महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
बौद्ध धम्मातील संकल्पना समज आणि गैरसमज.


प्रा. रमेश. जे. इंगोले
14 ऑक्टोबर 1956 ला नागपुर मुक्कामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 कोटी अस्पृश्य बांधवांना धम्माची दिक्षा दिली. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपदेश देतांना आपल्या धम्म बांधवांना म्हणाले होते की, “ आज माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो.” अर्थात बौद्ध धम्मात पुनर्जन्म नाही हे सत्य आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचा असे सांगण्याचा उद्देश असा होता की, एका नविन धर्मात प्रवेश करीत आहेत आणि त्यामुळे आपल्याला आज पासून नविन जीवन पध्दती सुरू करायची आहे. आणि मग दीक्षा समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा सार असणार्या 22 प्रतिज्ञा आपणास दिल्या ज्या पूर्वी धम्मात नव्हत्या पण नव्याने त्यांचा समावेश केला. म्हणजे साधारण शिक्षित माणसाला सुद्धा धम्म काय आहे आणि आपण यापुढे आपले जीवन कसे जगावे याचा एक मार्ग 22 प्रतिज्ञाच्या रूपाने बाबासाहेबांनी आपणास दिला आहे. आणि एक नविन ऊर्जा या अनेक पिढया घोर अंधारात जीवन जगणार्या पिढीला मिळाली. लोकांना हे सर्व नविन वाटत होते. म्हणजे आपले लग्न, अन्त्यविधी , गृहप्रवेश आणि इतर कार्यक्रम करतांना अनेक नविन बाबी लोक ऐकत आणि अनुभवत होते. आणि आपली पहिलीच पिढी आता कुठे शिक्षण घेत होती आणि बौद्ध साहित्य वाचत होती. पुढे आंबेडकरी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि इतके वाढले की, लोक इतर कमी शिक्षित किंवा आशिक्षित लोकांना अनेक विचार समजावून सांगत होती. आणि अनेक शिक्षित लोक आपल्या धम्मात काय आहे आणि काय नाही याचा विचार करू लागली आणि अनेक विचारवंत आता संदर्भ देत बोलू लागले आणि त्यामुळे लोक आता आंबेडकरी समाज कसा पुढे जात आहे याची चर्चा समाजात होऊ लागली. याचा सर्वात मोठा धसका ब्रह्मामण समाजाने घेतला. कारण हा एक नविन समाज तयार झाला जो ब्रह्मामण व्यक्तीला न बोलावता आपले अनेक संस्कार विधी करू लागला आणि इतर बहुजन समाजाला सुद्धा तुम्ही असेच करा असे सांगू लागला. आणि याचा परिणाम लोकांना धम्मात सांगितलेले विचार आणि तत्व पसंत पडू लागले. एक सत्यशोधक विचार बहुजन समाजात वाढू लागला.भारतीय समाजात त्यामुळे अनेक लोक म्हणजे मातंग, भटके आणि इतर बहुजन धर्मांतर करण्याचा विचार करू लागली आणि काही धर्मांतर झाले आणि काही त्या वाटेवर आहेत. आणि त्यामुळे मा.हनुमंत उपरे यांनी धम्माच्या वाटेवर अशी एक हाक बहुजन समाजाला (ओबीसी ) दिली. पण अचानक त्यांचा मृत्यू झाला आणि ती चळवळ मागे पडली. आणि उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात सुद्धा अनेक सामूहिक धर्मांतर होऊ लागली. आणि आताच 22 प्रतिज्ञा घेतल्या म्हणून आपचे मंत्री राजेंद्र गौतम पाल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला किंवा राजीनामा घेतला गेला . भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा एक धसका सनातनी लोकांनी घेतला आहे.
आज 67 वर्ष झाली धर्मांतर होऊन आणि आपण याचे एक परीक्षण करतांना म्हणजे आपल्या बौद्ध अनुयायांचे वर्तन आणि व्यवहार जर पाहिला तर आपल्या लक्षात येते की, अनेक विद्वान आणि उच्च शिक्षित लोक आहेत पण कांही संकल्पना आणि संज्ञा आपण वापरतो त्या आपण जरा विचार करून आणि तपासून घेतल्या पाहिजे. आज भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात बौद्ध समाज एक असा समाज आहे की, जो अनेक विचार आणि तत्व हे विचारपूर्वक स्वीकारतो. कारण बौद्ध धम्मात एक तत्व आहे प्रज्ञा आणि याचा अर्थ आहे शहाणपण म्हणजे आपण एखादी गोष्ट स्वीकारत असतांना विचार करून , अभ्यास करून ती स्वीकारली पाहिजे आणि त्यामुळे जर यात काही चुकत असेल तर दुरूस्ती करावी. आपल्या समाजात अशा अनेक संकल्पना आणि संज्ञा आहेत त्या मूळ आपल्या धम्मानुसार वापरल्या नाही पाहिजे पण काही लोक त्या वापरतात आणि त्यामुळे एक संभ्रम निर्माण होत आहे. आमचे अनेक उच्च शिक्षित लोक एखाद्या प्रसंगी प्रबोधन करीत असतांना असे म्हणतात की, दलितांचे नेते किंवा आपला दलित समाज पण हा शब्द डॉ. बाबासाहेबांनी आपणास दिलेल्या धम्माचा अपमान आहे. पण याची सुरुवात मला वाटते जाणीवपूर्वक या सनातनी लोकांनी केली असली पाहिजे. कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे राष्ट्रीय नेते आहे आणि पुढे ते जगात मोठे होणार आहेत याची भीती होती आणि त्यांनीच याची सुरुवात केली पण आपण तो आता वापरणे जवळ जवळ बंद झाले आहे आणि तो शब्द बंद करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. म्हणजे देशाचे राष्ट्रपती जर एखादा अल्पसंख्य किंवा मागासवर्गीय असेल तर त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक केला जातो की, एक शीख , एक मुस्लिम , एक आदिवासी राष्ट्रपती पण अनेक वेळा ब्रह्मामण राष्ट्रपती झाले , प्रधानमंत्री झाले पण त्याचा उल्लेख कधीच असा झाला नाही याचा आपण विचार केला पाहिजे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मार्कंडे काटजू व न्यायमूर्ती मिश्रा यांच्या दिनांक 19/04/2011 यावर्षी दिलेल्या जजमेंटनुसार दलित जातिवाचक शब्द आहे आणि त्याचा उल्लेख कायद्याने गुन्हा आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनात्मक सवलती देतांना आमचा उल्लेख “ अनुसूचीत जाती ” असा केला आहे तेंव्हा स्वत:ल दलित म्हणू नका. महाराष्ट्र शासनाने पूर्वी दिला जाणारा दलितमित्र पुरस्कार आता त्याचे नामांतर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे केले आहे. तेंव्हा आपण आता सावध असले पाहिजे आणि आपल्या समाजाला आपणच उच्च शिक्षित लोक हे सांगू शकतो.
मला काही दिवसापूर्वी आमचे एक बँक ऑफ महाराष्ट्रमधील एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी उपासक बेडीस साहेब (नाशिक ) यांनी फोन करून एक शंका विचारली की, “ आपल्या धम्मात बुद्धवासी आणि श्रद्धांजली असे शब्द आहेत का ? ” आणि याचे उत्तर देतांना त्यांना मी सांगितले म्हणजे मोबाइलवर पाठवले की, असे शब्द आपल्याकडे नाहीत. पण लोक चुकीने वापरतात. आणि मग मला असे वाटले की यावर आपण थोडे प्रबोधन करावे. आणि त्यामुळे हा लेखप्रपंच आहे. आणि त्यामुळे बुद्धवासी ,श्रद्धांजली हे शब्द सुद्धा वापरणे गैर आहे. म्हणजे आपल्या लोकांना हिंदू लोकांनी जर स्वर्गवासी वापरला तर आपण बुद्धवासी वापरू असे वाटले पण हा एक कुटील डाव आहे या संघाच्या लोकांचा हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपला माणूस मृत्यू पावल्यावर तो बुद्धवासी म्हणजे बुद्धाकडे जातो असा संभ्रम निर्माण केला गेला आणि काही लोकांनी याची चिकित्सा न करता वापरला पण असे वापरणे गैर आहे. त्याऐवजी आपण स्मृतिशेष किंवा कालकथित असा शब्द वापरावा म्हणजे तो व्यक्ती आपल्यात नाही पण त्यांच्या आठवणी आहेत. तसाच आपल्या व्यवहारत आणखी एक शब्द आहे आणि तो म्हणजे आपण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दल बोलतांना बोधिसत्व असा शब्द वापरतो पण तो सुद्धा चुकीचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील एक जेष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी त्यांच्या “ महबुद्ध डॉ. आंबेडकर ” या ग्रंथात याचे स्पष्टीकरण दिलेले आहे की, बोधिसत्व म्हणजे ज्ञानी होण्यासाठी जो प्रयत्न करतो तो बोधिसत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “ बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथात बोधिसत्व होण्यासाठी बोधिसत्वाला ज्या दहा अवस्थातून जावे लागते त्या दहा अवस्था पार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले आहेत आणि म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणणे म्हणजे केवळ बाबासाहेबांचाच अपमान नाही तर ज्ञानमिमांसेचा सुद्धा अपमान आहे. असे सांगितले आहे आणि त्यामुळे निदान आपण तरी या संकल्पना आणि शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत.
कांही ठिकाणी तर यापेक्षा कहर होतो मी अनेक मेसेज पाहतो की, आपला एखादा व्यक्ती मृत्यू पावला की, लोक त्यांना आदरांजली वाहताना असे लिहतात की, आत्म्यास शांती मिळो आता हे तर आपल्या बुद्ध धम्माच्या एकदम विरोधी आहे. कारण आत्मा, स्वर्ग, नर्क, आत्मा, पुनर्जन्म अशा काल्पनिक गोष्टी जर बुद्धाने नाकारल्या आहेत तर मग त्याचा उल्लेख आपले लोक का करतात ? तर हे आपण करू नये. किंवा एखाद्या लग्नपत्रिकेवर बुद्ध कृपे करून असा शब्द वापरतात तो सुद्धा चुक आहे आहे. बुद्ध आपल्यावर कृपा करीत नाहीत तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात आणि आपण त्या मार्गाने गेले पाहिजे. तथागत मार्गदाता आहेत मोक्षदाता नाहीत. आणि कृपा म्हणजे मेहरबानी कधीच करीत नाहीत. आपण आपले मानवी जीवन स्वत: घडवायचे आहे आणि त्यामुळे त्यांनी अत्त दीप भव !असे म्हटले आहे. आपण तथागतांच्या रोज पाया पडल्या म्हणजे दर्शन घेतले तर आपल्या जीवनात काहीच फरक पडणार नाही आणि तशी आपली काही कल्पना असेल तर मनातून काढून टाका. तथागत सांगतील त्या मार्गाने आपण गेलो किंवा जाण्याचं प्रयत्न केला तर आपल्याला काही साध्य होईल. अनेक ग्रामीण भागातील लोकांना बौद्ध गया किंवा इतर ठिकाणी बुद्धमूर्ती नतमस्तक झाले की, आपण काहीतरी मिळवले अशी भावना आहे पण बुद्ध स्वत: एक जगातील सर्वात मोठे वैज्ञानिक आणि विज्ञानवादी असल्यामुळे अशा अपेक्षा ठेवू नका. अशा हेच तर दु:खाचे कारण आहे. आपण आपल्या जीवनात एक एक शील पालन करण्याचा प्रयत्न करावा तर मात्र आपले मंगल निश्चित आहे. आपले अनेक उपासक आपल्या अनेक बुद्ध स्थळी जाऊन आले की, त्यांना आपण फार मोठे काम केले आहे आणि आता आपले फार चांगले होईल अशीच भावना घेऊन घरी येतात. पण ही संकल्पना हिंदू धर्माची आहे आपली नाही. म्हणजे आपण आपल्या बुद्ध स्थळी जाऊ नये असे नाही गेलेच पाहिजे पण अशी अपेक्षा मात्र ठेवू नका. तथागत म्हणतात तृष्णा हेच दु:खाचे मूळ कारण आहे.
आणखी एक विषय आहे थोडा वेगळा आहे पण तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. आजकाल आपले बौद्ध अनुयायी एका नविन आणि बिनाकामाच्या संशोधनात लागले आहेत की, आपल्या देशात बालाजी , पंढरपूरचा विठ्ठल , आणि आणि असेच काही इतर देव –देवता हे पूर्वी आपल्या बुद्धाचे मूर्ती होत्या आणि मग त्याना हिंदूनी त्यांचे देव देवता तयार केले आहे. आता हे खरे सुद्धा आहे. खुद्द महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपुरचा विठ्ठल हा तथागत आहे हे सांगितले आहे. पण मला प्रश्न पडतो की, आता आपण हा इतिहास काढून काय उपयोग आहे ? जर साधी गोष्ट आहे आज जे आपले बौद्ध स्थळ आहे आणि सर्व जगाला माहीत आहे आणि ते म्हणते बुद्ध गया आणि ते जर 100% आपल्या ताब्यात नाही तर इतर देव जे आता बदलले आहेत आणि त्याची पूजा हिंदू पद्धतीने होत आहे त्याचा विचार आपण कशाला करायचा ? हेच मला समजत नाही. पण आपल्या लोकांना महत्वाचे काय आहे हेच कळत नाही. आणि विनाकारण यावर चर्चा करून आपल्या समाजाचा वेळ घालवत आहेत. आता समजा बालाजी हे आपले आहे असे समजले आपण थोडया वेळासाठी तर काय करणार आपण आज बालाजीची पूजा करणार काय ? आणि करणार तर कशी म्हणजे कोणत्या पद्धतीने करणार ? त्याठिकाणी आज तर सर्व हिंदू लोक जातात आणि आपण तिथे जाऊन काय वंदन करणार की आपल्या धम्माच्या गाथा घेणार ? आणि ते आता कसे शक्य आहे ? आज आपण अनेक देवता आणि कर्मकांड कमी करीत आहोत तर आता हे आपले विद्वान पुन्हा त्याच मार्गाला जाण्यास सांगत आहेत. ज्या आपल्या कमी शिक्षित लोकांनी कसे तरी जुने देव-देवता सोडले आहेत तर हे म्हणतात ते आपलेच आहेत म्हणजे हे जर या लोकांना कळले तर ते म्हणतील चला पुन्हा आपण हिंदू मंदिरात जाऊ आणि पुन्हा एक नविन समस्या निर्माण होईल याचा विचार आपण केला पाहिजे.
मी तर साधे सांगतो आपल्या उच्च शिक्षित लोकांनी (माझ्यासह ) आपल्या जीवनात जास्त नाही पण फक्त पंचशील जरी चांगल्या प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न केला तरी आपले जीवन सफल होईल. म्हणजे आज कोणत्याही माणसाला साधे जीवनात “ मुसा वादा वेरमणी ”म्हणजे खोटे बोलणार नाही याचा विचार केला तरी अनेक प्रसंगी बोलावे लागते आणि मग 22 प्रतिज्ञा आणि इतर नियम तर फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्या लोकांनी अशा इतर मंदिर आणि लेण्या अशा बाबीवर चर्चा करून समाजाला दिशाहीन करू नका. आज सुद्धा आपल्या बौद्ध उपासक लोकांना धम्म काय आहे ते नीट समजले नाही. ते प्रयत्न करीत आहेत. अनेक कार्यक्रमाला जात आहेत ,काही विहरात जात आहेत आणि समजून घेत आहेत , काही पुस्तके वाचन करीत आहेत. आपल्या समाजातील लोकांना जास्त वेळ मिळत नाही. त्यांचा बराच वेळ हा चरितार्थ चालवण्यासाठी खर्च होतो. आणि त्यामुळे त्यांचा संस्कृतिक विकास होत नाही. अनेक समस्या असतात. काही शिक्षित लोक त्यांचे वेळोवेळी प्रबोधन करण्याचे काम सुद्धा करतात. आणि मध्येच आता ही नविन धार्मिक स्थळे शोधण्याचे काम लोकांनी करू नये असे मला वाटते. नाही तर ही समस्या पूढे जास्त गंभीर होईल. त्यामुळे आताच हे थांबवले पाहिजे. आपण जास्त सावध राहिले पाहिजे की, आपल्या धम्माचे काम करतांना आज आपल्याला अनेक आव्हाने आहेत आणि सर्वात मोठे आर.एस.एस.चे आहे ते आपल्या धम्मात घुसले आहेत त्यांना बाजूला करण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे त्यामध्ये जास्त डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल. मला आता 23 तारखेला एक फोन आला होता विदर्भातून आणि एक आपले बौद्ध उपासक सांगत होते की, त्या भागात एक आपले धम्म शिबीर चालू आहे आणि त्या शिबिरात जे भंते आले आहेत त्यांनी जानवे घातले आहे. आता किती गंभीर बाब आहे. आणि हे षडयंत्र आपल्याला पुष्पमित्र शुंगा पासून माहीत आहे. म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला तेथील स्थानिक उपासक यांनी लक्ष घालून असे का होत आहे त्यांची चौकशी करावी आणि त्यांना वेळीच पायबंद घालावा. हे काम जास्त धोकादायक आहे असे मला वाटते आणि आपण कुठे बालाजी आणि इतर धार्मिक स्थळाबाबत चर्चा करीत आहोत हे सर्व निरर्थक आहे. यापेक्षा आपण धम्म पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
आणखी एक पद्धत आपणास पाहवयास मिळते आणि ती म्हणजे एखादा कार्यक्रम असेल आणि त्याठिकणी अनेक महापुरुषांच्या प्रतिमा असतात. आणि मग एखादा सूत्रसंचालन करणारा व्यक्ती म्हणतो की, आता आपल्या दैवतांची पूजा केली जाईल किंवा कोणी म्हणतो आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले , शाहू महाराज यांचा प्रतिमांचे पूजन सर्व प्रमुख पाहुणे करतील. आता इथे एक समस्या आहे की, आपण भावनेच्या भरात आपल्या महापुरुषांना दैवत म्हणतो पण असे म्हणणे म्हणजे आपल्या सर्वच महापरुषांचा एक प्रकारे अपमान असतो. म्हणजे त्यांचा अपमान करणे आपला कोणाचाच हेतु नसतो. पण बोलण्याच्या ओघात हे होते आणि त्यामुळे असे कधीच करू नका. कारण आपले महापुरुष हे दैवतापेक्षा मोठे आहेत. मग दैवत तर अनेक पिढयापासून होते मग आपला उद्धार आपले महापुरुष जन्माला आले आणि त्यांचे कार्य यामुळेच का झाला ? हा प्रश्न आहे. म्हणजे दैवत हे काल्पनिक आहेत तर आपले महापुरुष हा इतिहास आहे. आणि काल्पनिक देवतामुळे आपल्या अनेक पिढया या दिशाहीन होत्या पण आपण मात्र काल्पनिक गोष्टी काही विसरायला तयार नाही. दुसरे एक म्हणजे आपण खाजगीत बोलताना एखादा मराठा व्यक्ती असेल आणि त्याबद्दल काही विषय निघाला तर इतर लोक म्हणतात तो छ्त्रपती आहे. तो आण्णाभाऊ आहे असे कधीच म्हणू नये कारण आपले महापुरुष जगात एकच आहेत मग ते कोणतेही महापरुष असतील तरीही. म्हणजे रयतेचे राज्य निर्माण करणारा एकच छ्त्रपती ,जगाला आपल्या बुद्धीने दिपवून टाकणारा एकच बाबासाहेब , दोन दिवस शिक्षण घेऊन साहित्य सम्राट असणारा एकच , स्त्री शिक्षण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देणारे एकच सावित्रीमाई आणि महात्मा फुले , संविधान नसतांना आरक्षण देण्याची ताकत आणि हिंमत असणारा एकच शाहू महाराज आणि अशी यादी वाढत जाईल पण हे महापुरुष एकमेवाद्वितीय असतात. आणि त्यामुळे यांची तुलना आपल्यासारख्या सामान्य माणसाशी करू नका. आपण त्यांचे अनुयायी आहोत पण त्यांच्या समान नाही होणार. आपण त्यांचे कार्य पुढे नेण्यात एक छोटासा खारीचा वाटा उचलत असतो. मग हे जे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे असतात त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे किंवा एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला याबद्दल विचारले पाहिजे. अशा अनेक सुधारणा करीत आपण सर्व बहुजन पुढे जाणार आहोत. सामाजिक सुधारणा एकदम होत नाहीत. काही वर्षापूर्वी आपणास कार्यक्रम कसा घ्यावा आणि त्याचे नियोजन कसे करावे हे सुद्धा माहीत नव्हते. आणि त्यामुळे आज मोठया प्रमाणावर सुधारणा झाली आहे.
अशा सर्व संकल्पाना आपण यापुढे विचारपूर्वक वापरावे आणि त्यामुळे आपल्या समाजाला योग्य दिशा मिळेल. तसेच आपल्या समाजात जे कमी शिक्षित आहेत त्यांना याची फारशी माहिती नसते त्यांना सुद्धा नविन ज्ञानात भर पडेल. आपण अनेक कार्यक्रम प्रसंगी यावर थोडा वेळ चर्चा केली पाहिजे यातून सत्य पुढे येईल. आज आपले अनेक बहुजन लोक उच्च शिक्षित आहेत. तेच आपल्या समाजाला वैचारिक दिशा देऊ शकतात. आपण आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा आणि जे निवृत्त आहेत त्यांनी थोडा जास्त वेळ समाजासाठी काढावा आणि आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे. आता आपल्याकडे संवादाचे माध्यम(मोबाइल) सुद्धा आहे. त्यामुळे आपण कितीही दूर असलो तरी आपल्या लोकांपर्यंत जाऊ शकतो. याचा वापर सुद्धा आपण केला पाहिजे. आज स्त्रिया सुद्धा खूप उच्च शिक्षित आहेत आणि त्यासुद्धा सामाजिक कार्यात पुढे येत आहेत ही मोठी समाधानची बाब आहे. पूर्वी स्त्रिया फक्त कपडे आणि दागिने याची चर्चा करीत होत्या पण आज मोठया प्रमाणावर वैचारिक चर्चा करीत आहेत. अनेक वैचारिक कार्यक्रमांत भाग घेत आहेत. आज बर्याच ठिकाणी स्त्रिया जास्त प्रमाणात पुढे आहेत म्हणजे शाळा, कॉलेजात आणि विद्यापीठात मुली जास्त संख्या आहेत, निकाल लागला तर मुलीच पुढे आहेत हे सर्व सवित्रिमाई आणि महात्मा फुले यांचे योगदान आहे. आज सर्व स्त्री वर्गाने मला तर वाटते सकाळी सर्वत प्रथम सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांचे स्मरण केले पाहिजे. इतर काल्पनिक देव –देवतांपेक्षा हे फार मोठे आहेत. कारण यांच्या कार्याचा परिणाम आज आपणास दिसत आहे. आणि हे उपकार फक्त स्त्री जातीवर नाही तर समस्त मानवी समाजावर केले आहेत. कारण समाज घडविण्यात स्त्रिया पुढे गेल्या पाहिजेत आणि त्या शिक्षणाने जात आहेत.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी शिक्षणाचा अर्थ सांगताना म्हटले आहे की, “ बरं-वाईट समजण्याची क्षमता विकसित करणारं शिक्षण असावं. ज्या शिक्षणाने बरे काय आणि वाईट काय हे समजत नसेल तर ते शिकलेले कसले हुकलेले म्हणावे लागतील.” हा इशारा आपण ध्यानात घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या समाजाला योग्य काय आणि आयोग्य काय याची दिशा दिली पाहिजे. आणि ज्या काही आज समाजात चुकीच्या संकल्पना वापरत आहोत त्या शिक्षणरूपी साधनाने दूर करू आणि आपला समाज प्रकाशमय करू अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो.
जय भारत ! जय संविधान !!
प्रा. रमेश. जे. इंगोले
नाशिक (9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत