विरार येथे १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाट्न

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि 13 : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरार येथे आयोजित १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष आणि जपानमधील मराठी आमदार योगेंद्र पुराणिक, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर श्रीनिवास वनगा, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संत, साहित्यिक, कवी- कलाकारांची भूमी असून या सर्व महान व्यक्तींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून त्यामुळे जगभर मराठी भाषेचा प्रसार होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला, यावर्षी देखील हे विश्व मराठी साहित्य संमेलन वाशी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे . गिरगाव चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला असेल तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान मधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत. काळा बरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये समाविष्ट झाला शेकडो वर्षापासून मराठी भाषेची मूळे सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत हे सर्वांना अभिमानाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवडी – नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरण पूरक प्रकल्प असून तो वरळी, कोस्टल हायवे, मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई -गोवा हायवे, तसेच वसई – विरार- अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई -पुणे मिस्सिंग लिंक हा जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. या बोगद्यामुळे पुण्याचे अंतर हे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत