महायुतीत मलिकांना घेण्यास फडणवीसांचा विरोध!

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते तर आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले.
भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत. दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मदत घेऊन जमीन बळकविल्याप्रकरणी ‘ईडी’ने मलिक यांना अटक केली होती. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, गुरूवारी मलिक हे विधान भवनात दाखल होताच अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. तेव्हाच ते अजितदादांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले. सभागृहातही ते सत्ताधारी बाकांवर बसले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना डिवचले. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही, याचे उत्तर आधी द्या मग आम्हाला प्रश्न विचारा. त्याच वेळी त्यांनी अजित पवार यांना पत्रही पाठवले व मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. हे पत्र लगोलग प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आल्याने पवार गटातून नाराजी प्रकट झाली. फडणवीस अजितदादांना हे खासगीत सांगू शकले असते. पत्र माध्यमांकडे पाठविण्याची आवश्यकता नव्हती, असा सूर पवार गटातून उमटला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत