मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त विद्रोही कवितांचा एल्गार व भीम विचारांचा जागर..

धाराशिव :- गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रमाई फाउंडेशन धाराशिव द्वारा आयोजित “भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच संत सेवालाल महाराज यांची जयंती व पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त” विद्रोही कवितांचा एल्गार हा कार्यक्रम घेऊन भीम विचारांचा जागर आणि निमंत्रित कवींचे काव्य संमेलन संपन्न करण्यात आले. आयु. उत्कर्षा वाघमारे- चिलवंत व छत्रपाल वाघमारे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या काव्य मैफिलीस रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद धाराशिव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये विद्रोही साहित्य संमेलनातील अनेक सुप्रसिध्द मान्यवर उपस्थित होते. संविधान उड्डेशीका व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व धाराशिव सुपुत्र पँथर यशपालजी सरवदे यांना विनम्र आदरांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व पुरातत्व विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयु. रवींद्र शिंदे सर तसेच ज्येष्ठ साहित्यिक आयु. जयराज खुणे सर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. भरत यादव (विद्रोही साहित्य संमेलनातील एका सत्राचे उद्घाटक) व मा. सचिन भैय्या शिंदे (समर्थ सिटी -धाराशिव) यांनी केले. कार्यक्रमांमध्ये आपल्या सहज सोप्या भाषेत सादरीकरणा साठी प्रसिद्ध असलेले “कधीही न रडणाऱ्या, नुसत्याच कणणाऱ्या कांबळेंना भीमसैनिकांच्या मनामनात पोहोचविणारे प्रतिभावान कवी आयु. नितीन चंदनशिवे, साहित्य-भाषा-व शब्दांचे विविध प्रकार आणि अर्थ यामध्ये विशेष प्राविण्य असलेले लेखक कवी डॉ. केशव खटिंग, “भीम मोत्यांचा हार ग माय” या सुप्रसिध्द रचनेने घराघरात पोहोचलेले आयु. नारायण पुरी, गझल- कवितावाचन यामध्ये विशेष प्राविण्य असलेल्या- पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार प्राप्त व प्रथमच डॉ. यशवंत मनोहर यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या मानकरी आयु. भाग्यश्री केसकर, सुप्रसिध्द कवी, अभ्यासक व अप्रतिम सूत्रसंचालन आयु. रवी केसकर, अस्सल दख्खनी शैलीत लिखाण व सादरीकरण करण्यात प्रवीण असलेले आयु. डी के शेख, लातूरची विद्रोही तोफ आयु. दिलीप गायकवाड, धारदार शब्दांचे धनी-प्रतिभावान कवी आयु. पंडित कांबळे, धाराशिव चे सुपुत्र व उत्तम रचनाकार आयु. विजय गायकवाड व पी.के.बनसोडे सर इत्यादी ज्येष्ठ व प्रसिद्ध कवींनी आपल्या रचना सादर करत श्रोत्यांमध्ये विद्रोहाचा विस्तव प्रज्वलित केला.

अंगावर शहारे आणनाऱ्या भारदस्त कवितांच्या मैफिलीत संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. काव्यमय वातावरणात उपस्थितांनाही कविता वाचनाचा मोह आवरता आला नाही व कांहीं उपस्थितांनीही दिलखुलास कविता वाचल्या व प्रेक्षकांची दाद मिळवली.

पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या,
लख्तरात लपेटलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नाचविनाऱ्यानो.. तुमचा अंत जवळ आलाय..!” या ओळी आजही जातीवाद्यांच्या उरात धडकी भरवतात.

समाजाला जागे करण्यासाठी, स्फुरण देण्यासाठी आजही पद्मश्री नामदेव ढसाळ प्रश्न विचारतात की,
“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी ?
मरेपर्यंत राहायचं का असच युद्ध कैदी..!
या ओळी प्रेरणादायी ठरतात.

“कोणी नाही लहान- कोणी नाही मोठा.. बैलांच्या भांडणात मोडून जाईल गोठा !!”
अस सांगत शेवटी आपापसातील वाद मिटवून सारे एकत्र येऊन व्यवस्थेशी लढा देऊया अन्यथा गटातटात विखुरलेल्या समाजाचे भविष्य अंधकारमय होईल या आशयाचा संदेश देण्यात आला.
डॉ. केशव खटिंग यांनी सादर केलेल्या
भिमाईच्या काळजाला स्पर्श करणाऱ्या जात्यावरील ओव्यांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी आयु. शहाजी कांबळे यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रंचालन रमाई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आयु. पृथ्वीराज चीलवंत व नवोदित कवी आयु. सचिन दिलपाक यांनी केले तर उपस्थित मान्यवर व रसिकांचे आभार आयु. सुदेश माळाळे सर यांनी मानले.

चिरंजीव अथांग पृथ्वीराज चीलवंत यास वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांनी आभाळभर शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमरशक्ती चिलवंत, राहुल वाघमारे, रोहित शिंगाडे, नितीन लांडगे, रणजीत कांबळे, दत्तात्रय वाघमारे, शीलरत्न भालशंकर, परमेश्वर माने, रावसाहेब मस्के, सचिन दिलपाक, सोमनाथ गायकवाड, उदयराज बनसोडे, नवनाथ सोलंकर, विवेक साळवे, शरद पालके, विकी नाईकवाडे, राजरत्न ओव्हाळ, सिद्धोधन शिंगाडे, प्रमोद ढवळे, प्रफुल्ल माळाळे, अजित धावारे, रोहित कदम, धम्मपाल वाघमारे, अजय गायकवाड, संदीप मुंडे, आनंद वाघमारे, सम्यक चिलवंत, मुकेश गायकवाड, अनुज झेंडे, प्रदीप विधाते व वारणेचा वाघ सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला धाराशिव शहर व जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक रचनाकार, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, विविध क्षेत्रातील महिला व मुली, जाणकार अभ्यासू विद्यार्थी व दर्दी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!