपत्री फेरफार घडवून आणल्याचे विशेषतः शाळा सोडल्याचा दाखला या मुळे या व्यक्ती कागदोपत्री त्या जातीच्या बनतात, परंतु त्यांचा त्या जातीतील इतर कोणत्याही घटकाशी (विवाह, अंतिम संस्कार, भाव भावकी) सबंध नसतो .

लिंगायत हा स्वतंत्र असा धर्म आहे , ज्याची स्थापना संत बसवेश्वर स्वामी यांनी केली , ” मानव हा सर्व सारखा असून त्याने फक्त लिंग धारण केल्याने तो लिंगायत बनतो , आणि भेदभाव विरहित होतो “असा तत्व विचार स्थापित करून जाती भेदाला आव्हान देणाऱ्या धर्मात ही अनेक हिंदू मधील जाती समूह दीक्षा घेऊन लिंगायत बनले तेंव्हा याच जाती लिंगायत धर्म किंवा पंथात ही पुनश्च अस्तित्वात आल्या.

भिक्षुकीशी साधर्म्य राखणारी बेडा जंगम ही एस सी प्रवर्गात मोडणारी तर जंगम ही व्यापारी वर्गात मोडणारी असताना फक्त जात दाखल्यावर “बेडा” लिहिल्याने जय सिध्देश्वर स्वामी सारखा लिंगायत माठाधिश ही एस सी बनून राजकीय दृष्ट्या आरक्षित जागेवर खासदार म्हणून निवडला गेला.

तर धनगर ही ओबीसी मधील एन टी प्रवर्ग मधील एक जात असताना व धनगर खाटीक ही एस सी मधील एक जात असताना शालेय दाखल्यावर खाटीक हा शब्द लिहून उत्तमराव जानकर यांनी तो दाखला प्राप्त केला ,
राजकीय तडजोडी ने त्याला स्थायी स्वरूप प्राप्त करून घेतले , आणि याच दाखला आधारे त्यांनी सोलापूर लोकसभा राखीव चे उमेदवारी ची मागणी भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाकडून केली आहे ,
तत्पूर्वी माळशिरस विधानसभा राखीव मधून याच दाखल्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस कडून ही त्यांनी उमेदवारी मिळवली होती.

नवनीत राणा या मागासवर्गीय नाहीत हे ज्ञात असताना अपक्ष लढतीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेच पाठिंबा दिला होता.

या सर्व बाबीचा विचार केला तर एक बाब स्पष्ट होते ती ही की कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष अश्या बनावट जात दाखल्यांच्या विरोधात भूमिका घेत नाही उलट अश्या व्यक्तींना ते उमेदवारी देऊन समर्थन करतात.
भारतातील जाती व्यवस्था आणि जात मानसिकता याचा विचार करता राजकारनातील लोकप्रतिनिधी या नात्याने निर्माण झालेल्या शक्ती केंद्रा मुळे “आम्ही उच्च वर्णीय लोकांनी त्यांचे पुढे जाऊन आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी याचना करायची का? महार वाड्यात आणि मांगवाड्यात जायचे का? असा विचार थेट करताना दिसून येतात हे वास्तव आहे.

जिथे तालुका निहाय उच्च वर्णीय प्रस्थापित शक्ती केंद्र स्वतंत्र अस्तित्व राखून आहे तिथे त्यांचे मेहेरबानी खातर आलेली या वर्गातील लोकप्रतिनिधी ही प्रत्यक्षात त्याचे सर्व अधिकार त्या शक्ती केंद्राचे हातात ठेवते व नामधारी आमदार म्हणून राहते.

सातारा विभागातील आमचे पत्रकार मित्र दीपक माने यांनी काल परवा फोन वरून बोलताना फलटण येथील आमदार व त्यांचे स्वतंत्र अस्तित्व या बद्दल अशीच माहिती दिली , या आमदार महोदया ची तीन टर्म झाली असली तरी ते त्या अर्थाने स्वतंत्र शक्ती स्थान बनू शकलेले नाहीत हे वास्तव आहे. या निमित्ताने खरा प्रश्न उभा राहतो तो हाच की, ज्या मूळ जातीचे समूह आहेत ते त्या जाती समूहाच्या नेत्याच्या पाठीमागे का राहतात?
इतर जाती समूहाचे सोडून देऊ , त्याची कारणे वर दर्शवली आहेत . भाजपचे फायर ब्रँड धनगर नेते म्हणून आ गोपीचंद पडळकर आहेत हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यांनी व उत्तम राव जानकर यांनी धनगर समाजास एस टी आरक्षण मिळावे म्हणून “अखेरचा लढा” निर्माण केला होता. कांहीं शॉर्ट फिल्म, पोवाडे , आणि “धूमस” हा मराठी चित्रपट यातील समग्र साहित्य निर्मितीत माझे योगदान होते ,
त्या आ गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी जाहीर रित्या “मराठा” आंदोलकांच्या” सरसकट व सगे सोयरे” या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे करताना , “उत्तमराव जानकर हे आमच्या धनगर समाजाचे आहेत , आणि स्टेज वर बसलेल्या नेत्यांचे व त्यांचे नाते सबंध आहेत, मग या सगे सोयरे या व्याख्या आधारे आम्हाला एस सी चे दाखले देणार का? हा जाहीर सवाल त्यांनी विचारला होता .
मूळ आपला मुद्दा हाच आहे की हे वास्तव असताना त्या जातीतील लोक त्यांना का स्वीकारतात?
याचे उत्तर आहे आपल्या जातीच्या नेत्याला कुठून का होईना फायदा झाला पाहिजे ,
प्रा लक्ष्मण राव ढोबळे यांच्या भाषेत
” पाणी कुठून का येईना ते समाजाच्या वाफ्यात आले पाहिजे “
याचा अर्थ जात नावाचे जे एकिकृत संघटन जाती व्यवस्थेने निर्माण केलेले असते ते अश्या फायद्या कडे समाजाचा फायदा म्हणून बघतात
ग्रामीण भाषेत
“आपल वासरू दुसऱ्याच्या गाय ला पिल्याने जर आपलेच वासरू धष्ट पुष्ट होणार असेल तर गोंधळ करून त्याला रोखण्या पेक्षा सुखा सुखी पिवु द्यावे “
पण दुर्दैव हेच आहे की , ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी एस सी एस टी साठी केली होती की त्या मुळे आमच्या या समाजाच्या समस्या थेट विधान सभेत व संसदेत मांडल्या जातील ती मागणी नाकारली गेली.
महात्मा गांधी यांनी उपोषण करून संयुक्त मतदार संघ अस्तित्वात आणला, उच्च वर्णीय समाज त्यांचा विवेक जागृत ठेऊन सर्व समाजाशी चांगले सबंध ठेवणारी प्रगल्भ व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देईल पण त्या ही आशा लोप पावल्या. उपेक्षित समाजाचे लढवय्ये चळवळीचे नेते राज्यकर्ते बनतील या आशा जश्या लोप पावल्या तश्याच ” दलाल किंवा चमचे म्हणून ज्यांची व्याख्या मान्यवर कांशीराम जी यांनी केली होती त्यांच्या ही शक्यता लोप पावल्या असून एस सी मधील मुख्य व मोठ्या लोकसंख्या असलेल्या नवबौध्द व मातंग समाजातील लोक प्रतिनिधी देण्याचे प्रमाण प्रस्थापित पक्ष व प्रस्थापित नेते यांच्या कडून घटवले गेले आहे.
संसदीय सत्ता वर्तुळा पासून या समाजातील कार्यकर्त्यांना , नेत्यांना बाजूलाच ठेवायचे याचा सामूहिक निर्णय झाला असावा असेच व्यवहारात दिसून येत आहे. या जाती समूहाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इतका जोरकस आहे की जी कैकाडी जात आंध्र, तेलंगणा मध्ये आणि महाराष्ट्रात विदर्भ भागात एस सी मध्ये तर उर्वरित भागात ओबीसी मध्ये होती.
आ यशवंत माने यांना मोहोळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस ने आमदार बनवले आज चे घडीला महाराष्ट्र राज्य सरकार ने (महा विकास आघाडी) सरकार अस्तित्वात असताना समग्र कैकाडी समाज हा एस सी प्रवर्गात घेतला. हे बदल वर वर घातक परिणाम करणारे वाटत नसले तरी ही नवबौध्द व मातंग समाजावर त्यांचे संसदीय राजकारण रोखून धरण्यवर यशस्वी रित्या परिणाम घडवून आणणारे आहेत.
राजकारणात एखादी दुसरी आमदारकी देऊन समग्र समाजाची मते त्या बदल्यात घेण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे याचे कारण याच नेतृत्वाखाली जात संघटन व्हावे अशी इच्छा प्रस्थापित पक्षाची असते हा प्रश्न मी स्वतः आदरणीय शरद चंद्र जी पवार साहेब यांचे समोर मांडला होता .
असो या सामाजिक विकृती ह्या चोर मानसिकतेच्या आहेत , आणि याचे समर्थन करणारी जनता ही त्याच निकृष्ट प्रतीची मानसिकता ठेवते हे वास्तव आहे,
म्हणूनच जात पडताळनी सारखी स्वंतत्र व्यवस्था निर्माण करून ही हे प्रकार रोखले जात नाहीत
याचे कारण गुन्हेगार आणि जात चोर शातिर नसून प्रस्थापित पक्ष व राज्यकर्ते शातीर आहेत , जे पक्ष अश्या उमेदवारांना तिकीट देतील त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका , आणि जात संख्येच्या आधारे लोक प्रतिनिधित्व ही संकल्पना अंमलात न आणणाऱ्या प्रस्थापित पक्षास बेदखल करण्याची चळवळ नवबौध्द व मातंग समाजाने एकत्रित येऊन चालवली च पाहिजे ,
आणि त्याची सुरुवात आदरणीय मच्छिंद्र सकटे सर यांनी करावी , हीच विनंती आहे ,


तूर्त इतकेच,

जय भीम, जय अण्णा भाऊ !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!