वऱ्हाडाचा_ कुबेर राघोजी_महार..

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा बौद्ध व पूर्वीचा महार गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता.
आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत। पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा काही वेगळाच इतिहास आहे। या गावी राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी ऐकायला मिळतात।
राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता। असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला। त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला। आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला। ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता। लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक अडचणी दूर करत होता।सोबत मोठ्या लोकांच्या मोठ्या अडचणी कर्जरूपाने दूर करणारा एक मोठा सावकार झाला होता। पेशवाईत गळ्याला गाडगे आणि कमरेला फळा होता त्याच जातीचा एक माणूस पेशवे संपून पन्नास वर्षे झाले नव्हते तर गळ्यात सोन्याची साखळी घालून फिरत होता। पेशवाई भर दुपारी बाहेर पडता येत नव्हतं, तिथं राघोजी सावकार काठेवाडी घोडयावर फिरत होता। ज्या समाजाची माणसं फक्त उघडे आणि फाटके धोतर घालत होते त्या समाजाचा राघोजी सावकार मखमली अंगरखा व त्यावर कोट घालत होता। ज्या समाजाच्या माणसांना सवर्णाच्या समोरून जाता येत नव्हतं त्या समाजाच्या एका माणसाने कर्ज घेण्यासाठी सवर्णाच्या रांगा आपल्या घरासमोर उभ्या केल्या होत्या। वेळ सरकला तसा राघोजी सावकार मोठा जमिनीचा मालक बनला होता। राघोजीने सावकारी करायचा परवाना काढून सावकारी करू लागला होता। त्याच्याकडे मुनीम, घोड्याला पाणी पाजणारा आणि लहान लहान कामासाठी अनेक नोकर असत। अक्षरशत्रू असूनही कागदावर अंगठा लावत नव्हता। स्वतःची नाव असणारी सोन्याची मोहोर त्याने केव्हाच बनवून घेतली होती। तोरनाळळ्याला जवळपास साडे अकरा हजार स्केअर फुट बांधकाम करून टोलेजंग घर छोटा राजवाडा बांधला होता। इंग्रज लोकांना पाहून त्यांच्या नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असे। ब्रिटिश महिला जशा घोड्यावर बसतात हे पाहून त्याच्या मुलीलाही पॅन्ट शर्ट घालन्यास त्याने मनाई केली नाही। मुलीला घोड्यावर बसून फिरण्याची परवानगी दिली. मुलाला इंग्रजी शाळेत शिकवत होता। वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड हे त्यानेच खरे ठरवले होते। वाशिम, मंगरूळपीर क्षेत्रातील जमिनीचा विचार करता त्याच्याकडे दहा हजार एकर शेती होती। अकोला, वाशिम, कारंजा, मानोरा व कोंडोली पुढे बुलढाणा, वर्धा पर्यंत मारवाडी व्यापारांना एक लाखापर्यंत कर्ज देत होता। त्यांच्या तळघरात दोन मोठ्या तिजोऱ्या सोन्याने भरलेल्या होत्या। धान्याच्या शेकडो कणग्या भरून होत्या। त्यांच्या घरी बसणारा माणूस बोऱ्यात भरलेला पैशाला टेकून बसत होता। चांदी छाप रुपये न मोजता खोऱ्याने ओढत असत। बैलगाडीत वंगन ऎवजी अत्तर वापरतअसे। एकदा पोळ्याला सावकाराच्या आईने घरचे सर्व बैल पुजा करण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा हजारो बैलाचे पूजन करावे लागल्याने ती थकली होती। सोन्याच्या बैलाच्या पाचजोड्या त्याच्याकडे होत्या। त्यापैकी सर्वात मोठी दिड फुटाची होती। सोन्याच्या ताट-वाट्या होत्या. सोने चांदी तळघरात उघड्यावर पडलेल असायचे। जमिनीची व्यवस्था कुळाच्या जमिनीचा माल आणि सावकारी पैसा राघोजी सावकारा जवळ पोहोचण्यासाठी त्याच्याकडे अनेक मुनीम होते। असं सांगतात की त्याचा मुलगा महिपतीच्या लग्नात शेकडो झूलांनी नटलेला बैलजोड्या होत्या। तर वरातीत प्रत्येकाच्या अंगात नवीन कपडे होते। दुष्काळातही तो लोकांना पंचपक्वान्नं जेऊ घालायचा। देवाच्या नावाने पंगता उठायचा पण कालांतराने देवाच्या नावाने जेवण देणे बंद केले, अंधश्रद्धा निर्माण होईल अशा कार्यक्रमांना दान देणे त्यांने थांबविले।
1884 व 1885 मध्ये अकोल्याच्या जानोजी खंडारे यांनी काढलेल्या खोलेश्वर होस्टेलला पैशाच्या व धान्याच्या रूपाने त्याने देणगी दिली। पुण्यामध्ये अस्पृश्य निवारण अधिवेशनाला विदर्भातील अनेक लोक होते त्यात जानोजी खंदारे यांची पत्नी हजर होत्या त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी राघोजीं सावकाराने मदत केली।
1916 मध्ये विदर्भात भीषण दुष्काळ पडला होता। त्यात अनेक लोक उपासमारीने मेले। शेत पिकली नाही इंग्रज सरकारने सारा माफ करावा असे शेतकऱ्यांना वाटे। शेतकऱ्यांच्या पिकाचे तक्ते सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर 163 गावात सारा वसूल करण्यात थांबविण्यात आला। या दुष्काळात मृत्युदर दर हजारी 70 होता। दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कलेक्टरने मोठमोठ्या सावकारांची व शेतकऱ्यांची सभा वाशिम येथे बोलावली होती। सर्व सावकार व मोठे शेतकरी खुर्चीवर बसून होते, दरवाजा जवळच्या मोकळ्या जागेत हातात काठी, खांद्यावर घोंगडी, डोक्यावर फेटा, हातात भला मोठा सोन्याची कड असलेला राघोजी सावकार खाली बसलेला होता। कलेक्टरला तो खाली का बसला याचे गुपित उलगडले नव्हते। कलेक्टरने दुष्काळाची स्थिती लक्षात घेता मोठे शेतकरी व सावकारांना असे विचारले की धान्य रूपात तुम्ही किती मदत करू शकता? कोणी शंभर पोती कबुल केलं तर कोणी 200 पोती तर कोणी 500 पोती धान्य देण्याचे कबूल केले त्या कबुलीत गर्व ठासून भरलेला होता। राघोजी सावकाराला “तुम्ही किती देणार?” असा प्रश्न कलेक्टरांनी विचारला। राघोजींनी उत्तर दिले “तुम्ही म्हणाल तेवढ धान्य।” असं उत्तर दिलं. सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या। कलेक्टरला आपल्या कानावर विश्वास बसेना। कलेक्टरने परत एकदा बोलायला सांगितले। त्या सावकाराने “संपूर्ण वाशिम जिल्हा एक वर्षभर एकटाच पोचतो फक्त सारा माफ करावा” असे सांगितले। कलेक्टर राघोजी सावकाराकडे आश्चर्याने पाहू लागला। कलेक्टर ने सिपायाला खुर्ची घेऊन येण्यास सांगितले। आम्ही तुम्हाला पूर्णपणे ओळखू शकलो नाही असा खेद व्यक्त केला, राघोजी सावकार खुर्चीवर न बसता फक्त खांद्यावरचा घोंगळे खुर्चीवर ठेवले होते। वाशिम मध्ये लाल विटांची वास्तु दोन एकर अशा भक्कम जागेत उभी आहेत जी आजही न्यायाधीश निवासस्थान आहे। राघोजी सावकाराने लिलावात ती घेतली होती। लिलावात हजर असताना राघोजी सावकाराच्या बोलीला कोणीच तोडू शकलं नव्हतं। सर्व धनिक खाली मान घालून चालते झाले। ही इमारत एका नागवंशीय माणसाची झाली होती। वर्णव्यवस्थेने धिडकारलेल्या, उकिरड्यात खितपत पडलेल्या जातीतील माणसांने सर्व गोष्टी वर मात केली होती। सर्व गोष्टीवर मात केलं होतं आणि सर्व संकटांना वाकवल होत।
नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या निमित्ताने आले असता रिसोडला संत चोखामेळा वसतिगृह सुरू चालविणारे कचरूजी जुमडे यांनी वस्तीगृहाला पाहिजे तशी आर्थिक मदत मिळत नाही अशी खंत बाबासाहेबांजवळ व्यक्त केली होती। तेव्हा स्वतः बाबासाहेबांनी राघोजी सावकारांचे नाव सुचविले व सावकार त्या सामाजिक कामासाठी नकार देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला होता। झालेही तसेच वस्तीगृहाला जमीन देण्याविषयी सावकार बोलले होते पण वस्तीग्रह रजिस्ट्रेशन होईपर्यंत राघोजी सावकार 7 मार्च 1929 या जगातून निघून गेले होते। तेव्हा राघोजी सावकाराचा मुलगा महीपतने 1964 मध्ये 16 एकर शेती वस्तीगृहाला दान दिली व वडिलांच्या शब्दातून मोकळा झाला होता। ज्या समाजाची सावली चालत नव्हती, ज्या समाजाला सड्यावर कोणी उभा करत नव्हतं, अशा समाजातल्या एका माणसाने दाखवून दिलं होतं की महार जात ज्याप्रमाणे इमानदार, पराक्रमी, बुद्धिमान आहे तशी ती धनवान होऊ शकते ती कुठेच कमी नाही। अशा या विदर्भाच्या कुबेराची दखल फक्त प्राध्यापक शेखर गोविंद कोरडे यांच्या ‘राघनाक’ या चरित्र ग्रंथाने घेतलेली दिसते.
आज राघनाक यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन !
संकलक
भीमराव तायडे, नांदुरा
9420452123
(संदर्भ – ‘राघनाक’ लेखक: प्रा.शेखर गोविंद कोरडे)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत