आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून धम्म
मानिक वानखेडे, वर्धा
जेव्हा आपण धम्मग्रंथ वाचत असताना श्रद्धा निर्माण झाली तर शोध घेण्याची आवश्यकता नसते असे बुद्ध म्हणतात. श्रद्धा म्हणजे मान्यता ! हीच मान्यता सत्य शोधण्यात बाधा निर्माण करते. कारण जर शंका, प्रश्न, संशय नसले तर खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्याची अजिबात आवश्यकता नसते. आणि हीच श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा होय. म्हणूनच आजही जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले आहेत त्यांच्या नावावर जे काही सांगितले गेले त्यावर कोणीही शंका न घेताच मान्य केले आहे. परंतु बुद्ध ह्याबाबत अगदी वेगळे आहेत. ते म्हणतात प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी विवेकबुद्धी असते तेथे श्रद्धेला स्थान नसते. श्रद्धा आणि विवेक सोबत ठेवणे म्हणजे दुध मिठामध्ये टाकणे होय. त्याचा परिणाम सर्वांना माहीतच आहे. म्हणून ते म्हणतात-
वेद प्रमाणातील आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की, वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादातीत (अचूक ) नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. संदर्भ –
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र, २१४ अनु क्र.७ त्यांच्या म्हणण्यानुसार वेदच काय कोणतेही वाङ्मय, ह्यामध्ये तीन पेटारे येत नाही काय ?
ज्ञान मिळविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पण पाहा –
कोणतेही नवे ज्ञान मिळविणे हे सामाजिक प्रगतीचे पूर्वचिन्ह आहे. ही ज्ञानसंपदानाची प्रक्रिया योग्य होण्यासाठी जिज्ञासूपणा, चौकसपणाची आवश्यकता आहे. जिज्ञासा म्हटली की संशय आलाच. कारण संशयाशिवाय प्रश्न नाही आणि प्रश्नाशिवाय ज्ञान नाही. ज्ञान ही काही जड, स्थिर किंवा अक्रियाशील प्रक्रिया नाही. ज्ञान मिळवावेच लागते. त्याचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी परिश्रम आणि त्याग यांची आवश्यकता असते. अर्थातच, आपण आधीच ज्याबाबतीत संतुष्ट आहोत त्याबाबत आपण प्रयत्न वा परिश्रम करणार नाही. अंधार दिसलाच नाही तर प्रकाशासाठी कोण प्रयत्न करणार. एखाद्या गोष्टीबद्दल आपली खातरजमा झाली असेल तर पुढे आपण चौकशी करतो कशाला ? करणारच नाही. शोधप्रकिया सुरू होण्यापूर्वी संशय आलाच पाहिजे आपण असे मान्य केलेच पाहिजे की, सर्व प्रगतीचा निर्माता हा संशय आहे. जिज्ञासा हीच प्रगतीकारक होय. ” ब्राम्हणांनी एक चूकीचा समज सर्वत्र पसरवला की वेद हेच प्रमाण, वेदांत काहीही चूक नाही, वेदांच्या विरुद्ध काहीही असू शकत नाही. अर्थातच या समजामुळे जिज्ञासेची संशयाची, चौकसपणाची दारेच बंद झाली. संदर्भ – RIDDLES IN HINDUISM, हिंदुत्वातील कुटप्रश्न अनुवाद डॉ न.म.जोशी पृष्ठ क्र …(VII)…
हा संदर्भ अनेकदा दिला तरीही, जे काम ब्राम्हण करीत होते की, वेदात काहीही चूक नाही, वेद हेच प्रमाण, वेदांच्या विरुद्ध काहीही असू शकत नाही, तेच काम आजचे थेरो, महाथेरो, बौद्धाचार्य, धम्माचार्य आणि धम्म अभ्यासक करीत आहेत, की तीन पेटारे हेच प्रमाण, तीन पेटाऱ्यात काहीही चूक नाही, तीन पेटाऱ्याच्या विरूद्ध काहीही असू शकत नाही. आणि ह्याच समजामुळे तीन पेटारे समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासेची, चौकसपणाची,संशयाची दारेच बंद झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार आपण स्वतःच जिज्ञासूपणा चौकसपणाची दारे बंद केलेली आहे. आणि आजही ती उघडण्याची हिम्मत कोणी करीत नाही. ह्यावरून असे दिसून येते की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सुत्राला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे.
नवोदित धम्मदिक्षीतांच्या मनात ओलावा निर्माण होण्यासाठी जर अलंकारिक भाषेची आवश्यकता असेल तर हिंदु धर्मातील रामायनात हनुमान सूर्याला सफरचंद समजून खायला निघाला होता, त्याला का मान्य करीत नाही ? तो अलंकार नव्हे काय? खरं म्हणजे आपल्या मनातील अंधश्रद्धा कायम ठेवण्यासाठी तिला अलंकार समजून मान्य करायचे आहे. मग तो अलंकार योग्य असो किंवा नसो. चमत्काराला जर अलंकार मानले तर अंधश्रद्धा आणि खुळ्या समजुती ह्या कायम राहणारच. अलंकारिक भाषा कशी असते ते समजून घ्या. तुलनात्मक वाक्य कसे असते ते पाहा –
मला ह्या अनेक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांची ही वाटत नाही.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र, ४५ अनु क्र. ८ ह्यात ऐहिक वस्तूंची तुलना सर्पाशी, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताशी आणि वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांशी केलेली आहे.
पुढे सिद्धार्थ गौतम म्हणतात –
राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दु:खे मोठी असतात. कारण राजा हा कपडे टांगण्याच्या खुंटीसारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. संदर्भ – उपरोक्त पृष्ठ क्र ४८ अनु क्र ३५
ह्यात राजाची तुलना कपडे टांगण्याच्या खुंटी सोबत केलेली आहे. हे तुलनात्मक वाक्य आहे.
रूपक अलंकार कसा असतो ते पाहा –
भिक्खूंनो चक्षुरिंद्रिय हे पेटलेले आहे. चक्षुसंस्कार हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव ( चक्षुसंस्कार) ही पेटलेली आहे. चक्षूसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक व दुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत.
आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत ?
त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने,जन्म,जरा, मृत्यू, दुःख,दौर्मनस्य, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. संदर्भ – उपरोक्त – पृष्ठ क्र १८१ अनु क्र १८, १९ आणि २०
ह्यावर तीन पेटारे रचणारा लेखक आपले मत व्यक्त करताना म्हणतो –
माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे, हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजना बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. संदर्भ – उपरोक्त – पृष्ठ क्र १८२ अनु क्र ३२
तसेच रागाग्नी,द्वेषाग्नी आणि मोहाग्नी हे अग्नीचे रूपक अलंकार युक्त शब्द आहेत.
………कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली संदर्भ – उपरोक्त , पृष्ठ क्र ८३ अनु क्र ३ , प्रकरण २. बुद्धाने कोणते बदल केले ? ह्यातील जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली हे उपमा अलंकार युक्त वाक्य आहे. ह्याचा अर्थ असा आहे की, हिंदू धर्मातील आत्माचा आणि कर्म ह्यांचा पुनर्जन्म होतो म्हणजे मनुष्यातील आत्म्याचा फेरा- संसार (८४ लाख योनी) ह्या ऐवजी पुनर्जन्म सिद्धांता ऐवजी बुद्धाने पुनर्जन्माला स्थान दिलेले आहे. पाहा, पृष्ठ क्र ८३ अनु क्र ४.
आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रज्ञासूर्य म्हणतो. हा शब्द उपमा अलंकार आहे. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्ता आणि विवेकबुद्धीला सूर्याची उपमा दिलेली आहे आणि वास्तविकतेवर आधारीत आहे. ज्या प्रमाणे सूर्य प्रकाशीत असतो अगदी त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विवेकबुद्धी आणि विद्वता आजही प्रकाशित आहे.
परंतु अंगुलीमालाच्या धावण्याची तुलना हत्ती,घोडा, गाडी आणि हरिणाच्या पळण्या सोबत केली आहे. हे तुलनात्मक वाक्य आहे. परंतु इतक्या वेगात धावत असूनही तो बुद्धाला गाठू शकत नाही. पाहा – पृष्ठ क्र १५८ अनु क्र ९. ही चमत्कारीक कपोलकल्पित कथा नाही काय ? हे निसर्ग नियमाविरुद्ध आणि वास्तवाशी विसंगत नाही काय ? ह्याबाबत बुद्ध काय म्हणतात ते पाहा –
सम्यक दृष्टीकरीता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.
ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. संदर्भ – उपरोक्त , पृष्ठ क्र ९७ अनु क्र २१ आणि २२
जर आपण अलंकारिक भाषा आहे असे समजून मान्य केले तर आपली मिथ्यादृष्टी आहे असा त्याचा अर्थ होतो.
ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता ह्यात कुठेही उपमा अलंकार किंवा रूपक अलंकार नाही. ते सत्य आहे. कारण जगात ब्रिटिशांचे साम्राज्य जेथे जेथे होते तेथे कोणत्यातरी राज्यात सूर्य असायचा. हाच त्याचा सोपा आणि सरळ अर्थ आहे.
ही सविस्तर माहिती देण्याचे कारण की, आपल्या मनातील ज्या भ्रामक समजुती, अंधश्रद्धा आहेत त्याची अलंकार समजून जोपासना करू नका. धम्म समजण्यासाठी फारच घातक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सुत्रांचे पालन करा. ते म्हणतात –
दैवी चमत्कृतिवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते.
त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धीवादी बनविणे.
त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.
त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजूती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे.
यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतूवाद म्हणतात.
हा हेतूवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादांपेक्षा वेगळा नाही. संदर्भ – उपरोक्त – पृष्ठ क्र १९२ अनु क्र १६ ते २१
जर आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी आहोत आणि त्यांच्यावर विश्वास असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सुत्रांनुसारच धम्म समजून घ्यावा लागेल अन्यथा अलंकारिक भाषेच्या जाळ्यात अडकलो तर बाहेर निघने कठीणच नाही तर असंभव आहे. म्हणून मनातील भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा सडलेल्या आंब्या प्रमाणे फेकून द्या.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत