भगवान बुद्धांची शिकवण-भाग ८०

धम्मदीक्षा
भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून होता. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित (organised) अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये, संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई. मात्र ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल, परंतु संघप्रवेश करावयाचा नसेल त्यांच्यासाठी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून गृहहीन बनणे. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्धधर्माचा -हास झाला, त्यांपैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भटकायला मोकळा राहत असे आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे.
भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता.
अशी तक्रार बुद्धांकडे आल्यावर ते ती पडताळून बघायचे आणि विनयपिटकांतील तत्संबंधीच्या नियमात सुधारणा करायचे जेणेकरून अशा प्रकारचे आचरण परत घडून आल्यास संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात ते गणले जाईल.
विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण व योग्य न्याय आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता.
भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म
भगवान बुद्धांनी आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धांनी जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे.
पंचशील, अष्टांगमार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते, ही त्यांच्या स्वरुपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे; आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरूरी नाही.
“ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत.”
तथागत बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो उपदेश प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे.
“हत्या करू नका. मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकल प्राणिमात्रावर प्रेम करा.”
“कोणीही उपासकाने मुद्दामहून चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे.”
“उपभोग ही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रम्हचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका.”
“राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका, किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा.”
“मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा.”
“मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा.”
“हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यांपासून परावृत्त व्हा.”
“सप्ताहामागून सप्ताह, उपोसथाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने अष्टशीलांचे पालन करा.”
“प्रातःकाळी पवित्र, श्रद्धायुक्त व कृतज्ञतापूर्वक चित्ताने वरील उपोसथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या.”
“आपल्या आईवडिलांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा.”
“असा एकनिष्ठ उपासक उच्च प्रतीच्या, प्रकाशित अशा जगात प्रवेश करील.”
ह्यावरून स्पष्ट होईल की, धम्म हा दोघांना समान आहे. परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे.
भिक्खूंना पाच व्रते अनिवार्य आहेत.
आपण हत्या करणार नाही, असे व्रत त्याला धारण करावे लागते.
दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
स्त्रीसुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते.
उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते.
हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की, भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वच्छेने करावयाचे असते.
ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत:
भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते.
भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते.
भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे. तथापि, धम्म हा दोघांनाही समान आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत