बाबासाहेबांच्या ‘अर्पणपत्रिका’ !!

बाबासाहेबांनी अखंड लेखन केले. लेखनाचा बाज केवळ प्रतिभा दर्शनाचा नव्हता ! व्यक्तिगततेला अंगावर येऊ दिले नाही. ते पुस्तकी दर्शन दिग्दर्शन ही नव्हते.
संपूर्ण बौध्दिकता त्यांनी मुक्तीद्वार उघडायला एकवटून रेटली ! दिलेली प्रकाशवाट सर्वांच्या हिताची, हे विशेष !
ते लिहिण्यविषयी लिहितात, ‘पुस्तके लिहित असतांना वेळ कसा निघून जातो व दिवसांमागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. कधीकधी तर मी रात्रभर वाचीत लिहीत बसतो. त्यावेळी मला कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही’. कारणाशिवाय बाबासाहेबांनी लिहिलेच नाही. उद्दिष्टपूर्तीचा ध्यास अक्षर पेरणीत होता. जे मी पूढे नेतो, ते कठड्यात आणले जाईल. प्रश्नांचा भडीमार होईल. पाऊलांना कच्चेखच्ची करण्याचा प्रयत्न होईल. ती अपेक्षितता बाबासाहेब ओळखून होते.
म्हणून ते लिहिते राहीले. उत्तरे देत गेले. उत्तरांची सूत्रे देत गेले. सूर देत गेले. स्वर देत गेले. कोरस ही देऊन गेले.
याच कष्टप्रयासात बाबासाहेबांनी पुस्तकांना लिहिलेल्या ‘अर्पण पत्रिका’ येतात. एकेक अर्पणपत्रिका बाबासाहेबांची जगण्याची दृष्टी आहे !
निवडक अर्पणपत्रिका विमर्षात घेता येतील.
१९३९ ला लिहिलेल्या,
Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) या पुस्तकाला बाबासाहेबांनी ‘टालस्टाय’च्या अभिवचनाची अर्पणपत्रिका दिली.
The distance you have gone is less important than the direction in which you are going today : Tolstoy (तुम्ही किती अंतर चालून गेलात यापेक्षा वर्तमानात कोणत्या दिशेने जात आहात ते महत्त्वाचे आहे)
अर्पणपत्रिकेचे हे वाक्य आजही मार्गदर्शी आहे. आपलाच काय, कोणताही लढा असो, दिशा असणे महत्वाचे आहे. दिशेला दिशा असणेही महत्त्वाचे आहे. ते केवळ जाणे वा पूढे जाणे नसते. आंदोलनाचे असे मूल्यमापन कायमस्वरूपी असू शकते.
१९४३ ला बाबासाहेबांनी,
Rande, Gandhi and Jinnah हे पुस्तक लिहिले. खरेतर ते १९४२ ला दिलेले भाषण आहे. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका स्वतः त्यांनी लिहिली. ते लिहितात,
I am no worshipper of ideols. I believe in breaking them. I insist that if I hate Mr Gandhi and Mr Jinnah-I dislike them, I do not hate them – it is because I love India more. That is true faith of a Nationalist : B R Ambedkar (मी आदर्शाचा पूजक नाही. ते तोडण्यावर मी विश्वास करतो. श्री गांधी आणि श्री जीना यांचा मी तिरस्कार करतो म्हणण्याऐवजी मला ते आवडत नाहीत. त्यांचा मी तिरस्कार करीत नाही. कारण भारतावर मी जास्त प्रेम करतो. एका राष्ट्रवादीची ही सत्यनिष्ठा समजावी)
याचा अर्थ स्पष्ट आहे,
बाबासाहेब भारत देशावर नितांत प्रेम करायचे. याचमुळे ते, देशापेक्षा कोणतीही व्यक्ती वा राजकीय पक्ष वा तत्वप्रणाली मोठी होऊ शकत नाही हा त्यांचा कायम आग्रह असे.
१९४५ ला बाबासाहेबांनी,
What Congress and Gandhi have done to the Untouchables ? (कांग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) हा ग्रंथ लिहिला.
या ग्रंथाला बाबासाहेबांनी थ्युसिडायडसचे वचन वापरले.
It may be your interest to be our masters, but how can it be ours to be your slaves ? Thucydides (आमचे मालक होण्यात तुम्हाला रस असेल, पण आम्हाला तुमचे गुलाम होण्यात आहे हे कशावरून ?)
हे एक वाक्य, कायमचा संदेश ठरतो. ते केवळ पुस्तकापुरते उरत नाही. संदेश ताजा वाटतो. मालकीयत बदलली. वेष्टण बदलले. प्रवृत्ती तीच आहे. फास नवे आहेत. गुलाम तेच !
लोकशाही आर्थिक बाजारात आणलीय. मालक-गुलाम सरळ भेदरेषा दिसत नसली तरी अदृश्यता भयंकर आहे.
१९४६ ला बाबासाहेबांनी,
Who were the Shudras ? How they came to be the Fourth Varna in Indo-Aryan Society (शूद्र पूर्वी कोण होते ? इन्डो आर्यन सोसायटीत ते चवथा वर्ण म्हणून कसे आले) लिहिले.
या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेत ते लिहितात,
Incribed to the memory of Mahatma Jotiba Fule.
The greatest Shudra of modern India who made the lower classes of Hindus conscious of their slavery to the higher classes and who preached the gospel that for India, social democracy was more vital than independence from foreign rule : B R Ambedkar (महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृतीत. आधुनिक भारतातील महान शूद्र ज्याने हिंदूमधील खालच्या जातींना वरच्या जातींकडून लादण्यात आलेल्या गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि हेही शिकविले की भारताच्या उज्वलतेसाठी सामाजिक स्वातंत्र्य हे विदेशी सत्तेच्या तुलनेत अधिक महत्त्वाचे होते.)
विशेष बाब ही की,
संविधान लिहायला घेण्याआधी बाबासाहेबांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हे लिहिले. त्यानंतर ‘अस्पृश्य’ लिहिले.
बाबासाहेबांचा सामाजिक स्वातंत्र्याचा आग्रह अनुभव आणि अभ्यास दोन्ही आधारावर होता. त्यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या उज्वल भविष्याशी स्वतःला बांधून घेतले होते.
१९५५ ला बाबासाहेबांनी,
Thoughts on Linguistic States (भाषिक राज्याबाबत विचार) हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला स्वतःचे अभिमत अर्पणपत्रिका म्हणून नमूद केले. ते लिहितात,
Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don’t wish to make an ass myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. : B R Ambedkar (इमर्सनने म्हटले की, सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म असल्याने मला स्वतःला गाढव व्हायचे नाही. कोणताही विचार करणारा माणूस सुसंगतीच्या नावावर एकदा व्यक्त केलेल्या विचाराशी बांधला जाऊ शकत नाही. सुसंगतीपेक्षा जबाबदारी ही महत्त्वाची असते.
इथे बाबासाहेबांनी जबाबदारीला मौलिक स्थान दिले आहे. आंबेडकरी विचार वर्तुळात जबाबदारी चा अर्थ ‘जाती अंतासोबत सामाजिक व आर्थिक विषमता अंत’ असा घेता येईल.
अशाच आशयाच्या समर्पित करणाऱ्या अर्पणपत्रिका बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पुस्तकांना दिल्या. काहींना उदघृत करता येईल.
ते लिहितात.
Dedicated to His Highness Shri Sayajirao Gaikwad : Maharaja of Baroda
As a token of my gratitude for his help in the matter of my education.
Dedicated to the memory of my Father and Mother
As a token of my abiding gratitude for the sacrifices they made and the enlightenment they showed in matter of my education.
Incribed to the memory of RAMU
As a token of my appreciation to her goodness of heart, her nobility of mind and her purity of character and also for the cool fortitude and readiness to suffer alongwith me which she showed in those friendliness days of want and worries which fell to our lot.
Incribed to the memory of Nandnar, Ravidas and Chokhamela
Three renowned saints who were born among the Untouchables and who by their piety and virtu won the esteem all.
वरील चारही अर्पणपत्रिका अनुक्रमे १. The evolution of provincial finance in British India २. The problem of ruppe ३. Thoughts on Pakistan व ४. The Untouchables
या ग्रंथांना लिहिलेल्या आहेत.
या अर्पणपत्रिका आजही दिशादर्शक आहेत.त्या कालही होत्या. उद्याही राहतील.
कारण त्या अक्षरमुक्तीच्या प्रारंभावर भेटतात. मुक्तीची ही कृती तशी शिल्प, निर्मिती वगैरे शोभायमान नाही. ती दृष्टी आहे. प्रश्नमूलक, आंदोलनपूरक, भविष्यसूचक अशी ती पहाटवाट आहे. जावे या मार्गाने. विचार असा करावा. असे ते सांगणे आहे.
कल्याणवाटेच्या प्रारंभावर या अर्पणपत्रिका भेटतात. चोचीतला चारा देत होता सारा .. या स्वरूपात !
! प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत