जन्मभूमी ते चैत्यभूमी

“साहेब… मला एकदा तरी घेवून चला हो पंढरपूरी तिर्थक्षेत्री”… “रामू जे लोक आपल्याला ज्या मंदिरात जावू देत नाही तिथं आपण का व कशासाठी जायचे?… हे बघ रामू आपण नवीन तिर्थक्षेत्र निर्माण करू जिथं कोणीही कुणाला मनाई करणार नाही”… वरील ऐतिहासिक संवाद आहेत माता रमाई व डॉ. बाबासाहेबांचे. बाबासाहेब वरीलप्रमाणे म्हटल्यावर रमाईने पंढरपूरला जाण्याचा तगादा सोडून दिला. शेवटी दि. २६ मे १९३५ रोजी रमाईने शेवटचा श्वास घेतला. पंढरपूरला जाण्याची ती इच्छा मनात ठेवूनच. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १३ आक्टोबर १९३५ रोजी जाहीर सभेत येवला, जिल्हा नाशिक येथे प्रतिज्ञाच करून टाकली की “मी हिंदू धर्मात जन्मलो ते माझ्या इच्छा शक्तीच्या बाहेर होते. परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या इच्छा शक्तीच्या बाहेर नाही “ आणि त्यांनी त्यांची ही प्रतिज्ञा बरोब्बर २१ वर्षांनी म्हणजेच दि १४ आक्टोबर १९५६ रोजी पूर्ण केली. ही त्यांची प्रतिज्ञा ऐतिहासिक ठरली.
मध्य प्रदेशातील इंदोर जवळील महू गावात बाल भिवाचा जन्म झाला ती बाबासाहेबांची जन्म भूमी आज त्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे आहे. बहुजन समाज त्या स्मारकाला तिर्थक्षेत्र समजून दरवर्षी १४ एप्रिल ला तेथे भेट देतात हे त्यांचे पहिले तिर्थक्षेत्र त्यांनी निर्माण केले.
सन १९१७ मध्ये बडोदा संस्थानाच्या करारा प्रमाणे जेव्हा बाबासाहेब इंग्लंड मधून शिक्षण घेवून सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या संस्थानात संरक्षण विभागाचे सचिव या पदावर रुजू झाले. परंतु तेथील जातीयवादी शक्तींनी तिथे त्यांना राहायला मनाई केल्या मुळे ते नाईलाजाने आपली कपड्यांची बॅग घेऊन तेथून दूर एका झाडाखाली येवून ढसाढसा रडले. तेव्हा तेथेच त्यांनी जातीयवादाचा बिमोड करण्याचा संकल्प केला ती आज संकल्प भूमी (संकल्प पार्क) (बडोदा, गुजरात.) म्हणून प्रसिद्ध झाली. त्या भूमीला आज लाखो पर्यटक भेट देतात. हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले दुसरे तिर्थक्षेत्र.
दि. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेबांनी भीमा कोरेगाव (जि.पुणे) येथे जाऊन भिमा कोरेगावच्या विजय स्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली व ५०० महार वीरांच्या शौर्य गाथेवर बाबासाहेबांनी स्फुर्ती दायक भाषण दिले. तेव्हापासून त्या भूमीला शौर्य भूमी म्हणून ओळखले जाते. आज दरवर्षी १ जानेवारीला देशभरातून लाखो लोक शौर्य भूमीला येवून विजय स्तंभाला मानवंदना देतात. हे त्यांनी निर्माण केलेले तिसरे तिर्थक्षेत्र.
दि. २० मार्च १९२७ रोजी महाडला (जि.रायगड) समतेसाठी चवदार तळ्याचा बाबांनी सत्याग्रह केला. अस्पृश्य लोकांसाठी तळे खुले व्हावे म्हणून जिथे संघर्ष केला त्या ठिकाणाला आज संघर्ष भूमी किंवा सत्याग्रह भूमी म्हणून ओळखले जाते. दि. २० मार्च ला महाराष्ट्रातून हजारो लोक त्या महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन त्या तळ्याचे घोटभर पाणी चाखून धन्य होतात. हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले चौथे तिर्थक्षेत्र.
बाबासाहेबांनी दिल्लीच्या राहत्या घरात संविधान लिहिले होते तिथे म्हणजे दिल्लीच्या २६, अलिपूर रोड ला आज संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीत भव्य स्मारक साकारले आहे ती भूमी म्हणजे संविधान भूमी इथे रोजच देश विदेशातील हजारो संखेने लोक भेट देत असतात तीच संविधान भूमी हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले पाचवे तिर्थक्षेत्र.
संत तुकोबा रायांच्या देहू गावाच्या पंचक्रोशीतील देहू रोड (जि, पुणे) येथे एक भूमी आहे ती आहे धम्म भूमी याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी थायलंड येथून आणलेली शुभ्र तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. तो दिवस होता २५ डिसेंबर १९५४ या दिवसापर्यंत बाबासाहेबांची बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. म्हणून त्यांनी तेथे जमलेल्या लोकांसोबत बुद्ध वंदना घेऊन लोकांना आधीचाच असलेला पण नव्याने धम्म मार्ग दाखवला. बाबासाहेबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या धम्म भूमीला २५ डिसेंबरला महाराष्ट्रातून हजारो लोक येतात. हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले सहावे तिर्थक्षेत्र.
बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्ही गेले ४३ वर्षापासून वास्तव्यास आहोत. ज्याला भाग्य भाग्य म्हणतात ना! ते या शिवाय दुसरे नाही. जगाच्या नकाशावर ठळकपणे असलेले नागपूरातील दीक्षाभूमी याच ऐतिहासिक स्थळावर देश, विदेशातील लाखोंच्या संख्येने लोक येतात. येथे आल्यावर स्वयंप्रेरणेने धम्म दीक्षा घेतात. व पावन होवून आपापल्या दिशेने परत जातात. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे १४ आक्टोबर १९५६ याच दिवशी बाबासाहेबांनी आपल्या पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. आज येथे दर अशोका विजया दशमीच्या दिवशी धम्म दीक्षात्सोव होतो. हे दीक्षा भूमी स्थळ बाबासाहेबांनी निर्माण केलेले सातवे तिर्थक्षेत्र.
आणि ६ डिसेंबर १९५६ पासून विशाल सागराच्या कुशीत चीर निद्रा घेत असलेले प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेबांचे ऐतिहासिक स्थळ म्हणजे चैत्यभूमी.(दादर, मुंबई) या ठिकाणी बौद्ध राष्ट्रातील व जगात ज्या ज्या देशात डाॅ.बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते आणि देशातील लाखो लोक त्यांच्या पवित्र स्मृतीस्थळाचे अश्रू नयनाने दर्शन घेतात व जड पावलाने आपल्या गावी परत जातात. पण परत जातांना गरीबातील गरीब व्यक्ती त्यांची आठवण म्हणून एक तरी पुस्तक घेऊन जातात. तो दिवस मोठा भावपूर्ण असतो. हे बाबासाहेबांनी त्यांच्या पश्चात निर्माण केलेले आठवे व अंतिम तिर्थक्षेत्र होय. याप्रमाणे त्यांनी माता रमाईला ‘तिर्थक्षेत्राचा’ दिलेला शब्द पूर्ण केला. माता रमाई पंढरपूर या एकाच तिर्थक्षेत्री जाण्यासाठी आग्रह धरत होत्या पण त्यांच्या साहेबांनी त्यांच्यासाठी आठ आठ तिर्थक्षेत्रे निर्माण केले. पण दुर्दैवाने माता रमाई यापैकी एकही त्या पाहू शकल्या नाहीत. आपल्या पत्नीला शब्द देवून तो त्यांनी पाळला. धन्य ती रमाई अन् धन्य ते बाबासाहेब. ज्यांनी आपल्या ऐतिहासिक कार्याने इतिहासाचे पानेही सोनेरी करून ठेवले.
वरील आठही ऐतिहासिक स्थळी धर्मभेद नाही, जातीभेद नाही, पंथभेद, लिंगभेद, स्पर्श भेद नाही ना आंतरदेशीय प्रांत भेद आहे ना ही आंतरराष्ट्रीय सीमा भेद. अखिल जगत मानवांसाठी वरील ऐतिहासिक स्थळे सदैव खुले आहेत. सन्मानिय वाचकहो, आपल्यापैकी कुणी ना कुणी, कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या वरील ऐतिहासिक स्थळांना अवश्य भेट दिली असणार. तेव्हा आपल्या तिथल्या भेटीचे अनुभव/वर्णन शेअर करावे, व्यक्त व्हावे.
संकल्प भूमीचा इतिहास थोडक्यात पाहू:
आजपासून बरोबर १०६ वर्षापूर्वी म्हणजे सन १९१७ ला डॉ. बाबासाहेब सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या बडोदा संस्थान च्या, कराराप्रमाणे संरक्षण विभागात सचिव या पदावर रुजू झाले तेव्हा ते एका पारशी आश्रमात आपली जात लपवून राहू लागले. ते आपल्या ‘वेटिंग फाॅर व्हिजा’ या पुस्तकात म्हणतात “मी जेव्हा विलायतेत शिकायला होतो तेव्हा माझ्या डोक्यातून जात व अस्पृश्यता या गोष्टी पूर्णपणे निघून गेल्या होत्या” बडोद्यात त्यांना पुन्हा भयंकर जातीयवादाचा सामना करावा लागला. ते बडोद्यात जून ते ऑगस्ट पर्यंत असे तीन महिने होते. त्यांच्या कचेरीत जातीयवादी शक्तींनी त्यांचा मोठा छळ केला. पारशी आश्रमात असतांना जेव्हा तिथल्या ही जातीवादी लोकांना त्यांची जात कळली तेव्हा त्यांचा राग अनावर होवून हातात लाठ्या काठ्या घेऊन बाबांना मारायला आले.
जिवाच्या भीतीमुळे बाबासाहेब मारेकऱ्यांना चुकवत तेथील एका घोर जंगलात येवून एका झाडाखाली ढसाढसा रडत बसले. ज्या झाडाखाली ते घोर अंधाऱ्या रात्री बसले होते त्या झाडाच्या अगदी जवळून एक नदी वाहते. त्यात मोठ्या मोठ्या खतरनाक मगरी होत्या. काळ्याकुट्ट रात्री त्या शिकारीसाठी नदीपात्रातून बाहेर पडत असत. जशा या खतरनाक मगरी होत्या तसेच त्या जंगलात खतरनाक हिंस्र जनावरे होते. आपण जरा कल्पना करा १०६ वर्षापूर्वीचे घनदाट जंगल. त्या जंगलातील काळीभोर भयावह, भयानक रात्र, पावसाळी मौसम, त्या काळरात्र जंगलात बाबासाहेब एकटे एका झाडाखाली रडत बसलेले. कल्पना करा. जंगलातील हिंस्त्र जनावरांमुळे जातीयवाद्यांना जंगलात घुसण्याची हिंमत झाली नसावी. एका अर्थाने असे म्हणावे लागेल की या खतरनाक जंगली जनावरांनीच त्यांच्याही पेक्षा खतरनाक असणाऱ्या जातीवादी जनावरां पासून बाबासाहेबांचे संरक्षण केले. जरा सोचा जर जंगली जनावरांनी किंवा मोठ्या मगरींनी बाबासाहेबांवर हल्ला केला असता तर… किंवा जातीवादी नराधमांच्या तावडीत बाबासाहेब सापडले असते तर… कल्पना करवत नाही. येथे लिहितांना ही शरीरावर शहारे उभे राहतात. आज भारत आजचा भारत न राहता कट्टर मनुवादी भारत असता. आणि अशा भारतात आपण कुठे असतो हे सोचा.
त्या काळ्याकुट्ट घनघोर जंगलात बाबासाहेबांनी अख्खी रात्र रडून काढली असेल. तेव्हा तिथे त्यांना धीर द्यायला, सांत्वन करायला माणसा पैकी कुणीही नव्हते. होते फक्त ज्या झाडाखाली बाबासाहेब रडत बसले होते ते झाड, वर ढगाळ आकाश, खाली पावसाळी ओलसर जमीन व आजूबाजूचे भयान जंगल. जंगलात कुठेतरी असणारे हिंस्र पशू व नदी पात्रील मगरी याशिवाय माणसांपैकी तिथे कुणीही नव्हते. सकाळी उजाडल्यावर त्याच झाडाखाली बाबांनी संकल्प केला की ‘या देशातील मी जातीवाद मोडून काढल्या शिवाय राहणार नाही’ असा तिथे संकल्प करून बाबासाहेब मुंबईला आपल्या परळ चाळीत परतले. तेव्हा बिछान्यावर रामजी बाबा डोळ्यात प्राण आणून बाबासाहेबांची वाट पाहत होते. रामजी बाबांनी बाबासाहेबांना डोळे भरून पाहिले व प्राण सोडले.
ज्या झाडाखाली बाबासाहेबांनी जातींचा बिमोड करण्याचा संकल्प केला होता त्या परिसराला आता संकल्प पार्क किंवा संकल्प भूमी म्हणून ओळखले जाते. देशभरातून दररोज असंख्य लोक या संकल्प पार्कला भेट देतात. तिथल्या स्थानिक प्रशासनाने त्या पार्कला चौभोवताली तारेचे कंपाऊंड घातले. पाणी, लाईट अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतिहास प्रेमी तेथे जावून धन्य होतात.
ब्राह्मणांच्या वैदिक धर्माने त्यांच्या विचारांच्या तिर्थक्षेत्राचे चार धाम निर्माण केले बाबासाहेबांनी त्याउलट आपल्या विचारांचे आठ म्हणजे त्यांच्या दुप्पट (ब्राह्मणी भाषेत तिर्थक्षेत्रे व आपल्या भाषेत पवित्र ऐतिहासिक स्थळे) पवित्र ऐतिहासिक स्थळे निर्माण करून ठेवले. ज्याला इतिहासात तोड नाही. तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी माता रमाईला दिलेला शब्द पूर्ण केला. माता रमाईच्या हयातीत ही स्थळे त्यांना पाहता आली असती तर त्या धन्य धन्य झाल्या असत्या. धन्य त्या माता रमाई! अन् धन्य ते बाबासाहेब!!
जन्म भूमी ते चैत्यभूमी असा आपल्या जीवनाचा लंबा संघर्षमय काळ बाबांनी व्यतीत केला. व आपला भविष्यकाळ उज्वल करून ठेवला. हे आपण कधीही विसरता कामा नये.
अशोक सवाई.
संपर्क: 91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत