“राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा सन्मान केला पाहिजे”

- खा. कुमार केतकर
मुंबई प्रतिनिधी : ” डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहितांना जगभरातील सर्व देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. त्यांनी देशातील राज्य आणि केंद्राला विविध अधिकार बहाल केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना सर्वोत्तम आहे. मात्र सध्या आपल्या सरकारने राज्यघटनेची पायमल्ली चालवलेली आहे. देशात माजत असलेली दुफळी आणि असंतोषाचे वातावरण ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा देशात सन्मान व आदर केला पाहिजे. सध्या देशात राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. ती देशासाठी घातक आहे, अशी परखड टीका खासदार आणि जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली. ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, अंधेरी, चार बंगला येथे ७४ वा संविधान दिवस सोहळ्यात बोलत होते. ह्या प्रसंगी प्रा. डॉ. यशोधरा वराळे, प्राचार्य डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा ह्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनावणे हे होते.
पत्रकार कुमार केतकर पुढे म्हणाले कि, “ १९३५ ते १९५० या १५ वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध चळवळी, जागतिक घटना व अनेक उलथापालथी बघितल्या. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मपणे वेध घेऊन आपली राज्यघटना लिहिली. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाने घटना समितीतील विविध विचारसरणीच्या सभासदांना एकत्र करून आणि त्यांच्यात समन्वय साधून सर्वोत्तम घटना साकारली. त्यामुळे त्यांचे चरित्र हे केवळ त्यांचे व्यक्तिचरित्र नव्हे तर तो एक इतिहास आहे. तो इतिहास नसता तर आज आपली राज्यघटना तयार झाली नसती. म्हणूनच राज्यघटना समितीचे अध्यक्ष होणं हे सर्वार्थाने न्याय्य ठरलं असून त्यांनी अध्यक्षपदाला न्याय दिला आहे. “
ते पुढे म्हणाले कि, ” नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेवेळी जेव्हा अन्य देशांचे प्रतिनिधी भारतात आले होते तेव्हा ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ या भजनामधील ‘अल्ला’ शब्द मुद्दाम काढून टाकण्यात आला. आपल्या देशात हिंदू- मुस्लिम द्वेष विकोपाला गेला आहे. त्यात असे प्रकार केल्याने देशात होणाऱ्या विघटनाला खतपाणी घातले जात आहे. स्वातंत्र, समता बंधुता आणि सामाजिक न्याय ही भारतीय संविधानाची मूल्ये आहेत. त्यामुळे एकात्मता टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सर्व भारतीयांनी त्यामुळे देशात संविधानात सांगितलेली उद्दिष्टे पाळणे हे आपले कर्तव्य आहे. लोकभावना आणि राज्यकर्त्यांचा उद्देश एकत्र जपला नाही तर या देशाचं सुद्धा विघटन होऊ शकतं. आज देशात जी अराजकता आहे ती थांबवली गेली पाहिजे असा इशारा त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे असे ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. यशोधरा वराळे, प्राचार्य आपल्या भाषणात म्हणाल्या कि, “समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय यामुळेच आपल्या देशाची राज्यघटना ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. या देशातील प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा, प्रगती करण्याचा व धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे. हे त्यांनी राज्यघटनेच्या कलमांचा संदर्भ देऊन त्याचे सविस्तर विश्लेषण केले. त्या पुढे म्हणाल्या कि, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भगवान गौतम बुद्धांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे राज्यघटनेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे धम्माच्या शिकवणीचा पानोपानी उल्लेख केला आहे. त्यांनी अन्य देशांच्या घटनेचा सखोल अभ्यास केल्यामुळे आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. राज्यघटनेचा जर योग्य वापर झाला नाही तर वरिष्ठ न्यायालयात अन्यायाची दाद मागता येते असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरवातीला महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले व बुद्धवंदना घेऊन संविधानाचे प्रास्ताविका वाचण्यात आले. सुरवातीला संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी पाहुण्यांचा उत्तम परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. नितीन सोनावणे यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी संस्थेचा परिचय करून देताना समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वकिलांची कार्यशाळा, पत्रकारितेचे प्रशिक्षण वर्ग, विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग व उद्योजगता कार्यशाळा इ. उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.या प्रसंगी रत्नाकर रिपोटे, चिटणीस, सदाशिव गांगुर्डे, कोषाध्यक्ष, नीना हरिनामे, सुनिल वाघ व संजय जाधव इ. विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रमाला अनेक मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.मा संपादकसंपादकिय विभागमुंबईमहोदयकृपया वरील मजकुरास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी द्यावी. ही नम्र विनंती.
धन्यवाद!
आपला विनितचंद्रकांत बच्छाव सरचिटणीस
९८२०३६३८५०
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत