
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी वर्तविलेल्या ६.१ टक्के विकास दराच्या अंदाजात आता वाढ करण्यात आली आहे. याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के राहण्याची शक्यताही तिने वर्तवली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. या अहवालानुसार, भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील. चालू आर्थिक वर्षासाठीच्या आधीच्या अंदाजात ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत क्रयशक्ती वाढल्याने अंदाजात वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ५.४ टक्के आणि विकास दर ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून महागाई दर नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत गाठले जाईल. देशाची चालू खात्यावरील तूट चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ टक्के राहील, असेही नाणेनिधीने नमूद केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत