महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग २२

मागील भागात
१. अविद्या (Ignorance, Lack of Knowledge)
२. संस्कार (Conception)
३. विज्ञान (Consciousness)

४. नामरूप (Mind and Body)
५. षडायतन (Sixfold Base)
६. स्पर्श (Sense Contact)
७. वेदना (Feeling)
८. तृण्णा (Craving)
९. उपादान (Attachment)
१०. भव (Becoming)

११. जाति (जन्म) (Rebirth)
या कड्यांबद्दल माहिती घेतली. आता पुढील शेवटच्या कडेची माहिती घेऊया.
१२) जरा-मरण (Ageing and Death)


प्रतित्यसमुत्पादाची बारावी कडी म्हणजे जरा-मरण. जरा (म्हातारपण), व्याधी (आजारपण), मरण (मृत्यु), शोक (शोक व्यक्त करणे), परिदेव (रडणे, ओरडणे), दु:ख (शारिरीक दु:ख), दौर्मनस्य (मानसिक दु:ख), उपायास (हैराण होणे, परेशान होणे इत्यादी जातिमुळे म्हणजे जन्मामुळे उत्पन्न होते.
कुठल्याही वस्तूच्या अथवा घडणाऱ्या घटनेच्या तीन अवस्था असतात. त्या म्हणजे १. उत्पन्न होणे, स्थिर म्हणजे दिसणे आणि ३. नष्ट होणे या होत. निर्माण झाल्यावर स्थिर राहणे व नंतर नष्ट होणे या एकापाठोपाठ क्रमाने येत असतात. उत्पन्न होणे म्हणजे जन्म, नंतर दिसणे म्हणजे स्थिरता आणि हळूहळू नष्ट होणे, लयास जाणे म्हणजे मृत्यू पावणे, मरण असे म्हणता येईल. निसर्गातील जीव हे जन्म घेतात, कालमानाप्रमाणे लहानाचे मोठे होतात व हळूहळू म्हातारे होवून शेवटी मृत्यू पावतात. अशा अवस्था आहेत.
मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत जीवन प्रवास करावा लागतो. आयुष्याच्या शेवटी-शेवटी त्याला म्हातारपणाच्या अवस्थेत जावेच लागते. उदय होणे आणि लय होणे ही प्रक्रिया शरीराच्या अणु-रेणूत अव्यातपणे चाललेला असतो. क्षणैक परिवर्तनामुळेच दिर्घकालीन परिवर्तन घडून येत असते. मनाचे परिवर्तन तर फार तिव्रतेने घडत जात असते. म्हणूनच भगवान बुध्द म्हणतात की, “भिक्खूंनो, मनाइतके बदलणारे, परिवर्तनशील दुसरी कोणतीच गोष्ट मला दिसत नाही. शरीरातील बदल आपल्याला दृश्य स्वरुपात दिसून येते.”
जन्म, जरा, मरण हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. ते जर नसते तर बुध्दांचा जन्मच झाला नसता. जन्म, जरा, मरण आहेत म्हणून बुध्दांचा जन्म झाला आहे, असे भगवान बुध्दांनी म्हटले आहे.
ज्यांना जन्म, जरा, मरण माहिती नाही, त्यांना जरा, मरणाचा निरोध कसा करावा ते कळणार नाही.
प्रतित्यसमुत्पादाच्या निरनिराळ्या हेतूचा, निदानांचा व प्रत्ययांचा मूळ उद्देश म्हणजे जन्म, जरा मरणाला जाणणे, प्रज्ञेद्वारे त्याचा वेध घेणे, अविद्या असल्यामुळे कर्माची निर्मिती होत असते. जर अविद्या नष्ट झाली तर कर्माची निर्मिती होणार नाही. जर कर्म नसेल तर जन्माची निर्मिती होणार नाही. जर जन्म नसेल तर जरा-मरणाची निर्मिती होणार नाही. अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पाद निर्वाणाच्या मार्गाने घेऊन जातो.
जातीचा निरोध केला असता जरा-मरण, शोक, दु:खाचा निरोध होतो.
अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पादाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर जग जसे आहे तसे पाहता येते. त्यामुळे चार आर्यसत्याचा अर्थ निट कळून येते.
अशा प्रकारे अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृण्णा, उपादान, भव, जाति (जन्म), जरा-मरण या बारा अंगाच्या आधारे हे संपूर्ण संसारचक्र चालू राहते असा प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताचा अर्थ आहे.
भगवान बुध्दांच्या प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतामुळे समाजाची होणारी अधोगती थांबली. त्यामुळे समाज हळूहळू सुसंस्कृत बनत चालला. भगवान बुध्दांच्या काळी मिथ्या दृष्टीमुळे नरबळी, पशुबळी, स्त्री हत्या, बालहत्या, सतीप्रथा असे चालत असलेले रानटी प्रकार बंद होत गेले. स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्‍याची हत्या करणे, यज्ञामध्ये पशुंचा बळी घेणे, देवदासीप्रथेद्वारे स्त्रियांचे लैगिंक शोषण करणे, जातीभेद करणे, अमानूष अश्पृष्यता पाळणे इत्यादी प्रकार मिथ्यादृष्टीमुळे, अज्ञानामुळे सर्रासपणे पाळल्या जात होते. त्यात वावगे काहीच नाही, कारण ते देव निर्मित, धर्म निर्मित आहे अशी त्यांची मिथ्यादृष्टी होती. मात्र भगवान बुध्दांच्या शिकवणूकीमुळे नैतिकतेच्या शिकवणूकीचे महत्त्व लोकांना कळू लागले. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले परिणाम होतात. वाईट कर्म केले तर त्याचे वाईट परिणाम होतात हे लोकांच्या लक्षात आले. म्हणून भगवान बुध्दांनी ईश्वराऎवजी नैतिकतेला आपल्या शिकवणूकीत महत्त्वाचे स्थान दिले आहे.
प्रतित्यसमुत्पादाची साखळी तीन काळांमध्ये विभाजीत केल्या जातात. अविद्या आणि संस्कार हे भूतकाळाशी संबंधीत आहे. विज्ञान हे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांना जोडते. नामरुप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान आणि भव हे वर्तमान काळाशी संबंधीत आहेत. जाती (जन्म), जरामरण (दु:ख समूह) हे भविष्य काळात उद्‍भवत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात दुसर्‍या प्रकारची प्रतित्यसमुत्पादाची प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात, ‘तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाची ओढ काम व लालसा उत्पन्न करते. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे, त्याची सुरक्षा करणे आवश्यक होते. मालमत्तेच्या रक्षण करण्याच्या वृतीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य कथन ही प्रतित्यसमुत्पादाची अनुलोम साखळी होय.
प्रतित्यसमुत्पादाची प्रतिलोम साखळीप्रमाणे जर तृष्णाच नसेल तर लोभाची ओढ लागणार नाही. लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होणार नाही. विकार नसतील तर दृढता निर्माण होणार नाही. दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होणार नाही. स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण नाही. स्वामित्वाची भावना नसेल तर तेथे शांती निर्माण होईल. अशा तर्‍हेने संग्राहकवृतीचे दुष्परिणाम भगवान बुध्द स्थवीर आंनदाला समजावून सांगतात.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.४.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!