डॉ. बाबासाहेंबाचा २२ प्रतिज्ञा देण्या मागील उद्देश काय होता?

अशोक सवाई.
आज ६७ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी बरोब्बर ६७ वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी नागपूर येथे अस्पृश्य व शुद्र अति शुद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्या नागपूर शहराला आज साऱ्या जगात दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते. पण त्याही आधी सम्राट अशोकांनी साधारण २३ शे वर्षापूर्वी विजया दशमी लाच पहिले धम्मचक्र गतीमान केले होते. त्याला अशोका विजया दशमी असेही म्हणतात. (आज ब्राह्मण लोक त्याच अशोका विजया दशमीला त्यातील अशोका हे नाव वगळून फक्त विजया दशमी असे म्हणतात)
जगाच्या इतिहासात कमी जास्त प्रमाणात अनेक रक्तरंजित क्रांत्या-प्रतिक्रांत्या झाल्या. परंतु बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता रक्त विरहित जी बौद्ध धम्म दीक्षा क्रांती घडवून आणली तिला जगात तोड नाही. आजही जग या क्रांतीमुळे मोठे अचंबित आहे. जगाच्या इतिहासात डॉ. बाबासाहेबांच्या या क्रांतीला फार मोठे स्थान दिले जाते. जगात जेव्हा जेव्हा इतिहास शिकवला जातो तेव्हा तेव्हा तिथे डॉ. बाबासाहेबांचे नाव आल्याशिवाय राहत नाही. जगातील युवक/युवती आजही या क्रांतीचा अभ्यास करतात, संशोधन करून त्यावर डॉक्टरेट मिळवतात. म्हणूनच आजचे जग डॉ. बाबासाहेबांच्या विचारांकडे वळताना दिसत आहे. आणि म्हणूनच जगात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत, त्यांच्या नावाने संस्था आहेत.
समाजाला, पर्यायी देशाला एका नव्या दिशेला, नव्या क्रांती कडे घेऊन जात असताना त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या चार अपत्यांना गमवावे लागले. व शेवटी दि. २६ मे १९३५ या दिवशी आपली प्रिय पत्नी रमाबाईला ही (रामू) गमवावे लागले. त्यांचे जीवन म्हणजे एक अतिशय दु:खभरी कहाणी होती. पण त्याआधी त्यांनी देशात हिंदू धर्मातील विषमता दूर करण्यासाठी १९२० पासून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती सतत अहोरात्र त्यावर त्यांनी काम केले. हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी जगाच्या इतिहासातील अनेक पुरावे देवून सतत १९३५ पर्यंत लाख परीने प्रयत्न केले. परंतु हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवणाऱ्यांनी त्यांचे एक नाही ऐकले. शेवटी त्यांना दि. १३ आक्टोबर १९३५ रोजी नाशिक मधल्या येवला येथील सभेत धर्मांतराची घोषणा करावी लागली. आणि पुढे बरोब्बर २१ वर्षांनी म्हणजे १४ आक्टोबर १९५६ या दिवशी आपल्या अनुयायां सोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. ही एक फार मोठी ऐतिहासिक घटना त्या दिवशी बाबासाहेबांनी घडवून आणली. पण त्या २१ वर्षात त्यांनी जगातील विविध धर्माचा अभ्यास करून ठेवला होता. आणि शेवटी बौद्ध धर्माला शरण गेले. व आपल्या बौद्ध अनुयायांना पर्यायी देशाला जगातील १२८ बौद्ध राष्ट्रांशी जोडून ठेवले.
बाबासाहेबांचा २२ प्रतिज्ञा देण्याचा उद्देश काय होता? हा प्रश्न अनेकांना पडला असेल पडत असेल. तर उद्देश हा होता की, या २२ प्रतिज्ञात बौद्ध धम्माचा सारा सार सामावलेला आहे. दिक्षा घेण्याआधी बाबासाहेबां समोर अनेक प्रश्न होते. माझा समाज हा अडाणी, अशिक्षित आहे. आर्थिक परिस्थितीने एकदम शेवटच्या स्थानावर आहे. पोटासाठी दुसऱ्याच्या शिळ्या भाकर तुकड्यावर जगतो आहे. त्याला धड बोलीभाषा बोलता येत नाही. मग हा समाज शिकून सवरून शहाणा कधी होईल? व धम्माला कधी समजून घेईल? व नंतर त्याप्रमाणे आचरण कधी करेल? व स्वाभिमानाने केव्हा जगण्यासाठी समर्थ होईल? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. समजा आज आपण त्यांना दिक्षा दिली आणि एकाएकी हिंदू (तेव्हा सर्वच लोक हिंदू म्हणत असत) धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्विकार केला तर ते लगेच त्याप्रमाणे आचरण कसे करू शकतील? गोंधळून जातील बिचारे! आपण गेल्यावर त्यांना योग्य मार्गदाता नाही मिळाला तर कळपातील हरवलेल्या कोकरा सारखी त्यांची सैरभैर स्थिती होईल. यामुळे ते पुन्हा देव, देवतांच्या, कर्मकांडाच्या दलदलीत फसतील. तेव्हा हिंदू धर्मातील ठेकेदार त्यांच्यावर सूड उगवल्या प्रमाणे त्यांचे हाल हाल केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रतिकार तर सोडाच त्यांना ब्र सुध्दा काढता येणार नाही. त्यांचा कोणीही वाली असणार नाही. बौद्ध धम्माचा सार असलेल्या या २२ प्रतिज्ञा त्यांना धम्म दीक्षे बरोबर दिल्या तर ते लगेच समजतील व त्याप्रमाणे ते आपले स्वाभिमानी जीवन जगण्यास सुरू करतील. त्यामागे हा मोठा व महत्त्वाचा उद्देश बाबासाहेबांचा होता. मायबाप आपल्या पोटच्या लेकरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी जेवढी काळजी घेत नसतील तेवढी काळजी बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी व देशासाठी घेतली होती. त्यांची हिंदू कोड बिलांसाठीची तळमळ सुद्धा असीच होती. म्हणून ज्यांना बाबासाहेब कळले ते आपल्या मातापिता व गुरूजी पेक्षाही त्यांना उच्च स्थानी मानतात. म्हणून आज बहुजन समाजाची वाटचाल आपल्या मूळ बौद्ध धम्माच्या दिशेने वेगाने होत असलेली दिसत आहे.
आज बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देऊन ६७ वर्ष झाले आहेत. येत्या थोड्याच वर्षांत भारत बौद्धमय होण्याचे त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण होण्याचे दिसून येत आहे.
आजच्या या धम्मचक्र प्रवर्तकाच्या दिवसी प्रज्ञा सूर्य क्रांति कारकाला नतमस्तक होवून अभिवादन! व आपणा सर्वांना या दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!
जय भीम से… जय संविधान है… जय संविधान से… जय भारत है… और जय भारत से… हम सब भारतीय की जय है!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत