आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३४

शील अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे मार्ग शीलामध्ये येतात.यापैकी सम्यक वाचा या मार्गाची माहिती मागील भागात घेतली. आता त्यापुढील मार्गाची माहिती घेऊया.२) सम्यक कर्मांतअष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय. ‘सुत्तनिपातात’ भगवान बुध्दांनी सांगितले आहे की, “कर्माने जग चालते. प्राणी कर्माने जगतात. चालण्याकरीता रथ ज्याप्रमाणे अणीवर अवलंबून असतो तसे प्राणी कर्मबंधनावर अवलंबून असतात.” याचा अर्थ संसाराचा नियंत्रक कोणी ईश्वर नसून व्यक्तीचे कर्म आहे.वैदिक ब्राम्हणी धर्म किंवा अन्य धर्म मनुष्याला यशाची प्राप्ती करण्यासाठी ईश्वराचा व परमात्मा यांचा वाटा असतो असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने असे काही न सांगता जे काही यश प्राप्त होते ते व्यक्तीच्या कर्माने होत असते. कर्माला महत्त्वाचे स्थान आहे. चांगले किंवा वाईट हे जे परिणाम आहेत ते व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते. माणसाच्या हातून चांगले अथवा वाईट कर्म घडत असते, त्याचे मूळ मनाच्या चेतनेमध्ये असते. म्हणजेच त्याचे चित्त अथवा मन हे केंद्रवर्ती असते आणि म्हणून सम्यक कर्मांताकरिता मनाला संयमित करणे महत्त्वाचे आहे. मानवी मन चंचल, चपळ, अनियंत्रित असते. ज्याप्रमाणे बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे मेघावी (बुध्दीमान) पुरुष आपल्या चित्ताला सरळ करतो. एक शत्रू आपल्या शत्रूचे आणि एक वैरी आपल्या वैर्याचे जितके नुकसान करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करीत असते. आई-वडील, नातेवाईक जेवढे चांगले करु शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा चांगल्या मार्गावर लागलेले चित्त करीत असते. म्हणून सम्यक कर्म करण्यासाठी चित्त सुध्दा सम्यक असायला पाहिजे. म्हणजेच सम्यक कर्मांतचे मूळ हे चित्तच आहे. धम्मपदातील बालवग्गोमध्ये मुर्खाबरोबर संगती करण्याचे दुष्परिणाम आणि चांगल्या बरोबर मैत्रीचे सुपरिणाम माणसाला भोगावे लागतात असे सांगितले आहे. म्हणून जगामध्ये वावरत असताना जर स्वत:पेक्षा चांगले अथवा स्वत:सारखे सोबती मिळाले नाही तर दृढतेने एकट्यानेच विचरण करावे. परंतु मुर्खाशी संगत करु नये. जसे ‘बी’ पेराल तसे उगवेल असे कर्माचा सिध्दांत आहे. म्हणून व्यक्तीच्या मनामध्ये सदाचरणाचे, नितिमत्तेचे बीज पेरणे आवश्यक आहे तेव्हाच त्याचेकडून चांगले आचरण घडू शकेल.धम्मपदाच्या एकोणसत्तराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-मधुवा मञ्ञति बालो याव पापं न पच्चति।यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्खं निगच्छति ॥याचा अर्थ, जोपर्यंत पाप कर्म फळ देत नाही तोपर्यंत मुर्ख मनुष्य त्याला मधासारखे (गोड) मानतो. परंतु जेव्हा पाप कर्म फळ देते तेव्हा त्यास दु:ख होते. म्हणजेच वाईट वागणार्याला जोपर्यंत वाईट वागणुकीचे फळ मिळत नाही तोपर्यंत तो तसाच वागत असतो. परंतु जेव्हा त्याला फळ मिळते तेव्हा त्याच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येते. म्हणून धम्मपदाच्या सदुसष्टाव्या गाथेमध्ये वाईट कर्माचे काय परिणाम होतात ते सांगितले -न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति ।यस्स अस्सुमुखो रोदं विपाकं पटिसेवति ॥याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले नव्हे की जे करुन पश्चाताप होईल, आणि ज्याचा परिणाम रडत रडत भोगावा लागेल.तसेच धम्मपदाच्या अडुसष्टाव्या गाथेमध्ये चांगल्या कर्माचे काय परिणाम होतात ते सांगितले -तञ्च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति ।यस्स पतीतो सुमनो विपाकं पटिवेवती ॥याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले आहे, जे करुन (करणार्याला) पश्चाताप होत नाही, आणि ज्याचा परिणाम प्रसन्न मनाने भोगावा लागतो.मनुष्य जीवनात जे काही बरे-वाईट कर्म करेल त्याला तोच जबाबदार असतो. म्हणून ज्यांनी जीवनात शरीर, वाणी व मनाने वाईट कर्म केले असेल तर त्यांनी यापुढे तरी चांगले कर्म करावे म्हणजे त्याचे दुष्कर्म हळूहळू दुर्बल होत जाईल असे भगवान बुध्द अंगुत्तर निकायात म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे भगवान बुध्दांच्या उपदेशानूसार डाकू अंगुलीमाल यांनी वाईट कर्म सोडून भिक्खू झालेत व पुढे कुशल कर्म करुन अहर्तपदाला पोहचलेत. म्हणून धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये पाप पुन:पुन्हा करु नये. असे भगवान बुध्द म्हणतात -पापंञ्चे पुरिसो कयिरा न तं कयिरा पुनप्पुनं ।न तम्हि छ्न्दं कयिराथ दुक्खो पापस्स उच्चयो ॥याचा अर्थ, जर पाप केले तर ते पुन:पुन्हा करु नये. त्यामध्ये रममान होऊ नये. पापाचा संचय दु:खास कारणीभूत होतो. तसेच धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये शुभ कर्मे पुन:पुन्हा करावे असे भगवान बुध्द म्हणतात –पुञ्ञञ्चे पुरिसो कयिरा कयिराथेनं पुनप्पुनं ।तम्हि छ्न्दं कयिराथ सुखो पुञ्ञस्स उच्चयो ॥याचा अर्थ, जर शुभ कर्मे केले तर ते पुन:पुन्हा करावे. त्यामध्ये रममान व्हावे. पुण्याचा संचय सुखास कारणीभूत होतो.ब्राम्हणी धर्मात जन्मामुळे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व प्राप्त होते असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने कर्मावर श्रेठष्त्व आणि कनिष्ठत्व प्राप्त होते असे सांगितले आहे. मनुष्यमात्रामध्ये जे दु:ख उद्भवते ते निर्माण होण्याचे कारण कर्मच आहे. दारुडा व्यक्ती दारुच्या आहारी जाऊन स्वत:च्या शरीराची, संसाराची नासाडी करीत असतो. ३) सम्यक आजीविकाअष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्यक आजीविका हा आहे
“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !
सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच भगवान बुध्दाची शिकवण आहे. धम्मपदातील या गाथेनुसार आचरण करणे हीच सम्यक आजीविका आहे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत. काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसर्यांची हानी किंवा त्यांचेवर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. यालाच सम्यक आजीविका म्हणतात.
क्रमशः आर.के.जुमळे दि.१६.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत