मुख्यपानविचारपीठसंपादकीय

संविधान दिनी :बाबासाहेब काळजीत कां होते ?

संविधान देतांना हा महापुरुष इतका चिंतीत का होता ? इतका उद्विग्न का ? तो तर परमोच्च आनंदित असायला हवा होता ! पण तसा तो नव्हता. तो या देशावर पराकोटीचा प्रेम करायचा. तो या देशाला चांगले समजून होता.
ते व्यक्त होत होते.

१७ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभा भरली. अध्यक्षस्थानी डॉ राजेंद्रप्रसाद हे होते. संविधान मसूदा कमेटीचे अध्यक्ष व एकूणच निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेपूढे, ‘या संविधान सभेने निश्चित केलेले भारतीय संविधान मंजूर करण्यात यावे’ असा एक ओळीचा ठराव मांडला.

ठराव मांडताक्षणी चारही बाजूंनी टाळ्यांचा गजर झाला. बराच वेळ तो सुरू होता. यानंतर या ठरावावर आपण मान्यवर सदस्य बोलू शकता असे अध्यक्षांनी सूचविले. त्यानुसार ठरावावर चर्चा सुरू झाली. प्रशंसा करणारांचे प्रमाण जास्त होते. विरोधातही बोलले गेले. चर्चेत पहिले बोलणारे सदस्य महावीर त्यागी हे होते. एकूण १०७ जण बोलले. ही चर्चा २५ नोव्हेंबर पर्यंत चालली. तो चर्चेचा शेवटचा दिवस नमूद झाला. त्याही दिवशी १२ वक्ते बोलले. शेवटचे भाषण बाबासाहेबांचे होणार होते. ते चर्चेला उत्तर होते. एकूणच आढावा देणारे-घेणारे होते. प्रचंड वातावरणनिर्मिती झाली होती. उत्सुकता शिगेला पोचली होती.

उत्कृष्ट वुलन सुट असा बाबासाहेबांचा पेहराव होता. ५५ मिनिटे ते बोलले. ‘टाळ्यांचा गजर’ व ‘सूईपटक सन्नाटा’ या दोन्हींचाच तिथे वावर असावा. बाबासाहेब जीव ओतून बोलत होते. देशाच्या काळजीचे ठोके त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होते.
तासभर संपूर्ण सभागृह केवळ त्यांच्या ताब्यात होते.

ते विचारते झाले, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.

ते पूढे असेही म्हणाले, भविष्यात भारतातील लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील कोण सांगू शकेल ? आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गाचा अवलंब करतील की दुसऱ्याच क्रांतीकारी मार्गाचा अवलंब करतील ? त्यांनी दुसऱ्याच मार्गाचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो ते अयशस्वी होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही.

पुढचा गंभीर इशारा देत बाबासाहेब म्हणाले, या देशात राजकीय सत्तेची मक्तेदारी मुठभर लोकांच्या हाती आहे. ती मक्तेदारी फार काळ चालत आलेली आहे. उरलेले लोक निव्वळ ओझे वाहणाऱ्या बैलासारखे झालेले आहेत.

तसेच, आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे. तर अनेक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत ? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत ? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारित राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती आपण शक्यतो लवकर दूर करायला हवी. अन्यथा ज्यांना याचे चटके बसतील ते, संविधान सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेला हा राजकीय लोकशाहीचा डोलारा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.

इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही असे सभागृहास विचारुन बाबासाहेब म्हणाले, हिंदू लोकांचे जातीभेद व संप्रदाय भेद ह्या जुन्या शत्रूंमध्ये एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या तत्वप्रणालीच्या राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. ते आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील ? मला माहित नाही. पण जर या राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.
या संभाव्यतेविरुध्द लढण्यासाठी आपण कटिबध्द व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे.

असे, गांभीर्याने ओतप्रोत बरेच बाबासाहेब बोलले. द्रष्टेदृष्टी ही अशीच असते. आजही ते प्रासंगिक आहे.
मूल्यमापन, उपचार, निदान करावेच लागेल. राज्यशासनाकडे जबाबदारी मोठी जाते. संविधान दिनाच्या आनंदाला चिंतेची ही जी किनार आहे, ती उगाच नव्हे !
पुर्णत्वाकडे हा नेता जो गेला, तो याचमुळे ! हे केवळ स्तुतीगान नव्हे !

– प्रसिध्द ज्येष्ठ पत्रकार मा. रंजीत मेश्राम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!