महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

सावित्रीमाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम…

आर.के.जुमळे
दि.३.१.२०२३

आज ३ जानेवारी, सावित्रीमाई जोतीराव फुले यांची जयंती…
पुष्पराज गावंडे, हे लेखक सावित्रीमाई फुलेंबद्दल लिहतात,
“माय,

तुया जल्म घेतला अन् अख्ख्या नारी जातीचा उद्धार केला ! देवळातली रांग तुया शाळेत आनली ! अन् पोरी शिक्याले लागल्या ! मानसाची बरोबरी कऱ्याले लागल्या! तुयासाठी आज कोनी उपास करते की नाई, माईत नाई ! पन माय, येळपरसंगी उपाशी रावून शिका, हे तुई शिकवन लय मोलाची ! माय, तुयाच्यानं आमी शिकलो म्हनून तुया वर दोन शब्द बोल्लो, माय ! माय, तुले हेच, आमचं नमन, माय !!”
१८४० साली क्रांतीज्योती जोतीराव फुले यांच्यांशी सावित्रीमाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीमाई निरक्षर होत्या. जोतीरावांनी सावित्रीमाईंना घरीच शिक्षण दिले. जोतीरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी संस्थेत तसेच पुण्यात प्रशिक्षण पूर्ण करुन सावित्रीमाईंनी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान मिळविला.
सावित्रीमाई समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.
सावित्रीमाई आणि त्यांचे जीवनसाथी जोतीराव फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात १७५ वर्षापूर्वी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीमाईंच्या या शाळेत सुरुवातीला केवळ सहा मुली शिक्षण घेण्यासाठी येत होत्या, परंतू सन 1848 च्या डिसेंबरपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. यानंतर चार वर्षांत पुण्यात तसेच आसपासच्या परिसरात १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. या शाळेस कर्मठ ब्राह्मण सनातन्यांनी विरोध केला. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, दगड, गोटे फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम असाच फुले दांपत्यांनी चालू ठेवला. अशा अनेक संकटावर मात करुन सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य अविरत चालूच ठेवले.
सावित्रीमाई फुले महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रगण्य व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीमाईंनी ओळखले. त्याकाळात काही क्रुर रुढी आणि परंपरा सुरू होत्या. त्याला आळा घालण्यासाठी सावित्रीमाईंनी पाऊल उचलले.
बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. त्याकाळी ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा त्यांचे केशवपन करून त्यांना विद्रुप बनविले जाई. सावित्रीमाई फुले यांनी पुण्यात नाभिक समाजातील बांधवांचे प्रबोधन करुन नाभिक बांधवांचा केशवपन विरोधात संप घडवून आणला आणि विधवा होणाऱ्या महिलांची केशवपन करण्याची कुप्रथा कायमची बंद केली.
विधवा स्त्रियांना नराधमाच्या वासनेचा शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, म्हणून अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. सावित्रीमाई आणि जोतीरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. सावित्रीमाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या आणि बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाई आपलीच लेकरे मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीमाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्या हाती घेतले. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. सावित्रीमाई फुले यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. त्यांचा काव्यफुले नावाचा काव्यसंग्रह आहे, तसेच सावित्रीबाईंची गाणी, सुबोध रत्नाकर, बावनकशी, त्याचप्रमाणे सावित्रीमाईंनी महात्मा जोतीराव फुले यांच्या भाषणांचा जोतिबांची भाषणे हा ग्रंथ संपादन केला.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
सन१८९७ च्या दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य धोका ओळखून रुग्णांना वेगळे काढून त्यांचे विलगीकरण केले. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी पुण्याच्या बाहेरील ससंर्गमुक्त भागात प्लेगपीडितांसाठी दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. मुंढव्याबाहेरील महार वस्तीत पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेग झाला हे कळताच सावित्रीमाई फुले धावून गेल्या आणि त्या मुलाला पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. त्याला वाचवताना या प्रक्रियेत, सावित्रीमाईंना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले यांच्या आजच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या त्यागी समर्पित जनसेवेस आणि सत्यशोधक विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!