महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ८३


बुद्धांचे विरोधक व शत्रू

भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार जसजसा चोहीकडे वाढत चालला होता, तसतसे त्यांच्यावर आरोप आणि टिका होऊ लागले होते. त्यातील काही निवडक आरोप पुढीलप्रमाणे आहेत.
मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप
एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये तथागत बुद्ध वास्तव्यास होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे आला आणि म्हणाला,
“तथागत, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादुगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादुटोणा त्यांना अवगत आहे.”
“जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्याचा हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवी लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही. पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे, त्याबद्दल ऐकण्याची आमची इच्छा आहे.”
तथागत म्हणाले, “भद्दीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करु नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरुपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारु नका. तुम्हाला ती न्याय्य वाटते, म्हणून ती मान्य करु नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारुन जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारु नका.”
“पण भद्दीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते अयोग्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले, तर त्याचा तुम्ही त्याग करा.”
.”भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, ‘प्रिय शिष्या, लोभयुक्त विचारांचे नियमन करुन तू राहात जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रिण ठेवून तू वाग.”
“भद्दीय, जे श्रमण ब्राम्हण माझी निंदा करतात की, श्रमण गौतम जादूगर आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे. ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भूलवतो; ते लबाड व खोटे बोलणारे आहेत.”
परोपजीवी असल्याचा आरोप
तथागत बुद्धांवर परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करुन स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर खालीलप्रमाणे उत्तर असे:
एकदा तथागत बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राम्हणाच्या गावात राहात असत. त्यावेळी कृषिवल भारद्वाजाचे पाचशे नांगर शेतीसाठी जोडले जात होते.
पहाटे लवकर चीवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राम्हण काम करीत होता, त्या ठिकाणी तथागत गेले. त्या वेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते, तथागत एका बाजूला उभे राहिले.
ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राम्हण म्हणाला, “श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्हीसुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे.”
“ब्राम्हणा, मीही खाण्यापुर्वी नांगरतो आणि बी पेरतो.”
“श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की, मी खाण्यापुर्वी नांगरतो आणि बी पेरतो.”
“तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता. पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे.”
“श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभीरुता हा दंड. विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी.” तथागतांनी उत्तर दिले.
“वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून, निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने, जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी, मला तो घेऊन जातो.”
हे ऐकल्यावर ब्राम्हणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती तथागत बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, “श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा, खरोखरच आपणच कृषीवल आहात. आपण अमृताचे पीक काढता.”
तथागत त्यावर बोलले, “पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राम्हणास ते दे. त्याने पुण्यलाभ होईल.”
तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राम्हण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, “श्रमण गौतम, अद्भुत! खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखाद्या अधःपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करुन सांगितला.”
“बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्या आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा.” अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रव्रज्या व उपसंपदा ग्रहण केली.
सुखी कुटुंबे उद्ध्वस्त केल्याचा आरोप
मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदारपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, “श्रमण गौतम मातापित्यांना निःसंतान बनवित आहेत. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवीत आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत.”
“त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही.”
तथागत म्हणाले, “हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त एक सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल.”
“आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की, जे महावीर आहेत, जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्धान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून दीक्षा घ्यावी.”
भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की, शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे; कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले.

क्रमशः
आर.के.जुमळे
दि.५.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड सहावा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!