इंग्रजी हटाव ! नविन शैक्षणिक धोरण !

डॉ .लीना पांढरे
इंग्रजी हटाव ! नविन शैक्षणिक धोरण !
गरिब, बहुजनांना उच्च शिक्षण, व नोकऱ्या बंद !
* *येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्गांना इंग्रजी हा विषय घेणे अनिवार्य राहिलेले नाही . इंग्रजी हा विषय सोडून दुसरी कुठलीही भाषा घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात .
- शाळेमध्ये म्हणजे पहिली किंवा तिसरी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना मातृभाषा आणि त्यासह इंग्रजी हा विषय अनिवार्य होता. आता इंग्रजी ही भाषा सोडून दुसरी कुठलीही भाषा घेऊन विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण होता येईल.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एफ.वाय.बी .कॉम ./प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी इंग्रजी हा विषय अनिवार्य होता .आता तो विषय ऐच्छिक करण्यात आलेला आहे.विद्यार्थी इंग्रजी विषय सोडून बी.कॉम. ची पदवी घेऊ शकतात. *तसेच या विद्यापीठात आजपर्यंत कला शाखेला प्रथम , द्वितीय आणि तृतीय वर्षाला इंग्रजी हा विषय अनिवार्य होता .आता इंग्रजी ऐच्छिक केल्यामुळे ही भाषा सोडून विद्यार्थी बी.ए .कला शाखेचे पदवीधारक होऊ शकतात.
*इंग्रजीच्या ऐवजी Indian Knowledge System /भारतीय ज्ञान परंपरा हा विषय शिकवला जाणार आहे .
*वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी इंग्रजीचे जे प्राध्यापक आहेत त्यांनी ट्रेनिंग घेऊन वरील विषय शिकवावा अशी अपेक्षा आहे म्हणजे त्यांचा कार्यभार कमी होऊन ते नोकरी गमावणार नाहीत.
*मे २०१७ नंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांची भरती जवळपास बंद केलेली आहे. असं असताना वेतन तासिका तत्त्वावर वर्षानुवर्ष काम करणारे आणि आशा लावून बसलेले जे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत त्यांना पूर्ण निराश व्हावे लागेल . आता त्यांच्या नोकरीची संधी अगोदरच नष्ट केली गेलेली आहे.
- ११ वी १२ वी ला शिकवणाऱ्या इंग्रजीच्या कायमस्वरूपी अध्यापकांना बहुतेक असाच एखादा पर्यायी विषय शिकवावा लागेल.
- सामान्य बहुजन समाजातील घरामध्ये इंग्रजीचे महत्त्व समजत नसल्याने इंग्रजी सोडून शिक्षण पूर्ण करता येत आहे याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना आनंद होऊ शकतो .कारण इंग्रजी सोडल्यामुळे भविष्यात होणाऱ्या नुकसानाची त्यांना कल्पना येत नाही .
*या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोरगरिबांची ,बहुजन समाजाची ,कष्टकरी सामान्यजनांची लेकरं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत त्यांना इंग्रजी पासून वंचित ठेवले जाईल आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेपासून ,ग्रंथालयाच्या भाषेपासून , संगणकाच्या भाषेपासून रोजी रोटी मिळवून देणाऱ्या भाषेपासून यांना वंचित ठेवून आपण त्यांचे पिढ्यानपिढ्या शोषण करणार आहोत .
- नवीन शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या उच्चवर्णीयांची व उच्चवर्गीयांची अपत्यं इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत /शिकू शकतात . विदेशात जाऊ शकतात . विदेशी ,ख्यातनाम विद्यापीठातून , IIT मधून प्रवेश घेऊ शकतात .पण सामान्यजनांसाठी रोजी रोटीचे आणि ज्ञानाचे दरवाजे बंद केले जात आहेत. डॉ .लीना पांढरे
(माजी प्राचार्य , इंग्रजी विभाग प्रमुख , पदव्युत्तर इंग्रजी विभाग! )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत