क्रांतीरत्न फातिमा शेख

फातिमा शेख यांची आज जयंती.
९ जानेवारी १८३१ हा त्यांचा जन्मदिवस.
आज 9 जानेवारी! आज फातिमा शेख यांचा जन्मदिवस आहे. फातिमा शेख यांचा जन्म 1831 सालचा. फातिमा शेख या मुस्लिम समाजातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका होत. फातिमा शेख यांनी सावित्रीआई फुले यांच्या समवेत मुलींना शिकविण्याचे काम केले. उर्दू पाठ्यपुस्तकामध्ये फातिमा शेख यांचे कार्य सांगणारा धडा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु फातिमा शेख यांच्या विषयी फारच कमी माहिती उपलब्ध असल्याचे दिसून येते.
1847- 1848 हा जागतिक इतिहास ढवळून काढणारा कालखंड होता. अमेरिकेतील निग्रोंना मिळणारी अमानूष वागणूक आणि त्या अनुषंगाने उद्भवलेले अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध हे याच दरम्यानचे होते (1847). कामगारांना आपल्या न्याय्य हक्काची जाणीव करून देणारा व परंपरागत दास्यत्वाच्या विरोधात जाऊन बंडाचे निशाण रोवणारा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो देखील 1848 सालीच प्रसिद्ध झाला होता. ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत ज्योतिराव फुले यांना अपमान सहन करावा लागला ते वर्ष देखील 1848 हेच होते. आणि याच वर्षी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली होती.
महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीआई फुले शिक्षिकेचे काम करत असत. सावित्रीआई फुले या एक प्रशिक्षित शिक्षिका होत्या. अहमदनगर येथील मिस फरार यांनी चालवलेल्या संस्थेमधून त्यांनी शिक्षण घेतले होते. येथेच त्यांची फातिमा शेख यांच्याशी भेट झाली. (याप्रसंगी मिस सिथीया फरार यांचा देखील गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे. सिथिया फरार या अमेरिकन मिशनरी होत्या. 1827 पासून 1862 पर्यंत भारतात त्यांनी मिशनरी म्हणून काम केले. 25 जानेवारी 1862 रोजी अहमदनगर येथेच त्यांचा मृत्यू झाला.)
1848 या वर्षात महात्मा फुले यांनी एकूण पाच शाळा स्थापन केल्याची नोंद आहे. 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे, 1 मे 1848 रोजी हडपसर, 15 मे 1848 रोजी महारवाडा पुणे, 5 डिसेंबर रोजी ओतुर, 20 डिसेंबर 1848 रोजी सासवड येथे त्या शाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. या पाचही शाळांमध्ये सावित्रीआई फुले यांचे समवेत शिकविण्याचे काम फातिमा शेख यांनी केले.
फातिमा शेख यांचे भाऊ उस्मान शेख हे महात्मा फुले यांचे मित्र होते. महात्मा फुले मुलींना शिकवतात म्हणून रूढीवादी मंडळींनी त्यांची तक्रार त्यांच्या वडिलांकडे म्हणजे गोविंदराव फुले यांच्याकडे केली. त्यामुळे गोविंदराव फुले यांनी महात्मा फुले यांच्या पुढे दोन पर्याय ठेवले. एक तर घर सोडणे किंवा शाळा बंद करणे! महात्मा फुले यांनी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांचे घर सोडले. याप्रसंगी महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांना आश्रय देण्याचे काम उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनीच केले.
उस्मान शेख, फातिमा शेख यांच्या विषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. परंतु महात्मा फुले यांच्या शाळेकरिता विद्यार्थिनी गोळा करण्यामध्ये फातिमा शेख यांनी पुढाकार घेतला होता यात शंका नाही.
प्राध्यापक ना. ग. पवार यांनी ‘सावित्रीबाई फुले-अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ हे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे.यात उस्मान शेख आणि फातिमा शेख यांचा खालीलप्रमाणे उल्लेख आलेला आहे.
उस्मान शेख- गंज पेठेत राहणारे ज्योतिराव फुले यांचे हितचिंतक. वडिलांच्या राहत्या घरातून गृहत्याग केल्यानंतर यांनीच गंज पेठेतील आपल्या एका मित्राच्या घरात जागा मिळवून दिली. स्वतःची भांडीकुंडी व संसारोपयोगी साहित्य देऊन फुले दांपत्याच्या नवीन संसार थाटून दिला व त्यांना दुःखद प्रसंगी धीर दिला.
फातिमा शेख- उस्मान शेख यांच्या भगिनी होय. नॉर्मल स्कूल च्या पहिल्या मुस्लिम प्रशिक्षित शिक्षिका. सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर विशेष मैत्रीचे संबंध. गुणवत्ता व वैशिष्टपूर्ण अध्यापनकार्य.
एकंदरीतच फातिमा शेख यांनी सावित्रीआई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचे कार्य केल्याचे दिसून येते. परंतु त्यांच्या विषयी फार थोडकी माहिती उपलब्ध असल्यामुळे त्यांचा म्हणावा तसा परिचय आधुनिक जगाला झाल्याचे दिसून येत नाही. फातिमा शेख यांना इतिहासात त्यांचे गौरव पूर्ण स्थान प्राप्त करुन देण्याकरिता त्यांच्या कार्याबद्दल ऐतिहासिक संशोधन होणे ही काळाची गरज आहे. फातिमा शेख यांच्या विषयी अधिक संशोधन झाले तर महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांनी केशवपनाविरुद्ध दिलेला लढा, दुष्काळ निवारणाचे केलेले कार्य, सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक समाजाची स्थापना यामध्ये फातिमा शेख यांचे योगदान स्पष्ट होऊ शकेल. सखोल संशोधन झाल्यास त्यांची या सर्व कार्यामधील भूमिका जगापुढे येऊ शकेल.
महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांचे कार्य हे काळाच्या फार पुढचे होते. स्त्री शिक्षणाची कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशा त्या काळामध्ये त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या आणि अशा या फुले दाम्पत्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी उस्मान शेख आणि फातिमा शेख हे खंबीरपणे उभे राहिले. आपल्या घरात आश्रय दिला. महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांनी पहिले वाचनालय सुरू केले ते देखील फातिमा शेख यांच्या घरातच! फातिमा शेख या वाचनालयाच्या सहसंस्थापक होत्या. 1851 यावर्षी महात्मा फुले यांनी ज्या दोन शाळा स्थापन केल्या त्या शाळांच्या स्थापनेमध्ये देखील उस्मान शेख आणि फातिमा शेख यांचे सहकार्य लाभले होते. सावित्रीआई फुले यांच्या समवेत मुलींच्या शाळेमध्ये शिकविण्याचे फातिमा शेख यांनी काम केले. सावित्रीआई फुले यांच्या वाट्याला दगड-धोंडे आले याचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला परंतु त्यातील किती दगड हे फातिमा शेख यांनी झेलले याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. फातिमा शेख या नक्कीच काळाच्या पुढे जाऊन काम करणार्या होत्या. फातिमा शेख यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!
(राजेश खवले)
फातिमा शेख यांची आज जयंती.
९ जानेवारी १८३१ हा त्यांचा जन्मदिवस.
‘गुगल’ने आज फातिमामाईला अशा पद्धतीने अभिवादन केले आहे. त्यासाठी ‘गुगल’ला सलाम.
याच त्या फातिमा- ज्यांनी सावित्रीबाईंसोबत स्त्री शिक्षणाचे काम केले.
महात्मा फुले आणि सावित्रीआई यांनी अस्पृश्य मुले आणि मुलींसाठी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना जागा दिली ती उस्मान शेख यांनी. फातिमा ही उस्मानची बहीण. ती सावित्रीआईंच्या संपर्कात आली आणि सावित्री होऊन गेली. तिनेही शेणगोळे खाल्ले, बदनामीचा मुकाबला केला. पण, ती डगमगली नाही. स्वतः शिकली. दलित मानल्या गेलेल्या जातीतील मुलांना, मुलींना शिकवत राहिली. साऊंसोबत काम करत राहिली.
एक लक्षात घ्या. ज्योतिराव-साऊ १८४८ मध्ये शाळा सुरू करतात, तेव्हा पुढे त्यांना उस्मान जागा देतो. फातिमा सोबत असते. १८५१ मध्ये ज्या शाळा सुरू होतात, त्याची फातिमा सहसंस्थापक असते.
तिकडे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रह परिषदेसाठी फत्तेखान जागा देतो. २५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमध्ये सत्याग्रह परिषद सुरू झाली. हजारो लोक त्यासाठी आले. प्रचंड मिरवणूक निघाली. चवदार तळ्याला वेढा घातला गेला. ‘मनुस्मृती’चे दहन झाले ते २५ डिसेंबरलाच. या परिषदेला जागा मिळू नये, यासाठी स्पृश्य नेत्यांनी गावक-यांना बजावले- धमकावले होते. त्यामुळे जागा मिळेना. पण, फत्तेखान जागचा हलला नाही. ‘दिलेले वचन मी कधीही मोडणार नाही’, असे सांगून त्याने या लोकांना हाकलले आणि सत्याग्रहाला जागा दिली.
हा उस्मान, हा फत्तेखान, ही फातिमा आपल्या भावविश्वात का नाही?
फुले-शाहू-आंबेडकरांचा नारा देणा-या चळवळींना अद्यापही या चौथ्या कोनाचे भान नाही. त्या आता आपल्याच हितसंबंधांमध्ये मग्न आहेत. भवतालाचे व्यापक भान या चळवळींना कसे नाही?
जातीतील तेढ वाढली की तोडगा धर्मावर निघतो. धर्मांधांचे हे कारस्थान वेळीच ओळखले पाहिजे. सगळ्या जातींना धुमसत ठेवायचे आणि तिकडे हिंदू-मुस्लिम असा तणाव वाढवायचा. सगळ्याच धर्मांचा उन्माद वाढवणारे वातावरण तयार करायचे, असा हा डाव आहे. त्याची सुरूवात झाली आहे. हा विखार भयंकर म्हणजे भयंकर टोकाला गेला आहे. एखादी ठिणगीही विक्राळ आग लावू शकेल, अशा टोकाला.
फुले-शाहू-आंबेडकरांसोबत फातिमा-फत्तेखान जोडले नाहीत, तर आगामी काळ कठीण असणार आहे.
चळवळींनी ‘कम्फर्ट झोन’ सोडून आपली रणनीती बदलण्याची ही वेळ आहे, एवढेच इथे नोंदवतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत