महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर जगाचे लक्ष लागले आहे !

या सत्तेविरूध्दचा एक मुद्दा वा भ्रष्टाचाराची एक फाईल जरी आज जनतेसमोर आली तरी हि मोदी सत्ता पुन्हा सत्तेवर तर येणार नाहीच पण पुढील कित्येक वर्षे भाजपाला आपला प्रचार आणि प्रसारही करणे मुश्किल होऊन जाईल. कारण त्यांनी जर्मनीमध्ये जसे हिटलरच्या समस्त सहकार्यांनी स्वतःला "हिटलरचा परिवार" घोषित केले होते तसे आज भाजपाने "आपण मोदीचा परिवार" असे जाहीर केले आहे. आणि हा परिवार काय आहे हे या " इलेक्ट्रॉरल बाँन्ड " मधून जनतेसमोर प्रकट होणार आहे.
आणि म्हणूनच मोदीसत्तेने थेट S.B.I. या बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमावर एक प्रकारचा दबाव आणून इलेक्ट्रॉरल बाँन्ड ची यादी आपण जूनपर्यंत म्हणजे हि 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सादर करू शकतो , असे सर्वोच्च न्यायालयास सांगितले आहे . अर्थात SBI असे का सांगत आहे हे जनतेला पूर्णतः उमजत आहे . उलट जनतेचे प्रश्न असे आहेत की ज्या ' डिजिटल भारत ' चे गुणगान स्वतः मोदी , भाजपा आणि RSS उच्चरवाने प्रचार करत होती त्या डिजिटल भारतात ही SBI येत नाही का ? नोटबंदीच्या आधी या सत्तेने अगदी भीक मागून जगणाराचे बँक खातेही ' जनधन ' योजनेतर्गत काढून त्याला रातोरात या डिजिटल भारतात आणले ते डिजिटलायझेशन या " इलेक्ट्रॉरल बाँन्ड " बाबतच नेमके फेल का झाले ? आपल्या खातेदाराला प्रत्येक अपडेटसबाबत क्षणभरात सूचना देणारी , तीन वर्षाची स्टेटमेन्ट एका क्लिकवर देणारी ही SBI सरकारच्याच
' इलेक्ट्रॉरल बाँन्ड ' चे व्यवहार हस्तलिखिताद्वारे का , कशी व कोणासाठी ठेवू लागली ? असे अनेक प्रश्न आज जनता विचारत आहे . त्याची उत्तरंही स्वतःच देत आहे . आणि ते म्हणजे " दया ! कुछ तो गडबड जरूर है !"
अर्थात आज जनता एवढाच विचार करत नाही तर " कर नाही त्याला डर कशाला ? " असेही म्हणते ! मोदींकडे आज एक फाईल आहे . त्यात मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचे जे लाभार्थी आहेत, त्यांची यादी आहे .ही यादी 43 कोटीची आहे .आणि गेल्या वेळी तर मोदी 22 /23 कोटी मतदानाने बहुमत घेऊन निवडून आले होते .आज तर 43 कोटी लाभार्थी त्यांच्या पाठीशी आहेत. मग या राहूल गांधी यांच्या न्याय यात्रेला किंवा इलेक्ट्रॉरल बाँन्डच्या यादीला त्यांनी घाबरण्याचे कारण काय ? असेही जनता विचारत आहे.
जनतेचा दुसरा प्रश्न असा आहे की आज 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना मोदी आज तिच 2014 ची ' काँग्रेस भ्रष्टाचारा ' चीच टेप पुन्हा का वाजवत आहेत ? त्याच त्या ‘परिवारवादा' वर का घसरत आहेत ? पुन्हा 2014 ला जसा स्वतःच्या गरीबीचा आणि स्वतःला " व्हिक्टीम "आणि सामान्य ठरवून प्रचार केला तोच प्रचार आज का करू लागले आहेत ? सरकारी बडे अधिकारी - लष्कर यांना " मोदी सरकार " च्या प्रचाराला जुंपूनही स्वतःला " गरीब बिचारा … " ठरवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे प्रयत्न का ? संसदेत ' छाती ठोकून ' " एक अकेला सबपे भारी " वाले ते जाँबाज मोदी कुठे गेले ? जगात भारताचा डंका करणारे , एक फोनवर ' रशिया - युक्रेन युध्द थांबवणारे , विश्वगुरू होणारे , अमेरिकाही आपल्या समोर नतमस्तक करणारे असे मर्यादा पुरूषोत्तम रामालाही भारतात आणून त्यांना मंदिर बहाल करणारे , स्वतःच शंकराचार्य होऊन हिंदूंचा उध्दार करणारे ते महान व अमर्याद शक्तीचे मोदी कुठे गेले ? राफेल , पेगासस आदी प्रकरणांना न घाबरता " राष्ट्रीय सुरक्षे "ची ढाल करून त्यातून सहीसलामत बाहेर पडलेले मोदी आज या " इलेक्ट्रॉरल बाँन्ड " पुढे इतके का घाबरले आहेत ? सर्वच पक्षांचे फंडिंग जाहीर होणार असताना एकटा मोदी यांचाच पक्ष इतका घाबरण्याचे कारण काय ?
आज हा राष्ट्रीय म्हणविणारा मिडीया कोणाच्या पैशावर पोसला जातोय ? 10 ते 25 टॉपचे कार्पोरेटस- उद्योगपती यांच्याच भल्याची पॉलिसी या सत्तेने का आणि किती करोडच्या इलेक्ट्रॉरल बाँन्डच्या बदल्यात आखली ? वाढत्या गरीबीचा असंतोष थोपविण्यासाठी आज ही सत्ता 80 कोटी जनतेला मोफत धान्य देते त्याचा खर्च सव्वादोन लाख कोटी आणि या इलेक्ट्रॉरल बाँन्ड द्वारे सत्ता पक्षाला किती लाख करोड मिळतात , ते का व कशासाठी आदी अनेक बाबी या इलेक्ट्रॉरल बाँन्ड च्या यादीतून जनतेसमोर येणार आहेत. आणि मग … …
देश सुरक्षित हातात आहे , मोदीशिवाय आहेच कोण , मोदी हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ अशा प्रचाराचे व स्वतः मोदी यांचे बिंग फुटणार आहे . व म्हणून आज भाजपा - RSS आणि मोदी यांच्यात घबराट आहे . सर्वोच्च न्यायालय आता काय भूमिका घेते याकडे भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे.
● विजय घोरपडे .
.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत