15 जानेवारी 2024 “पद्मश्री नामदेव ढसाळ” यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…

‘अपयशाला सिद्धांत बनवूनजगणारे नकटे नाक खाजवून त्यांना खिजवायला माझ्याजवळ तेवढा फालतू वेळ कुठाय? मी असा चाकोरीबाहेरला माणूस काळाशीही चित्पट करायचीमाझी गरीब बापुडी इच्छा :आपण आखाड्यात सुरक्षित रहा’ गांडू बगीचा या ढसाळांच्या कवितासंग्रहातील ‘मायाबजार’ कवितेत उद्घृत केलेल्या या ओळी मला आजही खूप भावतात. ते नेहमी म्हणत असत, “माझी प्रत्येक कविता ही सुद्धा एक राजकीय कृतीच असते.”
सत्तरीच्या दशकात उभा केलेला दलित पँथरचा झंझावात आणि त्या अनुषंगाने घेतलेली सामाजिक लढ्याबरोबरची आर्थिक उत्थानाची भूमिका याची जबर किंमत ढसाळांना मोजावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात त्यांचे नसणे हे मनाला फारच चटका लावणारे होते. ते असते तर आजच्या दलित चळवळीची झालेली शोकांतिका आणि एकूणच पुरोगामी राजकारणाची झालेली पिछेहाट याचा निर्णायक वैचारिक धांडोळा घेऊन त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले असते.
दलित लढ्याची फेरमांडणी करण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. “सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि ज्ञान यापासून जो वंचित तो दलित.” अशी त्यांना अभिप्रेत असलेली दलितत्वाची व्याख्या होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले जातीअंताच्या आणि आर्थिक दास्यमुक्तीच्या लढ्याचे स्वप्न अपुरेच राहिले. सांस्कृतिक मूल्य बदलाच्या लढाईला शिथिलता आल्यामुळे दलित चळवळीची निकोप वाढ होऊ शकली नाही. आज नवउदारवाद आणि नव हिंदुत्ववाद यांच्या अभद्र युतीने देशातील दलित – शोषित – पीडित यांच्या अस्मितेचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजवादी समाजरचनेला अभिप्रेत असलेली संमिश्र अर्थव्यवस्था उध्वस्त होऊन देश क्रोनी- कॅपिटलइझमच्या विळख्यात सापडलेला आहे. आणि आज दलित चळवळ अंधारात चाचपडते आहे. ढसाळ- ढाले फुटीनंतर दलित पँथरची झालेल्या शोकांतिकेची सल त्यांच्या मनात कायम जरी राहिली तरी अखेरच्या श्वासापर्यंत पँथरची मशाल धगधगत ठेवणारे ते एकमेवच. ते नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे की, “दलित पँथर मध्ये काम करणे म्हणजे आसीधाराव्रतच.” शिवाय”कबीरा खडा बजार में, लिए लुकाठी हाथजो घर फुंके आपना, चले हमारे साथ ||” या कबीराच्या दोह्याचा दाखला द्यायचे.
समग्र समाज परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना स्वाध्याय, व्यवस्थेचे आकलन आणि कृती याची नितांत गरज आहे, असा त्यांचा आग्रह असायचा.
या महान नेत्याच्या अनेक आठवणी, प्रसंगी केलेल्या दिर्घ चर्चा आणि त्यांची दलित चळवळी विषयीची मनातील खंत आजही मला अस्वस्थ करते. चळवळीची आजची अवस्था पाहिल्यानंतर मला उर्दूतील प्रसिद्ध कवाल आतिष मुराद यांनी गायलेल्या कवालीतील ओळी आठवतात,आतिष मुराद म्हणतो, “मिया वो दिन गयेअब ये हिमाकत कौन करता है ?कोई गम से परेशान हैं कोई जन्नत का तालिब हैं गरज सजदे करती हैंइबादत कौन करता हैं” या देशातील आजची दलित चळवळ वाचविणे हेच खरे नामदेव ढसाळ यांना अभिवादन ठरेल. 10 व्या स्मृती दिनानिमित्त आमच्या लाडक्या नेत्याला विनम्र अभिवादन…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत