सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास लेख -अशोक तुळशीराम भवरे.

होऊनी गेले फुले!
म्हणून आज शिक्षण घेत आहेत मुली – मुले.
होऊनी गेली सावित्री
म्हणून महिला होत आहे आज मंत्री.
आज सावित्रीमाई जयंती, आता आमच्या जयंतीला बरे दिवस आले आहेत,आमची वेशभूषा करून देखावे केले जात आहेत,प्रभात फेऱ्या काढल्या जात आहेत, भाषण, व्याख्यान, चर्चा सत्र आयोजित केले जात आहेत, आपण आम्हाला विसरला नाहीत हे बघून बरं वाटतं, परंतु या सर्वांचेच श्रेय युगप्रवर्तक विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते, त्यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले यांना आपले गुरु मानले नसते तर आमची ओळख व्हायला अजून वेळ लागला असता, संविधानाने शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविणे, हिंदू कोड बिला मुळे महिलांना आयुष्य जगण्याचा दर्जा मिळाला, या सर्वांचं श्रेय त्यांनी आम्हाला दिलं, आमचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले,खरे अनुयायी होते ते, बुद्ध, फुले, कबीर यांना पुनर्जीवन देण्याच कार्य केले.
आणि आज तुम्ही काय करीत आहात?आमची जयंती एक उत्सव म्हणून साजरा करण्यात धन्यता मानत आहात, आमच्या सारखी वेशभूषा करणे, कुंकू लावणे, दोन चार दिखाऊ भाषणं करणे म्हणजे आमची जयंती साजरी करणे आहे काय?
ज्या पुण्यात आमचे कार्य सुरू झाले, पुणे तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे येथील विद्यापीठाला माझे नाव देऊन मला गौरवण्यात आलं त्याच पुण्यात मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली शाळा काढली,त्या शाळेची आज काय अवस्था झाली? त्या वाड्याची काय अवस्था झाली?
आज महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे हे बघून मनाला अतिशय आनंद वाटत असला तरी ती ख-या अर्थानं वैचारिक दृष्ट्या सक्षम झाली नाही, शिक्षणाने बुद्धीचा विकास झाला पाहिजे, असं न होता आजची पिढी ही अंधश्रद्धेकडे झुकत चालली आहे, बहुजनांच्या नाही तर ब्राह्मण महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या दुष्कृत्यातून सुटका करण्यासाठी आम्ही अनाथाश्रम काढले, सख्ख्या आईप्रमाणे त्यांची बाळंतपण केली, केशवपन पद्धत बंद केली, सर्वांना पाणी मिळावे म्हणून आमचा हौद मोकळा केला, आणि आम्ही चालवलेले हे कार्य कितपत यशस्वी पुणे करीत आहात?याचा मनापासून विचार करा, आमच्या सत्यशोधक समाजाचे कार्य आपण किती पुढे नेत आहात?
त्या काळी मला मुलं होत नाही म्हणून दुसरं लग्न न करता यशवंतला आम्ही दत्तक घेतले, आणि तुम्ही मुलं होत नाही म्हणून तिच्यावर अत्याचार करता, दुसरं लग्न करता,ही कुठली वैचारिक बांधिलकी, आजही महिलांवर विविध प्रकारचे विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, तिचे पुनर्वसन करण्याचे सामर्थ्य आहे काय तुमच्यात? तुम्ही चांगले शिकावं, मोठं व्हावं म्हणून किती यातना सहन केला आम्ही,दगडशेणाचा मारा,घाण घाण बोलणं ऐकलं आम्ही उपाशी राहिलो परंतु मुलांना उपाशी ठेवलं नाही याची जाणीव आज किती जणांना आहे?
ज्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली,आज महिला प्रत्येक क्षेत्रात हिरारीने भाग घेत आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे हे सर्व उल्लेखनीय असले तरी हे कोणामुळे झालं ह्याच उत्तर तुम्हाला देता येत नाही,ज्या शाळेने देशात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली त्या शाळेची आजची अवस्था काय आहे याचा विचार तरी तुम्ही कधी केला का?केला असता तर काही तरी प्रयत्न केले असते?
हे असं झालं आईबापांनी मुलांना शिकवून मोठं करायचं, आणि हे मुलं मोठी झाल्यावर, चांगला पैसा अडका , गाडी,बंगला सर्व सुख सुविधा प्राप्त झाल्यानंतर जन्म दात्यांचा विसर पडतो किंवा अडगळ निर्माण झाली म्हणून द्या वृद्धाश्रमात टाकून.आमच्या कार्याची,शाळेची अवस्था अशीच झाली की काय? असं आम्हाला वाटत आहे.
काही सामाजिक संघटनांनी, संस्था, मान्यवर व्यक्ती, माझ्या काही लेकीने आंदोलन केलं, त्यामुळे कोर्टात केस जिंकली असली तरी जोपर्यंत भारतातील पहिली मुलींची शाळा म्हणून राष्ट्रीय स्मारक होणार नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका, जेव्हा हे स्मारक ख-या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक स्मारक होईल तेव्हाच आमच्या कार्याचे चीज झाले असे आम्हाला वाटेल?
खरंच आमची जयंती साजरी करावी असे वाटत असेल तर आम्ही सांगितलेल्या विचारांचे वारसदार व्हा,गरीब मुलांना शिकण्यासाठी सहकार्य करा, महिलांवरील अत्याचार कमी करा, जमलं तर आम्ही सुरू केलीली पहिल्या शाळेचं पुनर्वसन करा, आमच्या कार्याची दखल घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर ख-या अर्थानं आमची जयंती केल्यासारखे वाटेल.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याख्याते
होय, मी सावित्री बोलतेय या एकांकिकाचे लेखक.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत