देशभारतमहाराष्ट्रमुख्य पानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय प्रजासत्ताक आणिसंविधाननिष्ठ राष्ट्रवाद

डॉ.अनंत दा.राऊत

                                       

 २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून भारतातील राजे, सरदार, सरंजामदार यांची परंपरागत सत्ता कायदेशीररीत्या संपुष्टात आली आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. प्रजासत्ताकामध्ये देशाची अंतिम सत्ता देशातील प्रजेच्या म्हणजेच सामान्य नागरिकांच्या हाती असते. भारतीय संविधानाने विविधतेने नटलेल्या व तुटलेल्या समग्र भारतीयांना एकराष्ट्रीयत्वाच्या पक्व धाग्यात गुंफले आणि तेव्हापासून आपण एक राष्ट्र म्हणून वाटचाल करू लागलो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधाननिष्ठ राष्ट्रवाद कसा असतो ते सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.

        संविधान हा आधुनिक काळातील राष्ट्रनिर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक असतो. कोणतेही आधुनिक राष्ट्र उभे असते ते  संविधानाच्या पायावर. विशिष्ट  भूप्रदेशावरील लोकांचे एक राष्ट्र घडवणारा संविधान हा मूलभूत असा तात्त्विक व कायदेशीर आधार असतो. संविधान आपल्या आदर्श नियमांनी व मूल्यात्मक धाग्यांनी राष्ट्रातील समग्र जनतेला एकत्रित गुंफत असतो.माणसाच्या शारीरिक व मानसिक अस्तित्वाच्या चैतन्यशील चलनवलनात मेंदू या घटकाला जेवढे महत्त्वाचे स्थान असते तेवढेच राष्ट्र या संकल्पनेच्या चैतन्यशील चलनवलनात संविधान या घटकाला महत्त्वपूर्ण असे स्थान असते. आधुनिक काळात संविधानाशिवाय कोणतेही राष्ट्र अस्तित्वात येऊ शकत नाही व घडूही शकत नाही. ज्याला कुठलेही संविधान नाही असे कोणतेच राष्ट्र आज अस्तित्वात असू शकत नाही.

  राष्ट्र या संकल्पनेच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेल्या काही मूलभूत घटकांना केंद्रस्थानी ठेवून राष्ट्र संकल्पनेसंदर्भात मी अशी भूमिका मांडतो की, 'पृथ्वीवरील नैसर्गिक अथवा कृत्रिम सीमांनी बंदिस्त असलेल्या विशिष्ट भूप्रदेशातील असे लोक, की ज्यांचे मूलभूत हितसंबंध सारखे आहेत. जे आपल्या भूप्रदेशासंदर्भातील नजीकच्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन नवराष्ट्र निर्माणाच्या उदात्त ध्येयवादाने प्रेरित होऊन कार्यरत आहेत,ज्यांनी संघटितपणे परकीय सत्ता झुगारून स्वातंत्र्य व सार्वभौमत्व प्राप्त केले आहे. ज्यांच्यात मानवनिर्मित धर्म, जात, भाषा, संस्कृती असे काहीसे वेगळेपण असले तरी जे आपल्या अशा वैविध्यतेला भूषण मानून त्यांचा गौरव करत व परस्परांचा आदर करत मानसिकदृष्ट्या एकजीव होऊन आपल्या भूप्रदेशातील लोकांमध्ये सेंद्रिय एकजीवता आणू पाहतात, एका कुटुंबातील माणसे ज्याप्रमाणे परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होऊन परस्परांना जीव तोडून मदत करतात, ज्यांनी एक राष्ट्र म्हणून वाटचाल करण्याची प्रागतिक दिशा देणारे स्वतःचे संविधान बनवलेली आहे व जे आपल्या संविधानाला मूलभूत मार्गदर्शक ग्रंथ मानून त्यातील तत्त्व व मूल्यांना अनुसरून आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील प्रत्येक पाऊल टाकतात त्यांना एक राष्ट्रीय लोक म्हणता येईल. राष्ट्र हे सांविधानिक मूल्यधाग्यांनी सेंद्रिय रीतीने एकत्रित गुंफलेले नागरिकांचे संघटन असते, असेही म्हणता येईल.

    जे लोक स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सेक्युलरिझम, सहिष्णुता, सेवा, सहकार, त्याग, बुद्धिवाद विज्ञानवाद या मूल्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान देऊन वावरतात,ज्यांनी हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करून परस्परांमधील प्रश्न शांततामय अशा चर्चेच्या मार्गाने सोडवण्याचा

निश्चय केलेला आहे, ज्यांनी एक संविधान, एक राष्ट्रध्वज, एक राष्ट्रगान,एक फौज, एक संसद, एक प्रधानमंत्री किंवा एक राष्ट्राध्यक्ष, एक सर्वोच्च न्यायालय, एक निवडणूक आयोग, एक रिझर्व बँक, एक मुद्रा,एक प्रशासनव्यवस्था या गोष्टींचा मनोमन स्वीकार केलेला आहे, जे लोक आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तयार असतात, जे आपल्या राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव झटतात असे लोक स्वतःस एक राष्ट्र म्हणवून घेण्यास पात्र होत असतात. ज्या भूभागावरील लोक वरील प्रकारच्या मानसिकतेतून सर्व प्रकारचे सार्वजनिक वर्तन करतात ते संविधाननिष्ठ राष्ट्रवादी लोक आहेत असे म्हणता येईल.’

  प्रत्येकच राष्ट्राचे संविधान चांगले व परिपूर्ण असेलच असे नाही. चांगल्या संविधाना  संदर्भातील माझी भूमिका अशी आहे की, 'जे संविधान कुठल्याही अंध स्वरूपाच्या कल्पित घटकावर आधारलेले नसून, नैसर्गिक सत्याला भिडणारे व वास्तववादी असते, जे आपल्या भूप्रदेशातील नागरिकांमध्ये धर्म,जात,लिंग, वंश, इत्यादी

कारणांवरून कोणताही भेदाभेद न करता सर्वांना माणूस म्हणून समान दर्जा देते व सर्वांचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेते. ज्या संविधानाच्या तत्त्वज्ञानात मानवी कल्याणच्या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे, जे सकलजण कल्याणकारी नैतिकता, बुद्धिवाद व विज्ञानवादाला सर्वाधिक महत्त्व देते, ज्या संविधानात भविष्यकाळात उद्भवू शकणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करू शकण्याचा भविष्यवेधी दृष्टिकोन असतो, ज्याच्यात कालानुकूल अशा मानव्यनिष्ठ दुरुस्त्या करण्याची तरतूद असते,ते चांगले संविधान असू शकते.’

  संविधाननिष्ठ राष्ट्रवाद खालील उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी भारतीयांच्या मनामनात रुजवणे आवश्यक आहे. वर्तमानातील भारतीय नागरिकांना जात्यांध, धर्मांध, प्रांतांध,भाषांध प्रवृत्तींच्या विघटनकारी भैकाव्यांना बळी पडण्यापासून वाचवणे,भारतीयांना संकुचित अस्मितांमधून बाहेर काढून व्यापक स्वरूपाच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडणे, सत्यनिष्ठ, वास्तवाधिष्ठित व सकल जनहितकारी राष्ट्रवादाची भारतीयांना ओळख करून देणे, भारतीयांच्या मनात प्रागतिक राष्ट्रवादी भूमिका रुजवणे, समग्र भारतीयांना संविधाननिष्ठ राष्ट्रवादाच्या धाग्यांनी सेंद्रिय रीतीने एकत्रित गुंफणे,

संविधानाच्या पायावर उभ्या असलेल्या राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत राहण्यास प्रवृत्त करणे.

 आधुनिक अर्थाने भारताचे एक राष्ट्र बनवण्याची प्रक्रिया भारतातील इंग्रजी सत्तेच्या प्रस्थापनेनंतर सुरू झाली. इंग्रज भारतातून निघून गेले तेव्हा इथे जवळपास ६०० राज्ये/संस्थाने अस्तित्वात होती. ही लहान-मोठी राज्ये पूर्वीच्या काळात स्वतंत्र राष्ट्राप्रमाणेच वावरत होती. प्राचीन इतिहासाच्या व धर्म-संस्कृतीच्या आधारावर आजचे भारत हे राष्ट्र उभे नाही तर ब्रिटिश इंडियामधील सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळींनी केलेल्या वैचारिक पायाभरणीतून आधुनिक भारत हे राष्ट्र निर्माण झाले आहे. भावी भारताच्या नवराष्ट्र निर्मितीचे तत्त्वज्ञानच या कालखंडात विकसित होत होते. या तत्त्वज्ञानाच्या पायावरच व्यापक व सखोल असे विचार मंथन करून प्रगल्भ भारतीय नेत्यांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली. समतावादी, बुद्धिवादी विज्ञानवादी व सेक्युलर संविधानाची निर्मिती ही भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील अत्यंत क्रांतिकारी अशी गोष्ट आहे.

 २६ नोव्हेंबर १९५० पासून भारतात नव्या संविधान युगाची सुरुवात झाली. संविधान युग हे भारताच्या पूर्व परंपरेतील अतार्किक, विषमतावादी,अंधश्रद्धामूलक घटकांना नाकारणारे व भारताचे नवे समतावादी, बुद्धिवादी, सेक्युलर व सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करणारे  युग आहे. भारतीय संविधानाने विविधतेने नटलेल्या व जात, धर्म, पंथ,भाषा, प्रांत,संस्कृती इत्यादी घटकांमुळे परस्परांपासून तुटलेल्या व फाटलेल्या भारत भूमीतील लोकांना एकराष्ट्रीयत्वाच्या पक्व धाग्यामध्ये गुंफण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे काम केलेले आहे. भारतीय संविधान इथल्या लोकांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून जबरदस्तीने त्यांना एकत्रित ठेवत नाही, तर सर्वांना त्यांच्या प्रगतीसाठीचे मूलभूत स्वातंत्र्य देऊनच एकत्रित गुंफते. भारताचे संविधान सकल जनकल्याणाच्या नव्या राष्ट्रनिष्ठा जनमानसात  रुजवून परस्पर सहकार्याच्या तत्त्वाद्वारे नवराष्ट्र निर्माणाच्या कामाला लावू पाहते.

 भारतीय संविधानाच्या मुळाशी असलेले, जन्माधारित उच्चनीचतेला नाकारणारे मानव कल्याणकारी तत्त्वज्ञान, संविधानाने पुरस्कारिलेली जीवनमूलये, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्यांच्या द्वारे भारतीय नागरिकांसाठी घालून दिलेली आचारसंहिता, राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिवर्तनासाठी उभ्या करून दिलेल्या अनेकविध संस्था,भारतीयांच्या समोर ठेवले आदर्श, नव्याने निर्माण केलेली राष्ट्रीय प्रतीके, समग्र भारतीयांच्यासाठीचे राष्ट्रीय सण, संशोधनसंस्था, औद्योगिक संस्था, सिंचन प्रकल्प व स्मारकाच्या स्वरूपातील नवी पर्यटन संस्कृती इत्यादी घटकांवर निष्ठा ठेवणाऱ्या राष्ट्रवादास संविधाननिष्ठ राष्ट्रवाद असे म्हणता येईल.एक धर्म, एक वंश, एक जात, एक संस्कृती हे घटक राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असतात, हा संकुचित विचार स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील प्रगल्भ भारतीय नेत्यांनी व तेवढ्याच प्रगल्भ जनतेने स्पष्टपणे नाकारलेला आहे. 

      संविधाननिष्ठ राष्ट्रवाद नैसर्गिक सत्यावर, मानवी मूल्यांवर व विवेकावर आधारलेला आहे. तो संकुचित नाहीत तर व्यापक व सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. तो कुणाच्याही द्वेषावर आधारलेला नाही तर सर्वांच्या सर्वांवरील प्रेमावर आधारलेला आहे. हा राष्ट्रवाद भारत भूमीतील प्रत्येक माणसाची माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा जपणारा व सर्वांचा आदर करणारा आहे. संविधाननिष्ठ राष्ट्रवाद अशी भूमिका घेतो की तुमचा व्यक्तिगत धर्म व तुमची संस्कृती काहीही असो, तुम्ही भारत या राष्ट्राचे सन्माननीय नागरिक आहात. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत पातळीवरील कोणत्याही श्रद्धा, निष्ठा  जरूर बाळगा. पण तुमच्या मनातली अग्रक्रमाची निष्ठा ही संविधानाच्या तात्त्विक व मूल्यात्मक पायावर उभ्या राहिलेल्या भारत या राष्ट्रावर असली पाहिजे. भारत या राष्ट्रावरील निष्ठा म्हणजे केवळ जमीन, पर्वत, नद्या, धर्म रुढी, परंपरा, पुराण, गाय, जुनी तीर्थस्थाने यांच्यावरील निष्ठा नव्हे, तर भारतावरील निष्ठा म्हणजे भारतात राहणाऱ्या सर्व माणसांवरील निष्ठा. सर्व माणसांचा सर्वांगीण विकास करू पाहणाऱ्या भारतीय संविधानाच्या मूल्यांवरील व संविधानाने घालून दिलेल्या आचारसंहितेवरील निष्ठा. केवळ आपलाच धर्म व आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे असे मानून दुसऱ्यांच्या धर्म संस्कृतीचा द्वेष करणे संविधाननिष्ठ राष्ट्रवादात बसत नाही, तर संविधाननिष्ठ राष्ट्रवाद भारताच्या संमिश्र संस्कृतीचा आदर करावयास सांगतो. जुन्या धर्म संस्कृतीमधील जे जे नैतिक मूल्यांनीयुक्त  व विवेकावर आधारलेले आहे, त्याची जोपासना करावी व जुन्या धर्म संस्कृतीमधील जे जे अनैतिक, अतार्किक, मानवघातकी,अंधश्रद्धामूलक व कालबाह्य झालेले आहे ते ते टाकून द्यावे.ही संविधाननिष्ठ राष्ट्रवादाची भूमिका आहे.

  संविधानाने समग्र भारतीय नागरिकांच्या साठी एक नवी राष्ट्रसंस्कृतीच दिलेली आहे. त्या राष्ट्रसंस्कृतीचे निष्ठेने पालन करणे व तिचा विकास करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे, अशी संविधाननिष्ठ राष्ट्रवादाची भूमिका आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये 'आम्ही भारतीय लोकांनी'( आम्ही भारतीयमध्ये सर्व जात,धर्म, पंथाचे लोक येतात.) भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प केलेला आहे. या संकल्पामध्ये इथल्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय देणे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य देणे. दर्जाची व संधीची समानता देणे. सर्व नागरिकांची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करणे याही महत्त्वपूर्ण अशा बाबी आहेत. हा संकल्प नवे राष्ट्र घडवण्यासंर्भातील आहे. संविधानाच्या उद्देशिकेत भारतीय लोकांनी केलेल्या व्यापक  व उदात्त अशा संकल्पावर निष्ठा ठेवून जो वर्तन करतो तो संविधाननिष्ठ राष्ट्रवादी असतो. संविधानातील संकल्प ज्याच्या गावीच नसतो तो खऱ्या अर्थाने राष्ट्रनिष्ठ नसतो तर धर्मनिष्ठ, जातनिष्ठ किंवा पुराणपरंपरानिष्ठ असतो. तुमची प्रथम क्रमांकाची निष्ठा संविधानावर व त्याने घालून दिलेल्या आचारसंहितेवर असली पाहिजे असे 

संविधाननिष्ठ राष्ट्रवाद सांगतो.

   बहुतांश भारतीय लोक अजूनही खऱ्या अर्थाने संविधाननिष्ठ राष्ट्रवादी बनलेले नाहीत. स्वतःच्या कुटुंबातील अथवा समूहातील परंपरेने चालत आलेल्या धर्मरुढींचा प्रभाव घेऊनच बहुतांश लोक वावरतात त्यामुळे ते संविधाननिष्ठ राष्ट्रवाद काय असतो हे नीटपणे समजूनच घेत नाहीत.

संविधाननिष्ठ राष्ट्रवादाची भूमिका ही आहे की, तुम्ही प्रथम राष्ट्रनिष्ठ स्वरूपाचे सामाजिक व संस्कृतिक वर्तन करा, आणि नंतर धर्म, जात, परंपरानिष्ठ स्वरूपाचे सांस्कृतिक वर्तन करा. विशिष्ट पुराणाधारित सण उत्सव साजरे करणे, तीर्थयात्रा करणे, विविध धार्मिक कर्मकांडे करणे याला सांस्कृतिक वर्तन असे म्हणतात. अशा सांस्कृतिक वर्तनात अंधश्रद्धेचा प्रभाव असतो तर बुद्धिवाद व चिकित्सेचा अभाव असतो. भारतीयांनी संविधाननिष्ठ बुद्धिवादी व विज्ञानवादी स्वरूपाचे सांस्कृतिक वर्तन केले पाहिजे अशी संविधान अनिष्ठ राष्ट्रवादाची अपेक्षा आहे.

    भारतीय संविधानाने संपूर्ण भारतीय नागरिकांचा म्हणून असलेला सामाईक  स्वरूपाचा ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा संपूर्ण भारतीयांच्या समोर ठेवलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक वारसा, त्यातील मूल्ये हा सर्वांचा सामाईक वारसा आहे. या वारशावर सर्वांची निष्ठा हवी. संविधान सर्व भारतीयांचे  सामाईक आहे. त्यात सर्वांच्या विकासासाठीची कायदेबद्ध विचारधारा आहे. संसद सर्व भारतीयांची सामाईक आहे. या संसदेमध्ये संविधानाने घालून दिलेल्या आचारसंहितेनुसार सर्व भारतीयांच्या भवितव्यासंदर्भातले निर्णय होत असतात. अशोक चक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज, भारतीय सीमेवर रात्रंदिवस पहारा देणारी भारताची फौज ही सर्वांची सामायिक आहे. निवडणूक आयोग, राजमुद्रा, राष्ट्रीय प्रशासनव्यवस्था, राष्ट्रीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण व्यवस्था, रुपया हे चलन या साऱ्याच गोष्टी सर्वांच्या सामाईक आहेत. विशेषतः स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन, अलीकडेच ज्याची जाणीव होऊ लागलेली आहे तो संविधान दिन. हे सर्व भारतीयांचे सामाईक असलेले सर्वश्रेष्ठ असे राष्ट्रीय सण आहेत. हे सण भारतीयांनी स्वतःच्या घराघरात देखील स्वयंस्फूर्तीने व अत्यंतिक उत्साहाने साजरे केले पाहिजेत.  संविधाननिष्ठ राष्ट्रवादाचे हे आग्रही प्रतिपादन आहे की, संपूर्ण भारतीय नागरिकांनी आपल्या मनालयात अथवा भावविश्वात सर्वांच्या सामाईक असलेल्या भारत या राष्ट्राच्या सांस्कृतिक घटकांवरील आपली श्रद्धा व निष्ठा अधिकाधिक दृढ करावी. आपली ही श्रद्धा व निष्ठा आपल्या उत्स्फूर्त अशा सांस्कृतिक वर्तनातून स्पष्टपणे दिसून यावी. आम्ही सारे प्रथम भारतीय आहोत व शेवटीही भारतीयच आहोत हा मूल्यभाव सर्वांच्या मनात रुजावा.मी आदीअंती  भारतीय आहे या मूल्यभावाला अनुसरून जो सर्व प्रकारचे वर्तन करतो तो नागरीक संविधाननिष्ठ राष्ट्रवादाची जोपासना करत असतो. 

इ मेल -anantraut65@gmail.com

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!