दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामान्य ज्ञान

८ मार्च अर्थात जागतिक महिला दिवस

महिला दिन मागचा उद्देश हा आहे की, महिलांना पुरुषां बरोबर समान न्याय, समान अधिकार मिळावा. मानसन्मान मिळावा. सर्व कार्यक्षेत्रात ती कार्यरत रहावी. मग ते क्षेत्र बौद्धिक असो वा शारीरिक श्रमाचे. तिला बरोबरीची संधी मिळावी. तसे पाहिले तर पुरुषांपेक्षा महिलाच शारीरिक श्रम अधिक करतात. त्या नौकरीच्या ठिकाणी काम तर करतातच करतात शिवाय घरी आल्यावर घरचे ही काम करतात. पुरुष कामावरून आला की हिच महिला त्याला आयता चहा आणून देते. (कारण तो पुरुष असतो ही पुरुषी मानसिकता) जगात स्त्रियांची कार्यक्षमता बहुतांश देशांनी मान्य केली. ज्या देशात पुरुषांच्या बरोबरीने समान प्रमाणात स्त्रिया कार्यशील आहेत ते देश प्रगतीच्या शर्यतीत अग्रेसर आहेत. उदा० जपान, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी.

म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात “स्त्री ही समाजाचा बहुमुल्य अलंकार आहे” खरच किती सार्थक आहे त्यांचं हे विधान. स्त्री विना समाज म्हणजे पानझडीने झडलेला रूक्ष वृक्षच. पाने, फळे, फुले हे त्या झाडाचे अभिन्न अंग आहेत. तसेच स्त्री हा समाज शरीराचा अविभाज्य भाग आहे. पण आपल्या भारतात खुळचट वैदिक धर्म व्यवस्थेने स्त्रिच्या शरीराला व मनाला बांधून ठेवले आहे. ते बंध आज जरी लोकलाजेस्तव थोड्या प्रमाणात सैल झाले असले तरी पण अजून पूर्णपणे मुक्तता नाही. स्त्रिला पूर्णपणे स्वातंत्र्य नाही. अर्थात काही सन्माननिय अपवाद वगळून.

पायात जोडवी व पैंजण… म्हणजे विचारल्या शिवाय कुठेही जावू नकोस. गेल्यास परिणाम वाईट. (आम्ही गावभर व यथेच्छ हिंडू फिरू कारण आम्ही पुरुष)

हातात बांगड्या… हात बांधून ठेवले. सांगीतल्या शिवाय नसत्या कामात हस्तक्षेप करू नकोस (आम्ही वाटेल ती मनमानी करू कारण आम्ही पुरुष)

कान टोचणे… सांगितले तेवढेच ऐक जास्तीचे नाही. नाही तर…(आम्ही मात्र तुझे ऐकणार नाही कारण आम्ही पुरुष)

मंगळसूत्र… तू एका पुरुषाशी बांधली गेली आहेस. किंवा त्या पुरुषाने तुला बंधक बनवून ठेवले आहे त्याची तू दासी आहे, गुलाम आहे. ही गुलामीची ओळख सर्वांना दाखव किंवा दिसू दे. किंवा ती सर्वांमध्ये मिरव. मग नवरा दारुड्या असू दे, जुगारी असू दे, बाहेरख्याली असू दे, मारझोड करणारा असू दे पण तू नवरा असल्याचं प्रतिक मिरवत जा. (आम्ही काहीही करायला मुक्त. कारण आम्ही पुरुष)

तू वस्त्र आमच्या पसंतीचे परिधान करायचे तुझी पसंती नाही. आम्ही कोणतेही कपडे वापरू (कारण आम्ही पुरुष आमचे संत, गुरू, बाबा ह्यांना तर कपड्यांचे वावडेच होते. जसे मोठ्ठे गुरू समर्थ रामदास, रागीट गुरू स्वामी समर्थ, चिलीमधारी संत गजानन महाराज. आणि अर्धनग्न मंदिरातील बडे बडे पुजारी देखील)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाळावर लाल कुंकू किंवा टिकली लावणे. म्हणजे तुझ्या स्वतंत्र विचारांना पुर्ण वीराम (फूल स्टाॅप). आपले कोणतेही विचार किंवा मत मांडायचे नाही थोडक्यात आपली अक्कल पाजळायची नाही. पुर्वी महिलांच्या कपाळावर कुंकवाची आडवी लाल लकीर होती. सावित्री माईचा फोटो पहा. ती लकीर म्हणजे महिलांच्या मर्यादांची लक्ष्मण रेखा होती ती रेखा ओलांडून जाणे म्हणजे मरण यातनांनी मरण जवळ करणे होते. महिलांच्या पुढच्या पिढ्या या बंधनातून मुक्त व्हाव्यात म्हणून माता सावित्रीने ती रेखा ओलांडून स्त्रिला स्त्री मुक्तीचा मार्ग दाखवला होता तो आजही प्रासंगिक आहे. (आम्हाला मात्र कोणतीही मर्यादा नाही कारण आम्ही पुरुष)

नाक टोचणे…तू आम्हाला सहन झाली नाहीच तर आम्ही वेळ प्रसंगी तुझा श्वास बंद करू तू मात्र तशी करू शकणार नाही (कारण आम्ही पुरुष)

पायातील जोडवी, हातातील बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र, कानातले रींग, नाकातील नथनी, कपाळावर टिकली. हे स्त्रियांचे स्त्री धन मानतात. किंवा स्त्री दागीने म्हणतात, परंतु हे दागीने… दागीने नसून स्त्री मनाला घातलेल्या अदृश्य बेड्या आहेत.

दागीन्याने स्त्री सुंदर दिसते. आणि सुंदर दिसने कोणत्या स्त्री ला आवडणार नाही? नव्हे तो तिचा हक्कच आहे. त्यासाठी ती स्त्री सुद्धा मानसिक गुलामीच्या बेड्या स्वतःहुन स्वतःच घालून घेते. (यामागचे कारण म्हणजे तिला सुंदर दिसण्याची हौस, किंवा घरच्यांचा धाक किंवा समाज काय म्हणेल याचा धाक आणि सोबत तिचे घोर अज्ञान सुद्धा. पण सुंदर दिसण्या बरोबरच आपण आपल्याला या पुरूषी मनमानी बंधनात किती अडकून घ्यावे याचेही भान तिने ठेवले पाहिजे. जेणेकरून तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला, स्वतंत्र विचारांना, स्वतंत्र विचारांच्या जगण्याला एक सामाजिक महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. व त्या विचारातून एक सशक्त वैचारिक भारतीय समाज निर्माण झाला पाहिजे.

वरील स्त्री बंधनाचे उल्लंघन केल्यावर कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा मानसिक अत्याचार होत असतो. किंवा अगदी छोट्या छोट्या कारणावरूनही महिलांना मानसिक ताण किंवा त्रास दिला जातो. यासाठी तणाव मुक्त कुटुंब घडविण्याच्या दिशेने, महिला सशक्त करण्याच्या दिशेने, तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीय महिला आयोगाला किंवा सामाजिक काम करणाऱ्या महिलांना काम करावे लागेल. अर्थात ते काम सुरू नाही असे नाही पण त्यातील गतीरोधक हटवून कामांना अधिक गती द्यावी लागेल. तसे काम सुरू झाल्यावर ‘पड आंबा पटकन मी गिळतो गटकन’ असे लगेच परिणाम दिसणार नाहीत पण सुरवात केली की, परिणामही दिसून येतील. असो. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एवढेच.

आज जागतिक महिला दिवसाच्या जगातील सर्व आदरणीय महिलांना हार्दिक शुभेच्छा!
????????

  • अशोक सवाई.
    संपर्क: 91 5617 0699

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!