डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चार मुलांचे बलिदान आणि बौद्धांची,लाडाची मरीमाय आनं साती-आसरा !

विजय अशोक बनसोडे
खरं तर अवघ्या 70 वर्षाखाली आमचं हाल कुत्र सुद्धा खात नव्हतं ! पाळीव प्राणी सुद्धा आमच्या घराच्या आसपास फिरत नव्हती,ना आपल्याजवळ बसत होती.तर मग गावातली माणसं तर सोडूनचं द्या !जातीचा चटका इतका भयान होता की,जातीच्या जातीतच मोडणारा शेजारचा मांग,ढोर,चांभार सुद्धा स्वतःला सवर्ण समजून आपल्याला शिवून घेण्यास पुढे येत नव्हता. इतकी भयान आणि विचित्र परिस्थितीत “जात” जातीत होती. खरंतर ही सुद्धा मंडळी अस्पृश्यचं होती बर का !
100/200 नाही तर हजारो वर्ष अशा प्रकारचे जीवन अस्पृश्य म्हणून आपण जगले.ना आपल्याला शिक्षण होतं,नोकरी होती,रोजगार होता ना राहायला घरं होती,बसायला खुर्ची होती ना अंथरायला काय होतं ? खरं तर जिथं दोन वेळच्या जेवणाची भ्रांती होती,दोन वेळचे जेवण वेळेवर मिळत नव्हते.अशा भिखारी माणसांना बाकीचा “चंगळवाद” आणि “भौतिकवादी” सुख काय माहीत होतं ? इतकच काय तर पिण्यासाठी पाणी सुद्धा वरून वाढलं जायचं,सार्वजनिक पान वाठ्यावर जायला बंदी होती.निसर्गाने दिलेले पाणी पिण्यास सुद्धा आपल्याला चोरी होती,इतका प्रचंड अन्याय आणि अत्याचार अस्पृश्य म्हणून आपल्यावर होत होता.
भिंती नसलेल्या घरातल्या आपल्या बायका आनं पोरी,त्यातही त्या जरा दिसायला नीटनेटक्या आणि सुंदर असल्या तर त्यांच्या “शिलाची” आणि “अब्रूची” जोखीम कायमच असायची.सुमती भार्गवाच्या जाती व्यवस्थेच्या ठेकेदाराला आणि चालकांना आणि मालकांना आपली अर्थात अस्पृश्य “स्त्री” उपभोगायला चालायची,परंतु तिला आत्म सन्मान आणि स्वाभिमान द्यायला मात्र ही विषारी व्यवस्था कायम नाकार देत होती.नेमका काय गुन्हा होता,अस्पृश्य म्हणून हजारो वर्षाचे जीवन जगणे आपल्या नशिबी आलं.याचा थोडा तरी विचार करत चला.
याच भारतामध्ये हजारो वर्ष अस्पृश्य म्हणून जीवन जगत असताना इथे असलेल्या 33 कोटी देवी देवतेला कधीच आपली माया आणि दया आली नाही.परंतु हेच 33 कोटी देव सुद्धा आपल्या परिस्थितीवर हसत होते. (रामायण, महाभारत आणि पोथी,पुराण,वेद, उपनिषदे यांचे वाचन करा म्हणजे सत्य कळेल) कारण याच 36 कोटी देवांचे चालक आणि मालक आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते,आणि आज ही करतात.
एकोणिसाव्या शतकामध्ये भीमसुर्य नावाचा प्रज्ञासूर्य उगवला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्यासारख्याच्या जीवनामध्ये सोनेरी प्रकाशाची किरणे प्रवेश करायला सुरुवात करू लागली.जसा जसा भीम सूर्य मोठा होऊन तापू लागला होता,तसं तसी इथली चातुवर्ण्या व्यवस्था आणि तिची चालकं-मालकं थरथर कापत होती.तर आपल्यासारख्या हजारो वर्ष गाव कुसाबाहेरच जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांच्या झोपडीमध्ये सोनेरी प्रकाशाची किरणे डोकावू लागली.भीम सूर्य नावाचा प्रज्ञासूर्य ज्याच्या विद्वत्तेपुढे आणि प्रखर बुद्धिमत्ते पुढे ब्रिटिशांनी शरणातगती पत्कारली होती.तर इथल्या हिंदू व्यवस्थेच्या चालक आणि मालकांनी आपल्या नांग्या टाकल्या होत्या.याच भीमसुर्य नावाच्या प्रज्ञासूर्यामुळे आपल्याला गावकुसा बाहेरच्या झोपडीतून चांगल्या घरात प्रवेश मिळाला.याचं भीम सूर्याने दिलेल्या भारताच्या संविधानामुळे आपल्याला नोकऱ्या मिळाल्या,शिक्षण-उच्च शिक्षण मिळाले,उद्योग मिळाले आणि मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले.त्याच बरोबर आपल्या गळ्यातलं गाडगं आणि मडकं जाऊन सूट,बूट,टाय आणि बंगला-गाडी आपल्या नशिबी आली.
परंतु आजही आपल्या समाजातील काही हरामखोर लोक अंधश्रद्धा आणि कर्मकांड जोपासून बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाला आणि बौद्ध धर्माला पायदळी तुडविण्याचे काम करतात.मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी दिवस-रात्र कुठून कुठून घाम निघेपर्यंत काम करतात आणि गावाकडे येऊन बकरी आणि कोंबडी कापून देव-देव साजरा करतात.
गावाचं कुलदैवत म्हणून मरीआईचे मंदिर बांधतात तर काही आपलेच बदमाश पैसेवाले लोक साती-आसराचे देऊळ उभा करतात.खरं तर अशा हरामखोर लोकांना भिम नगराच्या चौकामध्ये उभा करून उघड्या अंगावरती असुडाचे फटके मारले पाहिजेत,त्याशिवाय यांची पैशाची मस्ती जिरनार नाही.आणि महत्वाचे आपल्याच वाढ-वडिलांना आणि आया-बायांना भर चौकात कसे मारले जायचे याची जाणीव सुद्धा होईल.
अवघ्या सत्तर वर्षाखालची परिस्थिती यांना कशी होती याची जाणीव नाही.आजही एका बौद्धाच्या मंगल परिणय सोहळ्यामध्ये गेलो असता,त्याठिकाणी श्री.गायकवाड नावाचा इसम ज्याने भारताच्या संविधानाच्या जोरावर बाबासाहेबांच्या कृपेने सरकारी नोकरी मिळवली, आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतःच्या घरामध्ये चार चार नोकरदार तयार केले, पाण्याची जमीन घेऊन बागा फुलविल्या,परंतु आपल्याचं समाजातील शोषित,पीडित,होतकरू गोर-गरीब मुला- मुलींना सहकार्य करायचे सोडून,पैशाच्या बळावर गावामध्ये “मरीमायचं” मंदिर बांधण्याचं काम करतात.अशा हरामखोर लोकांचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे ?
मनुस्मृतीच्या राजपाटाखाली महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतातील इथल्या मूळ असलेल्या लढवय्या शूरवीर कुळांना हजारो वर्ष विविध जातीमध्ये विखरून अस्पृश्य म्हणून गुलाम ठेवले.महाराष्ट्रा मध्ये सुद्धा ज्यांना आपण मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय म्हणत असतो,जसे मडक्याच्या उतरंडी प्रमाणे एक जाजातीचा दुसऱ्या जातीवर अन्याय अत्याचार होत होता.आणि विशेष म्हणजे मडक्याच्या उतरंडीवर असलेले सर्वात वरच्या स्तरातील छोटे “गाडगं” तळाशी असलेल्या सर्वात मोठ्या गाडग्यावर म्हणजे बहुजन समाजावर (SC/ST/OBC) अन्याय अत्याचार करत होते.आणि आज ही विविध माध्यमातून अन्याय अत्याचार करत आहे.एकोणिसाव्या शतकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,संत कबीर,तथागत गौतम बुद्ध या विद्रोही महामानवांच्या विचारातून प्रेरणा घेऊन हजारो वर्ष गुलामीच्या साकळदंडात बांधले गेलेल्या आपल्यासारख्या अस्पृश्यांना साकळदंडातून मुक्त केले.
परंतु मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की, आज आपण काय करत आहोत ? अवघ्या सत्तर वर्षांमध्ये हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार विसरून आजही आपण कर्मकांड आणि देवी-देवतांच्या नादाला लागून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला तिलांजली देत आहोत.तर मग आता तुम्हीच सांगा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करणारे खरे गद्दार कोण ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले.या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि अधिकार दिले.या मूलभूत हक्क आणि अधिकाराच्या बळावर आज आपण देशातील विविध सत्ता क्षेत्रामध्ये प्रगती करत आहोत.पण भारतीय संविधानातून मिळालेल्या प्रगतीच्या जोरावर आपण काय करत आहोत ? आपल्यातील बहुतांश मंडळी ही संविधानाच्या बळावर शिकून सवरून मोठी झाली.सरकारी नोकऱ्यांमध्ये गेली, झोपड्यातून मोठया बंगल्यात राहिला आली,घराला चार चार पडदे आले,त्यामुळे समाजातील शोषित आणि पिढीचा दुःख त्यांना कधी दिसत नाही ? तर काही मंडळी राजकारण्याचे तळवे चाटून,चटाया उचलून पैसा कमावतात,सत्ता पदे घेतात आणि त्याच पैशाच्या बळावर समाजामध्ये कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्यासाठी बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांना मूठमाती देऊन,नीच माणसा सारखे देव-देव,जागरणे,यात्रा,जत्रा,सत्यनारायण घालत असतात.अशा परिस्थितीत आंबेडकरी समाजातील सर्वसामान्य गोर-गरीब नागरिकांनी काय आदर्श घ्यावा. तर दुसऱ्या बाजूला आपल्या समाजातील स्वतःला गोल्डन मॅन म्हणवून घेणारे दादा, आप्पा,कर्तव्य दक्ष म्हणणारे नालायक लोक गावठी दारू (हातभट्टी) भिम नगरातच विकून,भीम नगरातीलच आया-बायांना भल्या मोठ्या व्याजानं पैसे देऊन,त्यांचे शोषण करतात आणि स्वतःला खूप मोठा भीमसैनिक असल्याचे सांगत दर 14 एप्रिलला मोठ-मोठी बॅनरबाजी करत असतात.त्याही पुढे जाऊन अशी ही मंडळी आंबेडकरी चळवळीला मूठमाती देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माला पायदळी तुडवत,एकूणच काय तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीला मातीत गाडत,मनुवादी आणि गांधीवादी राजकारणाला खतपाणी घालतात,त्यांना पैसा पुरवतात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या “मी भारत बौद्धमयी करेन” स्वप्नाला मूठमाती देऊन,बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या लाडक्या रामू,रमेश,गंगाधर, इंदू आणि राजरत्नच्या टाळूवरचं लोणी खाण्यात धन्यता मानतात,अशा या हरामखोर लोकांचे अर्थात गद्दारांचे करायचे काय हा मोठा प्रश्न आहे ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मदीला भारताचे संविधान दिले परंतु आपल्यातील मुजोर माजलेली काही गाढवं,रानबोके गाढवा सारखी वर्तन करत असताना दिसतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतमाचा बौद्ध धम्मरुपी सुज्ञानाचा निर्मळ झरा आपल्यासाठी खुला करून दिला परंतु आपण मात्र आज ही गाढवा सारखच गाढवाला गुळाची चव काय या म्हणी प्रमाणे वर्तन करताना दिसत आहोत.
लेखक,विजय अशोक बनसोडे
भारतीय बौद्ध महासभा धाराशिव (द)
9881535736/8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत