तू कधीही परत येवू शकतेस

कोकण एक्स्प्रेस ॥ संपादकीय
महाराष्ट्र गेले आठवडाभर वैष्णवी हगवणे या महिलेच्या हुंडाबळीच्या प्रकरणाने अस्वस्थ झाला. आपल्या राज्याला नेहमीच आपण पुरोगामी म्हणून नावाजतो किंवा मिरवतो, पण या पुरोगामीत्वाला काळीमा फासण्याचे अनेक गंभीर गोष्टी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक घडल्या आहेत. आत्ताची ही हुंडाबळीची घटना तर या सर्वांची परिसिमा गाठणारी ठरली आहे. राजकीय वरदहस्त आणि दबदबा असलेल्या हगवणे कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील दोन्ही सुनांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिला, शेवटी हा त्रास असह्य झाल्यावर आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मागे टाकून वैष्णवीने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. अर्थात पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर जवळपास १९ जखमा आहेत. त्यामुळे ही खरोखरच आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबतचा तपास सुरू आहे. याप्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि सासरा या सर्वांनाच अटक करण्यात आली आहे. परंतु या घटनाक्रम पाहिल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते की, या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास हा काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. हे सर्व घडण्या अगोदर हगवणे फॅमिलीकडून म्हणजे सासरच्या लोकांकडून त्रास होतो म्हणून या घरातील मोठी सून असलेली मयूरी जगताप -हगवणे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती या तक्रारीवर जर वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता किंवा हा घटनाक्रमच घडला नसता तो दुर्दैवाने घडला आणि एक नऊ महिन्याचे बाळ आईपासून पोरकं झालं. मात्र माध्यमांचा दबाव आणि माध्यम आणि उठवलेला आवाज यामुळे सरकारला या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली आणि तपासाला वेग आला.या हगवणे कुटुंबियांची एवढी दादागिरी आणि माजोरीपणा आहे की, त्यांनी वैष्णवीच्या बाळाला त्यांच्या आजी-आजोबाकडे सुपूर्द केले नव्हते. उलट एका गुंडाकडून रिवाल्वरचा धाक दाखवून धमकावलं. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडू शकते हेच मोठं धक्कादायक वास्तव्य आहे. अशा प्रकारच्या अनेक वैष्णवी जीव देत असतील किंवा त्रासाला सामोरे जात असतील पण काही ना काही कारणामुळे त्यांच्या हाल-अपेष्टा समाजासमोर येत नसतील. आत्ताची जी अधिकृत आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार, महाराष्ट्रमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब अशी आहे की, केवळ दोन टक्केच महिला आपल्या विरुद्धच्या अन्याय बाबत पोलीस स्टेशनला तक्रार करतात आणि केवळ चार टक्केच महिला एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेतात.याचाच अर्थ असा आहे की, सरकारने महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जरी सक्षम कायदे केले असले तरी ते महिलांपर्यंत किती पोहोचतात आणि स्वतः अत्याचारग्रस्त ‘स्त्री ‘ याबाबत किती जागरूक असते किंवा ती धाडसाने पोलीस स्टेशन पर्यंत जाते का ? याचा फीडबॅक शासनाने कधी घेऊन त्यावर कार्यवाही केली आहे का ?किती महिला आयोगाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहचतात ? घरगुती हिंसाचार कायदा २००५ महाराष्ट्रात लागू आहे, परंतु त्याबाबत किती महिलांना त्याची माहिती आहे आणि किती महिला या संदर्भात आपल्या वा आपल्या जवळच्या महिलेसाठी त्याचा उपयोग करून घेतात ? फार नगण्य आणि उदासीन करणारी ही आकडेवारी आहे. याला पूर्णतः सदर स्त्री अथवा महिला जबाबदार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. यास जबाबदार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती आणि कौटुंबिक दबाव, बंधने आणि रुढी – परंपरा हा सर्वच फॅक्टर एकाच वेळी ‘स्त्री ‘वर लागू होतो. जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेत प्रवेश करून कितीतरी पुढे गेले आहे, परंतु स्त्रियांना अजूनही अनेक ठिकाणी उंबरठा ओलांडताना नवऱ्याला किंवा ासर्याला विचारूनच बाहेर पडावे लागते. महाराष्ट्रातील सामाजिक विचारधारा, सांस्कृतिक धरोहर व संत परंपरेचा वारसा जपणारा महाराष्ट्र एका बाजूला आणि त्याचवेळी ‘ स्त्री ‘ हक्काची आग्रहाची जाणीव करून देताना स्त्रियांच्या अत्याचारावर, अन्यायावर मुग गिळून गप्प बसणारा महाराष्ट्र हा वेगळाच.स्त्री समानतेच्या गोष्टी वेगवेगळ्या मंचावर जोरकसपणे मांडल्या जातात. स्त्रियांना राजकारणात समाजकारणात किंवा खाजगी आणि सरकारी आस्थापनेत आरक्षण हवे, हक्क मिळायला हवा यासाठी चांगले प्रयत्न केले गेले आहेत किंबहुना त्याची अंमलबजावणीही अनेक ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर या सर्व ठिकाणी पुरुषसत्ताक प्रवृत्ती स्त्रियांना कमी लेखण्यात किंवा त्रास देण्यात पुढे आहेत, त्याचा पूर्ण बंदोबस्त होऊ शकत नाही. त्या कारणांचा उहापोह झाला आहे. दुर्दैवाने संस्कृती , संस्कार , शिष्टाचार ,लाज लज्जा आणि शरीराबद्दलचे सर्व बंधने ही फक्त स्त्रियांनीच पाळावीत नव्हे ती पाळलीच पाहिजे अशी सामाजिक मानसिकता अ पुरुषदमन समाजाची असते. त्यामुळे स्त्री शिक्षित असणं पुढारलेली असणं, किंवा स्त्रियांना राजकारणात विविध पद बहाल करणं हा सर्व दांभिकतेचा भाग आहे. हे सर्व प्राप्त करणाऱ्या वा स्त्रीला घरामध्ये कशी वागणूक दिली जाते किंवा मिळते हे फार महत्त्वाचे आहे. ज्या हगवणे कुटुंबियांनी आपली सून असलेल्या वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिला जीवन संपवण्यासाठी भाग पाडले ते हगवणे कुटुंब तथाकथित राजकीय प्रतिष्ठा मिळवलेले आहे असे सांगितले जाते. वैष्णवीच्या वडिलांनी सुरुवातीला तिचे लग्न करण्यास नकार दिला परंतु या कुटुंबीयांकडून त्यांच्यावर जबाब आणला गेला आणि नाईलाजाने लग्न करावे लागले आणि या लग्नात जवळपास ५० तोळे सोने , दहा किलो चांदी,फॉर्च्युनर गाडी आणि एक टू व्हीलर शिवाय लग्नावर जवळपास एक कोटीचा खर्च हे सार कसपटे कुटुंबीयांनी आपल्या लेकीसाठी केलं. ही सारी पोखरलेली सामाजिक प्रतिष्ठा आहे, बडेजावपणाचा आहे, आपल्याकडील ऐश्वर्याचं प्रदर्शन आहे. खरं तर हा ‘विवाह ‘ भारतीय संस्कृतीच्या समाजाच्या साक्षीने होणाऱ्या सुंदर नात्याच्या शब्दाखाली चाललेला ‘लिलाव ‘ आहे. कस्पटे कुटुंबीय आपली मुलगी गमावली म्हणून धाय मोकळून रडत आहेत. वैष्णवीच्या वडिलांनी न्यूज चॅनलला ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी सांगितले की आपल्या मुलीसाठी त्यांनी तिची नणंद सासू-सासरे नवऱ्याच्या डोकं टेकून पाया पडले अनेक वेळा विनंत्या केल्या, वेळोवेळी पैसेही दिले. आपल्या मुलीला वैष्णवीला, सर्व परिस्थिती नीट होईल सगळं काही ठीक होईल असा दिलासाही दिला.परंतु ते एक गोष्ट सांगायला निश्चित चुकले ते म्हणजे, जेव्हा तुझ्यावर कधी अत्याचार, अन्याय होईल तेव्हा सहन करू नकोस, तुला जेव्हा राहायचे नाही तेव्हा तू सरळ आपल्या माहेरी निघून ये, घरी निघून ये तुला कोणतीही अडचण येणार नाही. असे सांगितले नाही हीच मोठी चूक आहे. आपल्या लेकीच्या जीव पणाला लावेपर्यंत जी जपली जाते ती सामाजिक प्रतिष्ठा नंतर चाटायची काय ? सासरकडच्या लोकांनी गुन्हा केलेलाच आहे त्याची शिक्षा त्यांना मिळेलच. परंतु आपली मुलगीला प्रचंड मारहाण होत असताना, मानसिक त्रास दिला जात असताना, ती आपल्या वडिलांना सांगते आहे, तरीसुद्धा यावर काहीच निर्णय न घेणारा बापही तेवढाच गुन्हेगार आहे. कारण काय ? तर पुन्हा एकदा तीच खोटी सामाजिक प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील ? या सर्व गोष्टीखाली अनेक नवविवाहितांना आपल्या जीवाची किंमत मोजावी लागते. मग समाज अनेक उसासे सोडत बसतो. ‘दिल्या घरी तू सुखी रहा हा ‘ आशीर्वाद देईपर्यंत ठीक आहे परंतु खरोखरच आपली लेक ज्या ठिकाणी पाठवली गेली आहे, त्या ठीकाणी ती खरचं सुखी आहे का हेही पाहणे जबाबदारीचं ठरतं. जे कुटुंबीय करोडो रुपयांची मागणी करतात आणि मग लग्न करतात त्यांना आपली मुलगी तू म्हणून का पाठवायची ? असा विचार कस्पटे सारखे कुटुंबीय का करत नाहीत ? हा मोठा प्रश्न आहे. हे लग्न नव्हतेच हा केवळ ‘व्यवहार ‘ होता. ज्या घरात आपली मुलगी जाणार आहे, त्या घराची मानसिकता ही जर लालची, स्वार्थी हपापलेली असेल व ते अगोदरच कळत असेल तर त्या ठिकाणी तिचं लग्न लावून देणे ही महाचूकच आहे. त्यामुळे सरकारने कितीही कडक कायदे केले तरी त्याचा उपयोग शून्यच असतो.या हगवणे कुटुंबीयांची मोठी सून मयुरी जगताप हिने एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे , घरात या दोघींची नणंद करीष्मा हिचीच सत्ता होती, ती म्हणेल तसंच या घरात घडत असे. एकूणच या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की, समाजामध्ये स्त्रीवर जेव्हा कौटुंबिक अत्याचार आणि अन्याय होतो त्यामध्ये बहुतांशी स्त्रीचा सहभाग जास्त असतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मानसिकतेचा विचार करत नाही, आणि जोपर्यंत स्त्री ही स्त्रीला सांभाळून घेत नाही,समजून घेत नाही किंवा आपल्या घरात आलेल्या स्त्रीला तिचं स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत अशा गुंतागुंतीच्या घटना कमी होतील का याबाबत शंकाच आहे. ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी सामाजिक आणि कौटुंबिक घुसमट होत असलेल्या आणि सासर आणि माहेर ही दोन्ही नाती सांभाळताना कोंडीत सापडलेल्या,संस्काराच्या दबावाखाली आलेल्या आणि पुरुष सत्ता केंद्राकडून अत्याचार सहन करत असलेल्या ‘स्त्री ‘ ला, आपल्या लेकीला तू आपल्याच घरी कधीही परत येऊ शकतेस अशी मायेची प्रेमाची ‘साद ‘ माहेरच्यांनी घालून ठेवली पाहिजे, त्यामुळे अशा अनेक लेकींना कणखर मानसिक पाठबळ मिळत राहील, जिथं कायदा जीव वाचवणार नाही तिथं असा हा आपल्याच हक्काच्या लोकांचा आश्वासक शब्द कदाचित पुढची अप्रिय गोष्ट टाळू शकेल.
संपादक ॥ कोकण एक्सप्रेस
9860403311
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत