महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

दहा पारमिता भाग ३८

मागील भागात आर्यअष्टांगिक मार्ग म्हणजे सदाचाराच्या मार्गाची माहिती घेतली.
या आणि पुढील भागात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दहा गुणांची म्हणजे पारमिताची माहिती घेऊया.
स्थविरवादामध्ये पारमितेला ‘पारमि’ असे संबोधले आहे. पूर्णत्व अथवा पूर्णत: असा त्याचा अर्थ होतो. पारमिता हा पाली शब्द आहे. ‘पारम’ म्हणजे दुसरा किनारा व ‘मिता’ म्हणजे जाणे, म्हणजेच दुसर्‍या किनार्‍याला जाणे असा त्याचा अर्थ होतो. कुशल कर्माच्या सहाय्याने दुसर्‍या किनार्‍यावर जाणे म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामधून विमुक्त होऊन निब्बाण अर्थात निर्वाण अवस्थेला पोहचणे होय.
पारमिता म्हणजे श्रेष्ठ गुण. पारमिताचा शीलमार्ग अथवा सद्‍गुणाचा मार्ग असाही अर्थ होतो. ह्या मार्गाने दु:ख दूर होण्यास मदत होते. पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती, सत्य, अधिष्ठानशंश, करुणा व मैत्री अशा दहा गुणांचा अंतर्भाव होतो. बोधीसत्वाला बुध्द होण्यासाठी या पारमिता पार कराव्या लागतात; तेव्हाच बोधीसत्व बुध्द होतात.
१) शील
शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. शील म्हणजे पापकर्म करण्यापासून दूर राहणे. ज्यांचे बोलणे, चालणे नीतिला धरुन आहे, त्याला शीलवान म्हटल्या जाते. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दूर राहतो. पुण्यकर्म, कुशल कर्म संपादीत करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शील व सौजन्य नसेल तर शिक्षीत माणूस हिस्त्र पशुपेक्षाही क्रुर व भीतीप्रद असतो.’ म्हणून चारित्रहीन व्यक्ती कितीही शिकला तरीही तो पशुपेक्षाही महाभयंकर असतो. त्याच्या शिक्षणाला काहीही किंमत राहत नाही.
शील हे काचेसारखे असते. एकदा का त्याला तडा गेला की त्याला जुडविणे कठीण जाते. तसेच शीलाचे आहे. एकदा का कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा इज्जत कमाविणे कठीण होऊन बसते.
२) दान
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या कल्याणासाठी स्वत:ची संपती, रक्‍त आणि देह अर्पण करणे म्हणजेच दान होय. गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक आहे. दानामध्ये नेत्रदान, देहदान, रक्‍तदान, शरीराच्या अवयवाचे दान याचा सुध्दा अंतर्भाव होतो.
दानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय.
दान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की-
तिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग (रागरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि दोसदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतदोसेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष द्वेष आहे, त्यामुळे वीतद्वेष (द्वेषरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि मोहदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतमोहेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष मोह आहे, त्यामुळे वीतमोह (मोहरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि इच्छादोसा अयं पजा ।
तस्मा हि वीगतिच्छेसु दिन्नं होति महफ्फलं ॥

याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष इच्छा करणे हा आहे, म्हणून इच्छा-रहित मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
आर.के.जुमळे
दि.२०.१.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!