दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

अनन्य कॉम्रेड’ शरद पाटील|

ये उजालों का शहर तुमको मुबारक!

शपांनी अविभाजित कम्युनिस्ट पक्षात १९४६ ते १९६४ अशी १८ वर्षे जीवनदानी कार्यकर्त्याची भूमिका बजावली. या अविभाजित कम्युनिस्ट पक्षावर सोव्हिएत बोल्शेव्हिक क्रांतीचा प्रभाव होता. पण १९४९ साली माओंच्या नेतृत्वाखाली झालेल्या चीनी सशस्त्र क्रांतीनंतर अविभाजित कम्युनिस्ट पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते चीनी सशस्त्र क्रांतीने प्रभावित झाले. शोषित वर्गाच्या क्रांतीसाठी संसदीय मार्ग नव्हे, तर सशस्त्र क्रांतीचा मार्गच परिणामकारक आहे’, ही चीनी क्रांतीने प्रभावित गटाची प्रबळ धारणा बनली. या अंतर्विरोधाची परिणती अखेर १९६४ साली अविभाजित कम्यनिस्ट पक्षाच्या विभाजनात झाली.

या विभाजनानंतर ‘भाकप (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) आणि ‘माकप’ (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) हे दोन पक्ष उदयाला आले. ‘भाकप’ व ‘माकप’ हे अनुक्रमे उजवे कम्यनिस्ट व डावे कम्युनिस्ट म्हणून तर इंग्रजीत हे पक्ष अनुक्रमे ‘सीपीआय’ व ‘सीपीएम’ म्हणून ओळखले जात. ‘भाकप’ (सीपीआय) वर रशियन बोल्शेव्हिक क्रांतीच्या ध्येयधोरणांचा तर ‘माकप’ (सीपीएम) वर चीनी क्रांतीच्या ध्येयधोरणांचा प्रभाव होता. या विभाजनानंतर अविभाजित कम्युनिस्ट पक्षातील काही नेते ‘भाकप’ मध्ये तर काही नेते ‘माकप’ मध्ये सामील झाले. शपांनीही माकपची वाट अनुसरली.

■ शपांचा दुसरा राजकीय वनवास :
कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन हे ‘द्रोणाचार्यां’चेही विभाजन होते. दोन्ही छावण्यातील द्रोणाचार्यां’च्या उपस्थितीमुळे पक्षातील बहुजन कार्यकर्त्यांबाबतच्या पक्षपाती व्यवहारात काही बदल झाला नाही. परिणामी माकपमधील १९६४ ते १९७८ हा १४ वर्षाचा कालखंडही शपांसाठी राजकीय वनवासच ठरला. त्याविषयी शपा लिहितात,

“मी माकपमध्येही काळ्या यादीत होतो. मी बहिष्कृत राहिलो याचे कारण मी अब्राह्मणवादाचा पुरस्कार करणारा शूद्र होतो.” पुढे एकेठिकाणी ते म्हणतात-

“कोणतीही पदवी न घेता कम्यनिस्ट चळवळीत झोकून घ्यायचा अव्यवहारीपणा आम्ही केलेला असल्यामुळे ॲकेडेमीशियनला मिळू शकणाऱ्या संशोधनाच्या सवलती आम्हाला त्यावेळी काय आजही मिळू शकत नाहीत. त्यासाठी आम्ही बडोद्याला जाऊन राहिलो”.

पक्षातील या वनवासापेक्षा या कळातील तुरुंगवास मात्र शपांना ज्ञानार्जन व संशोधनासाठी फलदायी ठरला. कारण तुरुंगवासातही या ज्ञानयोग्याचं वाचन, लेखन, चिंतनात खंड पडला नाही.

■ मार्क्स चूकला आहे :
१९६३-६४ हर्सूल (दीड वर्ष) व १९६४-६५ नाशिक (दीड वर्ष) या कारागृहातील कारावासात शपांनी मार्क्सवादाचं बायबल समजल्या जाणाऱ्या ‘कॅपिटल’ या ग्रंथाचे सखोल अध्ययन केले. आकृत्यांसह टिपणे काढली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, या जगप्रसिद्ध ग्रंथात मार्क्सने मांडलेले एका अर्थशास्रीय प्रमेय चूकले आहे. ही चूक त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्या निदर्शनास आणून दिली. सोबत आपली आकृत्यांसह काढलेली टिपणेही त्यांना पाठविली व मार्क्स चूकला आहे यावर कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांचेकडून शिक्कामोर्तब करुन घेतले.

ही साधीसुधी गोष्ट नव्हती. तिचा जागतिक स्तरावर गवगवा व्हायला हवा होता. त्यावर जेएनयू सारख्या डाव्यांच्या गड असलेल्या विद्यापीठांतून डिबेट्स व्हायला हव्या होत्या. पण पक्षातील द्रोणाचार्यांनी शपांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून या ऐतिहासिक घटनेकडे चक्क कानाडोळा केला. शपांनी ही गोष्ट अनेकदा आपल्या व्याख्यानातून, शिबिरातून, लेखनातून मांडली. पण माकपतील सर्व कॉम्रेड्सनी त्यावर कोणतेही भाष्य न करता मौनाचा कट केला तो आजतागायत कायम आहे.

■ संस्कृत शिकण्यासाठी बडोद्याला प्रयाण : (१९६६)
माकपतील कॉम्रेड मंडळी भारतीय इतिहासातील घडामोडींकडे मार्क्सच्या चष्म्यातून पाहत. वास्तविक मार्क्सचा भारतीय इतिहासविषयक अभ्यास तोकडा असल्यामुळे मार्क्सवादी दृष्टीकोनातून भारतीय इतिहासाचे नेमके आकलन शक्य नाही, याची शपांना कल्पना आली. तेव्हा आपण स्वत:च प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी वैदिक वाङ्मय अभ्यासले पाहिजे व वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासासाठी संस्कृतही शिकले पाहिजे. या ध्यासाने वयाच्या ४० व्या वर्षी (१९६६ साली) शपांनी बडोद्याला प्रयाण केले. शपा म्हणतात, “तेव्हा माकपच्या नेत्यांनी ‘चळवळीच्या हमालीत आनंद न मानता इतिहासज्ञ बनायचा उपद्व्याप करतो’ म्हणून आमचा उपहास केला.”

         बडोद्यातील दोन वर्षांच्या वास्तव्यात पहिले वर्ष त्यांनी 'सेंट्रल फॉर सोशल स्टडीज' या संस्थेत 'इंटेन्सिव्ह रिसर्च'साठी, तर दुसरे वर्ष 'विद्याभास्कर' मणिशंकर उपाध्याय या थोर संस्कृत पंडितांकडे संस्कृत शिकण्यासाठी सत्कारणी लावले. 

         चाळीस वर्षे वयमान असलेल्या आपल्या शिष्याची शिकण्यातली लगन व अभ्यासतली गती पाहून मणिशंकर उपाध्याय विस्मयचकित झाले. तेव्हा पाणिनीच्या 'अष्टाध्यायी' या ग्रंथाचा अभ्यास केल्याखेरीज संस्कृतचे ज्ञान अपुरे असते, हे त्यांनी शपांच्या निदर्शनास आणून देऊन त्याचेही अध्ययन करण्याची शपांना सूचना केली. ती शिरोधार्य मानून शपा पाणिनीलाही समर्थपणे भिडले. शपांच्या भात्यातील 'पाणिनीय व्याकरण' या अमोघ अस्रामुळे पुढे ब्राह्मणी विद्वान शपांना भिडायला कचरु लागले. शपांचा हा वैचारिक दबदबा आजीवन कायम राहिला. 

         आपले संस्कृतचे गुरु 'विद्याभास्कर' मणिशंकर उपाध्याय यांच्या निर्वाणानंतर शपांनी 'सत्यशोधक मार्क्सवादी', नोव्हेंबर १९८२ च्या अंकात, त्यांचे अत्यंत कृतज्ञापूर्वक स्मरण करणारा सुंदर मृत्युलेख लिहिला. त्यात शपांनी मणिशंकर उपाध्याय यांचे अत्यंत विलोभनीय असे जे शब्दचित्र रेखाटले ते शपांचे भाषा लालित्य अनं भाषावैभवाची अनोखी मिसाल ठरले. या लेखमालेत पुढे आपण त्याचा आस्वाद घेणारच आहोत. किंबहुना त्याखेरीज ही लेखमाला अपूरी ठरेल.

■ पक्षबांधणी :
कम्युनिस्ट पक्षाच्या विभाजनामुळे पक्षाच्या (माकपच्या) पुनर्बांधणीची गरज होती. १९६८ ला बडोद्याहून धुळ्याला परतल्यानंतर शपांनी पक्षबांधणीच्या कार्याला झोकू्न घेतले. त्यासाठी आदिवासी भागात काम सुरु केले. शिबीरं सुरु केली. किसान सभा स्थापनेच्या कार्यक्रमाची आखणी केली.

         या पायाभूत कामामुळे फेब्रुवारी १९६९ माकपच्या अधिकृत पक्ष संघटनेच्या स्थापनेसाठी कॉम्रेड गोदुताई परुळेकर आल्या. शपांची माकपच्या धुळे जिल्हा प्रादेशिक समितीच्या चिटणीसपदी नेमणूक करण्यात आली. तथापि शपांना अखेरपर्यंत जिल्हास्तरावरच ठेवण्यात आले. राज्य आणि राष्ट्रीय कमिटींवर काम करण्याची त्यांच्या अंगी योग्यता असूनही त्यांना राज्य आणि राष्ट्रीय कमिटींवर घेण्यात आले नाही.

■ विविध लढे :
● साक्री तालुक्यातील मालपूर – कासारे येथील बेघर शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांचा लढा.

● सप्टेंबर १९६९ मध्ये बेघरांच्या परिषदेचे व परिषदेला संबोधित करण्यासाठी कॉ. प्रभाकर संझगिरी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. अशारीतीने कासाऱ्यातील लेनिन नगरचा बेघरांचा लढा शपांच्या वर्गसंघर्षाच्या लढाईत महत्त्वपूर्ण ठरला.

● सत्तरच्या दशकात धुळे जिल्ह्यातील नवापूर व साक्री तालुक्यातील जंगल पडिक जमीन आदिवासींना देण्यात यावी यासाठी चळवळ उभारली. या लढ्याला पक्षानेही पाठिंबा दिला.

● १९७० च्या जानेवारीत साक्री तालुक्यातील पानखेडे या आदिवासी पाड्यात तालुकास्तरीय भूमिहीन परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला साठावर खेड्यापाड्यातील सुमारे अडीच हजार भूमिहीन आदिवासी उपस्थित होते. कॉ. गोदुताई परुळेकर यांनी या परिषदेला संबोधित केले.

● १९७१ मध्ये धुळे जिल्हा किसान सभेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. त्यालाही कॉ. गोदुताई परुळेकर हजर राहिल्या.

● सत्तरच्या दशकात सुरु झालेला वन अतिक्रमणाचा लढा आजही सुरु असून भूमिहीन आदिवासींना त्यांच्या नावाचा ७/१२ उतारा मिळेपर्यंत तो चालू राहणार आहे.

● अशारीतीने भूमिहीनांना क्रमाक्रमाने लढ्याच्या दिशेने नेण्यासाठी मोर्चेबांधणी व सत्याग्रह आयोजित केले.

● १९७७ साली ‘आदिवासी स्रियांनाही हिंदू कोड बिलाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या’ असा प्रस्ताव मांडून शपांनी त्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरु करावे अशी शिफारस केली. पण कॉ. गोदुताई परुळेकर आणि कॉ. अहिल्या रांगणेकर यांनी तो फेटाळून लावला.

■ ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखन : (१९७२)
या काळातच शपांनी ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. त्याचे अनन्यत्व कॉम्रेड बी. टी. रणदिवेंनीही मान्य केले. भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर म्हणाले, “हा शरद् कोसांबींपुढे गेला आहे.” याशिवाय अनेक मान्यवरांनीही या ग्रंथाची प्रशंसा केली. तरी माकपने तो छापण्यास नकार दिला. त्याला प्रकाशकही मिळेना. त्याच्या प्रकाशनासाठी शपांना १० वर्षे प्रतिक्षा करावी लागली. अशा या मौलिक ग्रंथाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी फक्त दीड पानांची प्रस्तावना लिहिली.

■ आणीबाणीतील तुरुंगवास : (१९७५)
१९७५ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारुन सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तुरुंगात रवानगी केली. शपांनाही विसापूर तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले.

■ माकपशी मतभेदाचे मुद्दे :
शपांचे माकपशी ध्येयधोरणाविषयी मतभेद वाढतच गेले. त्यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे-

◆ मार्क्सवादाच्या मर्यादा अधोरेखित केल्या :
    मार्क्सवादाचा अभ्यास करताना शपांच्या लक्षात आले की, मार्क्सची 'वर्गांत' व 'वर्गसंघर्षाची' संकल्पना भारताला लागू पडत नाही. कारण भारतीय समाज हा 'वर्गीय' नव्हे तर 'जातीय' समाज आहे. भारतात वर्गोदय इंग्रज राजवटीत झाला. पण त्याआधी प्राचीन काळापासून हजारो वर्षे भारतीय समाज हा जातीय समाज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे भारतीय सर्वहारा हा फक्त 'आर्थिक सर्वहारा' नसून जातीय उतरंडीमुळे तो 'सामाजिक सर्वहारा' देखील आहे. व केवळ वर्ग नव्हे, तर जात हे देखील त्याच्या शोषणाचे सनातन कारण आहे. परिणामी त्याच्या शोषणमुक्तीसाठी वर्गांताप्रमाणे जातिअंतासाठीही लढा लढावा लागेल. पण

वर्गाला ब्रह्म मानणाऱ्या व ‘जात देखील वर्गाच्या पोटातच असते’ ही सार्वत्रिक श्रद्धा बाळगणाऱ्या आणि जातीलढ्यामुळे वर्गलढ्यात फूट पडेल या धारणेला कवटाळून बसलेल्या सनातनी मार्क्सवाद्यांना शपांचं हे चिंतन गुस्ताखी वाटली.

◆ जसाचा तसा मार्क्सवाद स्वीकारणे भारताच्या दृष्टीने चूकीचे आहे :
         कार्ल मार्क्सचे भारताविषयक अध्ययन हे त्रोटक स्वरुपाचे असल्यामुळे भारतीय समाज व इतिहासाला जसाचा तसा मार्क्सवाद लावणे गैरलागू आहे, हे शपांचं मतही पोथीनिष्ठ मार्क्सवादी नेत्यांच्या कपाळावर आठ्या पाडणारे ठरले.

         शपांसारखेच एस्. जी. सरदेसाई या कॉम्रेडनी युगांतरमध्ये हेच मत व्यक्त केल्याचे शपांनी 'माफुआ' च्या पृष्ठ क्रमांक ६४ वर उद्धृत केले आहे. ते खालीलप्रमाणे-

         एस्. जी. सरदेसाई ०४.०१.१९८१ च्या 'युगांतर' मध्ये हताशपणे उद़्गारतात- "कम्युनिस्टांना (यात मी 'सीपीआय' आणि 'सीपीएम' या दोघांचाही समावेश करतो.) मार्क्सवादाचे कोडे अजून उलगडलेले नाही हे अमान्य करुन चालणार नाही."

         शपा म्हणतात - "हे कोडे न उलगडायचे एकमेव कारण म्हणजे मार्क्सच्या एकमेव वैज्ञानिक विचारपद्धतीचे सूत्र केवळ वर्गीयच असू शकते असे मानून त्याची किल्ली भारतीय इतिहास व समाजाला लावायची सर्वंकश मार्क्सवाद्यांची दांडगाई. या किल्लीने वर्गीय-इतिहास - समाजाची कुलपे उघडली पण वर्गीय जातीय इतिहास - समाजाचे कुलूप कसे उघडणार?"

◆ फुले-आंबेडकरांच्या विचारांशी मार्क्सवादाची सांगड घालणे आवश्यक :
         शोषणमुक्त भारतीय समाजासाठी जातवर्गस्रीदास्यांत असा तिहेरी लढा लढावा लागेल व त्यासाठी मार्क्सवादाची फुले-आंबेडकरांच्या विचारांशी सांगड घातली पाहिजे, हे शपांचे विचार तर ब्राह्मण्यग्रस्त कम्युनिस्ट नेतृत्वाला 'हलाहला'सारखे वाटले.

◆ जातीअंतासाठीचे आदर्श म्हणून टिळक नव्हे तर फुले-आंबेडकर स्वीकारले पाहिजेत :
         इतकेच नव्हे तर जातियवादी, कर्मठ बा. गं. टिळकांची तसबीर पक्ष कार्यालयांच्या भिंतींवर मार्क्स-एंगल्स-लेनीन सोबत लावणे हे विसंगत आहे. व जातिअंतासाठीचे आदर्श बा. गं. टिळक नव्हे तर फुले-आंबेडकर असले पाहिजेत!

◆ तसेच “या देशातील ब्राह्मणी मार्क्सवाद्यांनी मार्क्सला ब्राह्मण करुन टाकले आहे.” ही शपांची टिप्पणी मार्क्सवाद्यांना चांगलीच झोबली. त्याची परिणती शपांची वेळोवळी अडवणूक करून त्यांचे पंख कापण्यात झाली. तथापि शपांवर त्याचा असर झाला नाही, दिनेश रघुवंशी हा कवी लिहितो-

         मेरे पंखों को कुतरने की जरुरत क्या है।
         मुझको बीन पंख भी उडने का हुनर आता है॥

या काव्यपंक्ती शपांना तंतोतंत लागू पडतात. कारण शपांचे सामर्थ्य त्यांच्या ज्ञानात व व्यासंगात होते.

         पक्षातील भेदभावपूर्ण वागणूकीला जरी ते पुरुन उरले. तरीपण पक्षबांधणी सोसलेले कष्ट, पक्षप्रचारासाठी खाल्लेल्या खस्ता, भोगलेला तुरुंगवास, जीवनदानी कार्यकर्ता म्हणून केलेला असीम त्याग, लढलेले लढे, मांडलेले दिशादर्शक विचार या शपांच्या योगदानाची माकपमधील ब्राह्मणी नेतृत्वाने काहीएक जाणीव ठेवली नाही. या घोर उपेक्षेला व पदोपदी केल्या जाणाऱ्या अडवणूकीला कंटाळून व अखेर जातवर्गस्रीदास्यांत या आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी २७ जुलै १९७८ रोजी राजीनामा देऊन शपा माकपमधून बाहेर पडले. त्यावेळी ते ‌मनात म्हणत असतील-

         ये उजालों का शहर तुमको मुबारक हो सनम।
         मुझको अंधियारों से लडने का हुनर आता है॥
                                               - दिनेश रघुवंशी 

         शपा हे द्रष्टा नेता होते. पायाखाली पाहणाऱ्या संकुचित कम्युनिस्ट नेतृत्वाला भले त्यांचे विचार पटले नाहीत. पण जी एस राममोहन हे लेखक बीबीसीसाठी लिहिलेल्या 'कम्युनिस्ट पक्षाचा १०० वर्षाच्या इतिहास' या लेखात लिहितात-

“जागतिक पातळीवर भांडवलशाही व्यवस्थेने आपल्या प्रारूपांमध्ये बदल केले, पण साम्यवादामध्ये असे बदल होताना दिसत नाहीत.

भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी कधी जातीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं नाही, किंबहुना जातिवास्तव त्यांनी समजूनच घेतलं नाही. जात हे भारतीय समाजातील एक वास्तव असल्यामुळे साम्यवाद्यांनी ते समजून घेणं गरजेचं होतं.

चीन व रशियामध्ये अंमलात आलेल्या पद्धती भारतीय साम्यवाद्यांनी समजून घेतल्या आणि स्वीकारल्या, परंतु भारतीय समाजातील जातीय समीकरणांची फिकीर केली नाही.

भारतीय राजकारणातील जातीची भूमिका काय आहे, हे या लोकांनी समजून घेतलं नाही. श्रीपाद अमृत डांगे यांच्या काळात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघर्षाचं नेतृत्व करत होते, परंतु डांग्यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. मूलभूत रचना आणि जनाधार यांच्या आधारे जातीचा प्रश्न कमी लेखण्यात आला. या सगळ्याचा परिणाम आपल्या समोर आहे.”

             'शपा हेच तर म्हणत होते!'

रविवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. ०५.०२.२०२३ : राजगुरुनगर.
*
(क्रमशः दर रविवारी)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!