देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसंपादकीय

फिनलॅंड येथील शिक्षण !

  फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. 

   फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. 
    या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं आणि लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च सरकार उचलतं. या देशात एकही शाळा खाजगी नाही. 

या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना दुपारचं जेवणही दिलं जातं. ते मोफत तर असतंच, पण अतिशय उच्च दर्जाचं असतं. इथलं कोणतंही मूल सात वर्षांचं होईपर्यंत शाळेत जात नाही. सात वर्षांच्या आधी मुलांना शाळेत ‘टाकणं’ हा गुन्हा समजला जातो. सात वर्षापर्यंत मुलांनी आपलं बालपण जगून घेतलं पाहिजे, असं तिथं मानलं जातं. सात वर्षांच्या आतल्या मुलांना सांभाळण्यासाठी सरकारी संस्था असतात. सहा वर्षांच्या मुलांसाठी शाळेत प्रवेश देण्याआधीही संस्था असतात. पण तिथंही मुलांना पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही. तिथं त्यांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, नवे मित्र मिळवणं, दुसऱ्या मुलांना समजून घेणं, परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल हे पाहणं, अशा गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात. त्यानंतर सात ते सोळा या वयोगटासाठी तिथं शिक्षण अनिवार्य आहे.

    इथं प्रत्येक वर्गातली पटसंख्याही छोटी असते. फक्त वीस मुलांना एका वर्गात ठेवलं जातं. शाळेचा वेळही अगदी कमी असतो. दिवसातले फक्त चार तास. त्यातच दुपारची जेवणाची सुट्टीही असते आणि घरी जाताना मुलांना गृहपाठ अजिबात दिला जात नाही. त्यांनी आपल्या घरी अभ्यास करावा, असं तिथल्या शाळांना, सरकारला आणि त्यांच्या घरच्यांनाही वाटत नाही. अर्थात तिथंही काही मुलं अभ्यासात कमकुवत असतात. पण अशा मुलांना कुणी नावं ठेवत नाही, हिडिसफिडिस करत नाही. अशा मुलांवर शिक्षक आणि शाळा विशेष लक्ष देतात. त्यामुळं अभ्यासाची एक सरासरी ते गाठतातच. फारच गरज वाटली तर अशा मुलांना विशेष वर्गात पाठवलं जातं.

     फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे फारच महत्वाचं आणि मानाचं समजलं जातं. समाजात शिक्षकांना मोठ्या विशेषत्वानं आणि सन्मानानं वागवलं जातं. अर्थात शिक्षक होण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही, तर काही निवडक आणि पारखून घेतलेल्या लोकांनाच शिक्षक केलं जातं. शिक्षक होण्यासाठी पदविकेपर्यंत शिक्षण लागतं, पण सोबत इतरही सवयी, वर्तणुकी योग्य असाव्या लागतात. सगळ्या गोष्टींची नीट पारख करून आणि पारखण्यात कसलीही हयगय न करता मगच निवड केली जाते. ज्यांना भविष्यात शिक्षक व्हायचंय, त्यांचं वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच शिक्षक होण्याचं प्रशिक्षण सुरू केलं जातं. बाकीच्या शिक्षणासह त्यांना शिक्षक होण्याचा वेगळा आणि विशेष अभ्यास करावा लागतो. मग पदविकेपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची शिक्षक होण्याची परीक्षा घेतली जाते. त्यात अभ्यासूपणा, कल्पकता, ज्ञान, नाविन्याची ओढ आणि विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव तपासला जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे या देशात प्रत्येक शिक्षकानं स्वतःचे शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी पूर्ण मुभा दिली जाते. उलट प्रत्येक शिक्षकाकडून तीच मोठी अपेक्षा केली जाते की, जुन्या गोष्टींचा घाण्याचा बैल होण्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानं अभ्यासात, शिकवण्याच्या पद्धतीत, शिकवायच्या विषयांत सतत नाविन्य आणावं, नव्या नव्या गोष्टी कराव्यात आणि नियमितपणे काळाच्या पुढं राहावं. एका अर्थानं तिथला प्रत्येक शिक्षक हा संशोधकच असतो.

   फिनलँडच्या शिक्षणव्यवस्थेत मुलांची परीक्षा घेण्याची पद्धत नाही. त्यामुळं मुलांवर परीक्षेचा ताण अजिबात नसतो. तिथं मुलांनी शिकणं महत्वाचं मानलं जातं, परीक्षा देणं नाही. आपलं नऊ वर्षांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलाची राष्ट्रीय स्तरावर एक चाचणी घेतली जाते. त्या मुलाला पुढच्या शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी ही चाचणी महत्वाची असते, आणि तिच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. त्या चाचणीत सहसा कुणी अनुत्तीर्ण होत नाही. पण पुढं मूल कोणत्या शाखेत जाणार हे या चाचणीत ठरतं.

     इथल्या शाळांमध्ये आणि शिक्षणात ज्ञान आणि इतरांशी सहकार्याची भावना या गोष्टींवर भर दिला जातो. मुलांना आपापसात स्पर्धा करू दिली जात नाही. शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की, मुलं एकमेकांशी स्पर्धा करण्यापासून दूर राहतात. सोबतच मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातल्या आणि व्यवहारी गोष्टी शिकवल्या जातात. * धर्म, परमेश्वर अशा गोष्टींचा लेशही त्यांच्या शाळांमध्ये आणि शिक्षणात नसतो . इथली शिक्षणपद्धती* मुलांना नुसतं शिक्षित बनवत नाही, तर सुशिक्षित बनवते आणि त्याबरोबर प्रत्येक मूल चांगलं माणूस होईल, आदर्श जगेल-वागेल, हेही शिकवते. इथल्या शिक्षणात जास्त जोर असतो तो गणित आणि विज्ञानात. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आणि शिक्षक विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या बाबतीत आधुनिक राहिले पाहिजेत याची दक्षता घेतली जाते. सोबत त्यांनी मुलांना शिकवण्याच्या नव्या नव्या पद्धती शोधल्या पाहिजेत, हेही अपेक्षित केलं जातं. 

      इथल्या शाळांमध्ये मुलांना वेळेचं बंधनही नसतं. वर्गातल्या अभ्यासाचे तासही बंधनकारक नसतात. कोणतंही मूल त्याला हवा तेवढा वेळ वर्गात बसू शकतं. त्याला वाटलं, वर्गाच्या बाहेर जावं, खेळावं किंवा मस्त आराम करावा, तर ते मूल ते करू शकतं. शाळा त्याला त्या सोयी पुरवते. सर्व शाळांमध्ये मुलांच्या अभ्यास सोडून खेळण्याच्या किंवा आराम करण्याच्या सोयी असतात. प्रत्येक वर्गात दर पंचेचाळीस मिनिटांनंतर मुलांना पंधरा मिनिटांची सुट्टी दिली जाते. मुलं त्या वेळात खेळू-बागडू शकतात, शाळेच्या बागेत फेरफटका मारू शकतात, हवं ते करू शकतात. अर्थात वर्ग चालू असतानाही मुलं हवं ते करू शकतात आणि बाहेरही जाऊ शकतात. वर्गात शिक्षकांशी किंवा इतर मुलांशी गप्पाही मारू शकतात. 

      वर्गात मुलांची आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्थाही मजेशीर असते. शिक्षक सहसा टेबल-खुर्ची वापरत नाहीत. मुलंही स्वतःला हवं तिथं बसतात. त्यांनी बाकड्यांवरच बसलं पाहिजे असं बंधन नाही. त्यांना वाटलं तर ते त्यांच्या खुर्चीत बसतात, जमिनीवर बसतात, पाय पसरतात किंवा चामड्याच्या बिनचेअरवर रेलून बसतात. वर्गाला वाटलं तर शिक्षकांच्या भोवती गोल करून जमिनीवर बसतो. शिक्षकही मुलांमध्ये जमिनीवर बसतात. कधी कधी वर्ग शाळेच्या गच्चीत किंवा बागेतही बसतो. मुलं आणि शिक्षक मित्र होऊन ती गोष्ट ठरवतात. त्यात मुलांच्या इच्छेला पहिला मान. सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक मुलांचे चांगले मित्र असतात.

    अशी ही शिक्षणव्यवस्था आजच्या जगात पहिल्या क्रमांकाची मानली जाते. १९७० साली त्यांनी शिक्षणाचा हा प्रयोग सुरू केला आणि १९९० पासून तोच पक्का केला. आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्रामध्ये क्रमांक एकवर आहे. स्त्रीपुरुष समानतेच्या बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे आणि तुम्ही ते ऐकलंच असेल की, जगात सर्वात आनंदी देशांमध्येही फिनलँड क्रमांक एकवर आहे.

   नालंदा तक्षशीला यांचा वारसा सांगणारा भारत असा कधी होईल ? 

   एक शिक्षक अथवा भारताचा नागरीक म्हणून या प्रश्नाचा विचार कराल का ?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!