भगवान बुद्धांची शिकवण – भाग ७४

भगवान बुद्धांचा अहिंसा सिद्धांत
अहिंसा म्हणजे ‘जीवहिंसा न करणे,’ हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि, असा एक प्रश्न विचारला जातो की, बुद्धप्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती?
जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की, सर्वकाळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत् चे असत् ला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते.
ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे.
श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमकांविरूध्द स्वतः लढले आणि लोकांनाही त्यांनी लढण्यास प्रवृत्त केले होते. तर दुसरीकडे ब्रम्हदेश (म्यानमार) येथील भिक्खू स्वतः विदेशी आक्रमकांविरूद्ध लढले नाहीत आणि त्यांनी लोकांनाही लढण्यापासून परावृत्त केले. ब्रम्हदेशाचे लोक अंडे खातात पण मासे खात नाहीत.
अशा रीतीने दोन भिन्न देशांत अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अहिंसेच्या सिद्धान्ताबाबत अशी वस्तुस्थिती आहे.
अहिंसेचा खरा अर्थ
भगवान बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कुठेही दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दांत ते क्वचितच उल्लेख करतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने, ‘अहिंसेचा उपदेश करण्यात त्यांचा काय उद्देश होता’ त्याचा शोध घेतला पाहिजे.
यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला तथागतांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्त्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये, या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धांचा विरोध होता.
दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देण्याला त्यांचा विरोध होता; आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे.
‘अहिंसा परमो धर्म:’ हा आत्यंतिक सिद्धान्त जैन धर्मात आहे; बौद्ध धर्मात नाही.
दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धांनी जवळ जवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात ते असे म्हणतात. ‘सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हांला कोणाचीही हत्त्या करण्याची इच्छा होणार नाही.’ अहिंसेच्या तत्त्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. ह्यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धान्त हत्त्या करू नका, असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता.
वरील विधानावरून बुद्धांना अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल.
जीवहत्येची इच्छा (will to kill) व जीवहत्येची आवश्यकता (need to kill) ह्यांमध्ये बुद्ध फरक करीत असे, हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते, त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते, त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला.
भगवान बुद्धांच्या अहिंसा सिद्धान्ताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही.
हा सिद्धान्त चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धान्त आहे.
ही गोष्ट खरी की, जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय ते व्यक्तीवर सोपवितात. परंतु नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा (शहाणपण) असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे.
जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते, एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे.
ब्राम्हणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बुद्धांनी तत्त्व (Principle) आणि नियम (Rule) यात भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्त्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाने वागले यात संशय नाही. तत्त्वामध्ये तुम्हांला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमांत नसते. नियम तुम्हांला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२५.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ चतुर्थ खंड भाग दुसरा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत