महपरिनिब्बानसुत्त भगवान बुद्धांच्या आयुष्यातील अंतिम काळातील उपदेश

चार आर्य सत्य
एके दिवशीं भगवान आयुष्यमान आनंदला म्हणाले, “चल आनंद ! आपण कोटिग्रामला जाऊ!”
“होय भंते !” असे आयुष्यमान आनंदाने भगवंतांना उत्तर दिले. भगवान महाभिक्षूसंघासह कोटिग्रामला गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी भिक्षूंना संबोधित केले की, “चार आर्य सत्य कोणती?’
१. “भिक्षूंनो ! पहिले आर्य सत्य आहे ‘दुःख’. चार आर्य सत्यांचे ज्ञान नसल्यामुळे तुम्हाला व मला अनेक काळापासून सतत या पृथ्वीवर यावे व जावे लागत आहे.
२. “भिक्षूंनो! दुसरे आर्य सत्य आहे ‘दुःख समुदाय’. त्याचे आकलन न झाल्यामुळे तुम्हाला व मला अनेक जन्म घ्यावे लागले आहेत.
३. भिक्षूंनो! ‘दुःख निरोध’ हे तिसरे आर्यसत्य आहे. त्याविषयी अज्ञात असल्याकारणाने मी व तुम्ही जन्म-मरणाच्या दीर्घ फेऱ्यात अडकलो आहोत.
४. भिक्षूंनो! आणि अंतिम चौथे आर्यसत्य आहे, दुःख निरोधागामिनी प्रतिपदा (दुःख नाहीसे करण्याचा मार्ग). याचाही बोध न झाल्याने आपण सर्व सतत या जगात येत आहोत. भिक्षूंनो! ज्याला या चार आर्यसत्यांचे म्हणजे या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नाहीसे करता येते आणि दुःख नाहीसे करण्याचे मार्ग आहेत याचे ज्ञान प्राप्त होते, ज्याची तृष्णा (तहान ) नाहीशी होते, त्याला पुनर्जन्म नाही. त्याला पुन्हा या जगात यावे लागत नाही. “
भगवंतांनी हे सांगितल्यानंतर; सुगतांनी हेही सांगितले की, “चार आर्य सत्यांना योग्य प्रकारे न जाणल्याने, त्या-त्या योनीमध्ये दीर्घकाळ यावे व जावे लागते, आता हे पाहिले गेले आहे की, भवचक्खू नष्ट झाले आहे. दुःख समूळ नष्ट झाले आहे, आणि परत पुन्हा जन्म नाही.”
तेथेही त्या कोटिग्राममध्ये राहत असताना भगवान हाच धम्म-उपदेश देत असत, हे शील आहे, ही समाधी आहे, ही प्रज्ञा आहे. शीलाने प्रभावित झालेली समाधी महा-फलदायी आहे, समाधीने प्रभावित झालेली प्रज्ञा अत्यंत गुणकारी आहे. प्रज्ञेने प्रभावित झालेले चित्त, मन वाईट विचारांपासून मुक्त होते. चार वाईट विचार (आस्त्रव) असे आहेत,
१) कामास्त्रव ( काम विकार ), २) भवास्त्रव (मानवी जीवन पुन्हा पुन्हा जगण्याची ओढ हा विकार),३) दृष्टीस्त्रव (पाप दृष्टी हा विकार ),४) अविद्यास्त्रव (अज्ञानामुळे आलेले वाईट विचार)
भगवंतांनी कोटिग्राममध्ये विहार करीत असतांना भिक्षूंना हा उपदेश दिला आणि पुढे ते नातीकेला निघाले ????
प्रा.नरेंद्र गव्हाणे.धुळे
चक्रवर्ती सम्राट अशोक सेवासंघ.महाराष्ट्र राज्य
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत